फेसबुक आणि वॉट्स अॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे आणि तो मजकूर लाईक व शेअर करणा-यांवरही गुन्हा दाखल केला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी सांगितले.
मुंबई- सोशल नेटवर्किंग साइट्सवरून आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे पोस्ट करणा-यांबरोबरच अशा पोस्टना ‘लाइक’ म्हणजे पसंती देऊन त्या इतरांना पाठवणा-यांवरही कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्सवरून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्टवरून गेल्या आठवडय़ात उसळलेल्या हिंसाचाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या हिंसाचारामध्ये पुण्यामधील मोहसिन शेख या आयटी व्यावसायिकाचा बळी गेला होता.
या प्रकारानंतर रविवारी रात्री पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. फेसबुकवरून बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अवमानकारक मजकूर टाकल्याचे लक्षात आल्यावर पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये तणाव पसरला होता. या पार्श्वभूमीवर असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजनांचा विचार करत आहे.
जगभरात सर्वत्र सोशल मीडियाचा वापर होत आहे. मात्र, त्याचा चांगल्या कारणांबरोबरच वापर होत असताना, समाजविघातक प्रवृत्तींकडूनही समाजात द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याची चिंता आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली. जे लोक अशा आक्षेपार्ह पोस्टना पसंती दर्शवतात आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवतात ते एक प्रकारे या समाजविघातक प्रवृत्तींना साथ देत असतात.
त्यामुळेच आगामी काळात त्यांच्या विरोधात कडक कारवाई झालेली पाहायला मिळेल, असे पाटील यांनी सांगितले. ज्यांच्या मोबाइल किंवा संगणकावरून अशा पोस्ट केल्या जातील, त्यांच्या मालकांनाच याबाबत जबाबदार ठरवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी एक वेगळा कायदा करण्याची गरज आहे का, याची चाचपणी देखील सरकारकडून केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
फेसबुकप्रकरणी २२ पाने ब्लॉक
फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर सेलने आतापर्यंत फेसबुकवरील २२ पाने ब्लॉक केली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेसबुकवर महापुरुष व देवी-देवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड केल्याने निर्माण झालेल्या तणावानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने फेसबुकशी संपर्क साधून संबंधित आक्षेपार्ह प्रोफाइल ब्लॉक करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार आतापर्यंत फेसबुकची २२ पाने ब्लॉक केल्याचे सहपोलिस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी सांगितले. या प्रकरणी आयपी अॅड्रेसच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. ही प्रोफाइल २०१३ मध्ये तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. प्रारंभी चांगला धार्मिक मजकूर अपलोड केल्यानंतर अनेकांनी या प्रोफाइलला पसंती दिली.
त्यानंतर ही प्रोफाइल ‘फॉलो’ केली. त्यामुळे या प्रोफाइलला फॉलो करणा-यांची संख्या वाढली होती. गेल्या शनिवारी या प्रोफाइलमध्ये अचानक आक्षेपार्ह छायाचित्र व मजकूर अपलोड झाल्यामुळे त्याचा प्रसार सहज झाला. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित असल्याचे पुढे आले आहे.
फेसबुक आणि वॉट्स अॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे आणि तो मजकूर लाईक व शेअर करणा-यांवरही गुन्हा दाखल केला जाईल….धन्यवाद.
पण कधी? कोणत्या कलमाखाली? आणि त्यावर काय शिक्षा असेल? हा नवीन कायदा असेल का? आणि तो विधान सभागृह कधी तयार करणार? कधी राज्यपाल त्याला मान्यता देणार?
हे सारे कोणत्या पंचवार्षिक योजनेत पूर्ण होईल, हे मान्यवर गृहमंन्त्र्यांनी स्पष्ट करावे हि विनंती.