‘समन्वयातून समृद्धीकडे’ असा संदेश देताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक दृष्टिकोनातून उचललेले पाऊल हे भविष्यकालीन पिढीसाठी आशादायक चित्र निर्माण करणार असल्याची ठाम ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.
राजापूर- ‘समन्वयातून समृद्धीकडे’ असा संदेश देताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक दृष्टिकोनातून उचललेले पाऊल हे भविष्यकालीन पिढीसाठी आशादायक चित्र निर्माण करणार असल्याची ठाम ग्वाही देऊन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मिठगवाणेतील अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत उपस्थितांना अंत:र्मुख केले. या परिसराचा नारायण राणे यांचा संपूर्ण दौरा आणि त्याला प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांचा मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता अणुऊर्जा प्रकल्पाला दाखवण्यात येत असलेला विरोध हा निव्वळ राजकीयच आहे आणि त्यातून स्थानिक ग्रामस्थांचे कोणतेच भले नसल्याची बाब पुढे आल्याशिवाय राहिली नाही. प्रारंभीच्या काळात झालेला विरोध उद्योगमंत्री राणे यांच्या पुढाकारातून मावळल्याने किंबहुना समन्वयाच्या भूमिकेतून स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक पावले उचलल्याने जैतापूर परिसरात आता चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या असलेल्या विविध शंकांच्या पार्श्वभूमीवर ‘तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे, जैतापूरनजीक असलेल्या कणकवलीतच मी आणि माझे कुटुंब राहतो. हा प्रकल्प विनाशकारी असता आणि त्यापासून जर धोका असता तर मी अशा प्रकल्पाला पाठिंबा दिला असता का? असा प्रकल्पग्रस्तांना विश्वास देत तुमच्या मागण्यांसाठी प्रसंगी मीही लढेन आणि तुमचे प्रश्न सुटेपर्यंत लढत राहीन, अशी ग्वाही देत त्यांनी या दौ-यात प्रकल्पग्रस्तांचा विश्वास अधिक दृढ केला. मिठगवाणे येथे उद्योगमंत्र्यांनी केलेल्या भाषणाने प्रकल्पग्रस्तांना जणू हत्तीचे बळच मिळाले.
सोमवारच्या संपूर्ण दिवसातील खाडीपट्टय़ाच्या दौ-यात राणे यांनी संपूर्ण वेळ मिठगवाणे, माडबन, करेल, निवेली या प्रकल्पग्रस्त गावांतील ग्रामस्थांसाठी दिला. कोणतेही राजकीय भाष्य न करता केवळ विकास आणि प्रकल्पामुळे होणारे फायदे आणि आगामी पिढीचे भविष्य या विषयावर बोलत राणे यांनी आता लहरी शेती, बागायतीतून बाहेर येत मोठं होण्याचं स्वप्न कोकणी माणसाने उराशी बाळगलं पाहिजे, असा कानमंत्र उपस्थितांना दिला. कोकणातील डॉक्टर, वकील अशा मंडळींनी केवळ आपले व्यवसाय पाहत न बसता स्थानिक बेरोजगारी, दारिद्रय़ अशा विषयांकडेही कटाक्ष टाकून अशा देशहितकारी प्रकल्पाबाबत शक्य तेवढे समुपदेशन केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. इथल्या तरुणांनी शिकून जर का नोक-या नसतील तर मग कुठं जायचं, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
कोकणातील जनतेने शेती, बागायतीबरोबरच आता फळप्रक्रिया उद्योग, हॉटेल, ऑटोमोबाइल यांसारख्या अन्य व्यवसायांकडे वळले पाहिजे. त्यासाठी या प्रकल्पग्रस्तांना जो जमिनीचा मोबदला मिळाला आहे त्याचं योग्य नियोजन व विनियोग करून सुबत्ता प्रस्थापित करा, असे आवाहनही राणे यांनी केले.
या प्रकल्पातून समुद्रात सोडल्या जाणा-या गरम पाण्यामुळे समुद्रातील माशांवर परिणाम होणार, मासेमारीवर परिणाम होणार असे एक नव्हे अनेक गैरसमज मच्छीमार बांधवांमध्ये निर्माण करण्यात आले आहेत. हे सारे गैरसमज चर्चेतून दूर होणार आहेत. मच्छीमारांवर कोणताही अन्याय होणार नाही याची मी खात्री देतो असे सांगतानाच जर का यामुळे मच्छीमारांचे नुकसान होणार असेल तर सरकारकडून ते देण्यासाठी भाग पाडू, अशी ग्वाही देखील राणे यांनी दिली.
या प्रकल्पाबाबत प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेला कोणताही प्रश्न असो मग तो पाच किलोमीटर बाधित क्षेत्राचा असो, प्रकल्पातील नोक-यांचा असो, स्थानिक मच्छीमारांचा असो तुम्ही त्याची चिंता करू नका. हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी मी समर्थ आहे, नव्हे ते सोडवणारच अशी हमी या वेळी उद्योगमंत्री राणे यांनी दिली. अणुऊर्जा कंपनीसोबत झालेल्या कराराची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगतानाच त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करेन व ती करून घेईन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
jaitapur praklpala asalyala virod praklpala nasun ha narayan rane yana manjech amachya ladkya jantaya rajala (dadana) hai.Pan virodakan vaicharik gadun kokancha vikasche swapna pahanara janta raja hai .