आज जागतिक महिला दिन. या महिला दिनानिमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. नव्हे तर महिला या समाजाच्या एक महत्त्वाच्या घटक आहेत, ही बाब आजच्या दिवशी अधिक प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
माओ त्से तुंग यांनी, जगाचे अर्ध आसमंत स्त्रीयांनी व्यापलेले आहे, असे गौरवोद्गार काढले होते. ते खरेही आहे. पण असे असतानाही अजूनही स्त्री नको म्हणून स्त्रीभ्रूणाची हत्या करण्यात येते. सध्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावात उघडकीस आलेल्या स्त्री भ्रूणहत्यांच्या घटनांमुळे यावर काहीसे शिक्कामोर्तब होत आहे. असे असताना जगभरातच स्त्रीया विविध क्षेत्रांत पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करत असल्याचेही आपण पाहतो. त्यामुळे फक्त ८ मार्च या दिवशीच स्त्रीच्या कार्याचे मूल्यमापन करणे, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणे हे काही बरोबर नाही. स्त्रीयांचा सन्मान हा कायम झालाच पाहिजे!
अठराव्या व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत स्त्रीचे कार्यक्षेत्र हे ‘चूल आणि मूल’ इतपत मर्यादित होते. त्यामुळेच की काय समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी स्त्रीचे वर्णन ‘चुलखंडाच्या नागरिक’ असे केले होते. पण भारतात सुधारणावादी विचारसरणींनी बाळसं धरल्यानंतर स्त्री ही पुरुषांसारखीच एक माणूस आहे, तिलाही स्वतंत्रपणे, निर्भयतेने जगता आले पाहिजे. समाजात आपल्या पायावर उभे राहता आले पाहिजे. यासाठी अनेक समाजसुधारकांनी जीवाचे रान केले. त्यांच्या मेहनतीमुळे आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. देशात स्त्रीयांना समान संधी मिळावी यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा समावेश करावा लागेल. राजीवजी हे प्रागतिक विचारांचे होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात महिलांसाठी ३० टक्क्य़ांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे स्त्रीयांना राजकारण करून समाजकारण करताना बळ प्राप्त झाले. आज तर भारतीय संसदीय प्रणालीत स्त्रीयांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे पुरुषांबरोबर त्याही निर्णय घ्यायला सक्षम झालेल्या आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असो, देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील असो, अंतराळ सफरीसाठी गेलेल्या सुनिता विल्यम असो, स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य असो अशा आणि अशासारख्या अनेक स्त्रीयांनी आपापल्या क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. स्त्री असल्याने त्या कुठेही, कोणत्याही कामात कमी पडलेल्या नाहीत. नव्हे तर, इंदिरा गांधी यांच्यासारख्या महिलेने महिला पंतप्रधान किती धाडसाने निर्णय घेऊ शकते याचा वस्तुपाठ ठेवलेला आहे. प्रतिभा पाटील यांनीही राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात केलेले कार्य थक्क करणारे आहे. सुनिता विल्यम ही भारतीय वंशाची महिला नासात दाखल काय होते, नंतर अंतराळ यात्रेसाठी काय जाते, या यात्रेदरम्यान तिचा अपघाती मृत्यू काय होतो, सगळच कसं थक्क करणारे आहे.
असं सगळं काही असताना समाजात स्त्रीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन निकोप नाही. त्यातूनच मग मुलगी नको ही भावना वाढीस लागत आहे. काही वर्षापूर्वी स्त्री भ्रूणहत्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील मुंडे या डॉक्टर दांपत्याला अटक केली होती. त्यानंतर राज्य सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी आणली होती. असे असतानाच एखाद दुसरी घटना राज्यात घडत होती. पण आता सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील ११ स्त्री भ्रूणहत्यांचे प्रकरण समोर आल्याने समाज अजूनही कोणत्या शतकात वावरतोय, याबाबत चिंता वाटते. ग्रामीण भागात मुलगी ही ‘नकोशी’ असते. त्यामुळे जन्मल्यावर तिच्या दु:खाचे भोग काही संपत नाही, अनेकदा ते तिच्या अंतानंतरच संपलेले असतात. निसर्गाने जर स्त्री व पुरुषांना घडवताना भेदभाव केला नसेल तर आपल्याला असे भेदाभेद करण्याचा अधिकार कुणी दिला, यावर विचार होण्याची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ’ सारखे अभियान हाती घेतले आहे. पण नुसते असे अभियान हाती घेऊन स्त्री भ्रूणहत्या काही थांबणार नाहीत. हे अभियान अधिक नेटाने कसे राबवता येईल, यासाठीचा कृती कार्यक्रम हाती घेऊन त्यानुसार प्रयत्न होणे आवश्यक आहे. पण असे कार्यक्रम राबवताना सरकार कमी पडते, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. एकीकडे मुलीचा जन्म नको, अशी मानसिकता समाजात असताना स्त्रीकडे केवळ एक उपभोगवस्तू म्हणून पाहण्याकडेही कल वाढत आहे. यात जास्त करून शालेय विद्यार्थिनी, लहान मुलींचा बळी जातो. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार दिवसाला पाच ते सात महिलांवर देशात बलात्कार होतात. हे सदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे? एकतर्फी प्रेमातून आलेल्या नैराश्येतून अनेक तरुण मुलींवर हल्ले करतात, त्यांच्या अंगावर अॅसिड हल्ले करतात, त्यांचा चेहरा विद्रुप करतात. ते रानटीपणाचे लक्षण नव्हे का? भारतासारख्या देशात महिलांना देवीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. लक्ष्मी, सरस्वती, पार्वती या देवींची मनोभावे पूजा करणारे आपण, महिलांबाबत एवढे संकुचितवृत्तीचे कसे झालो आहोत? छत्रपती शिवराजांच्या स्वराज्य स्थापण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचे काम जीजाऊंनीच केले. नव्हे तर, महाराजांमध्ये सहिष्णुतेची भावना निर्माण करण्यात त्यांनी त्यांना लहानपणी केलेले संस्कारच कारणीभूत ठरलेले आहेत. महाराष्ट्रातील अहिल्याबाई होळकर यांनी उत्तर भारतात केलेले कार्य अतुलनीय आहे. सावित्रीबाई फुले यांनी दगडधोंडे, शेणगोळ्याचा मारा झेलत महिलांसाठी शिक्षण देण्याचे केलेले काम त्या स्त्रीया होत्या म्हणून केले, अशा तागडीत कसे मोजता येईल? त्या स्त्रीया होत्या, त्यापलीकडे त्या एक माणूस होत्या. त्यामुळे माणसाने माणसासाठी झटले पाहिजे, या उद्दात्त हेतूने त्यांनी ही सेवा केली. पण आपण अजूनही स्त्री-पुरुष या भेदात अडकलो असल्यानेच मंदिर असो किंवा मस्जीदीत प्रवेश मिळावा यासाठी माहिलांना अजूनही संघर्ष करावा लागतो. अखेर सर्वोच्च न्यायालयाला यात लक्ष घालून घटनेच्याच आधारे स्त्रीयांना समानता बहाल करावी लागते, हे असे भारतासारख्या देशात सुरू आहे. असे असताना आपण महाशक्ती बनण्याचे स्वप्न कसे काय पाहू शकतो.
जगाचा एकूण इतिहास पाहिल्यास स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे. ती आई असते, बहिण, प्रेयसी, पत्नी, मैत्रिण, बॉस अशा विविध रूपात ती आपल्याला भेटत असते. पण त्यापूर्वी स्त्रीचे माता म्हणून असलेले रूप जोपर्यंत जगात संस्कृती टिकून आहे तोपर्यंत श्रेष्ठच ठरणार आहे. पोटात अंकुरत असलेला गर्भ नऊ महिने सांभाळणे, प्रसववेदना सहन करून बाळजन्माचा सोहळा अनुभवणे हे फक्त.. फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते. ते पुरुषांना जमणारे नाही. त्यामुळे पुरुषांनी कायमच स्त्रीच्या उपकाराखाली राहिले पाहिजे. आचार्य अत्रे यांच्या एका नाटकात ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते’, असे वाक्य येते. ते खरेही आहे. ‘सागराला ओहोटी आल्यावर नदी त्यात समर्पीत होते. सागराला भरती आल्यावर तो सगळं बाहेर फेकतो, नदीलाही.. तसेच काहीसे स्त्रीचे असते’ अशा शब्दांत वि. स. खांडेकर यांनी स्त्रीयांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
जगभरातील लोकसाहित्यातूनही स्त्रीचे विविध पदर उलगडलेले आहे. कधी ती प्रेमळ असते. अत्याचार होताना ती रूद्रावतारही धारण करते. अशा या स्त्रीचे वर्णन इंदिरा संत या कवयित्रीने, ‘शिजणारीही तीच.. शिजवणारीही तीच..’ असे केले आहे. ते खरेही आहे. शिजवता, शिजवता शिजणारी ही स्त्री त्यामुळेच महान आहे. नव्हे तर, फक्त जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान, सत्कार करण्याऐवजी त्यांच्याप्रति चार चांगले शब्द वापरले, त्यांच्या कार्याचे कौतुक केले, त्यांना कायम प्रोत्साहित केले तरी खूप झाले. असे झाल्यास ३६५ दिवसांपैकी एकच दिवस महिला दिन राहणार नाही. ३६५ दिवस महिलाही त्याच तडफेने कामे करीत राहतील. प्रागैहितासिक काळाचा धांडोळा घेतल्यास, गणराज्य व्यवस्थेत स्त्रीयांचेच राज्य होते, मंदोदरी, निर्ऋती या महाराण्या होत्या. याची प्रचिती येईल. तो दिवस पुन्हा यावा, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
सुनिता विल्यम ही भारतीय वंशाची महिला नासात दाखल काय होते, नंतर अंतराळ यात्रेसाठी काय जाते, या यात्रेदरम्यान तिचा अपघाती मृत्यू काय होतो, सगळच कसं थक्क करणारे आहे.
सुनीता विल्यम कि ? कल्पना चावला .नासा च्या अंतराळ यानातून पृथ्वीवर परत येताना श्रीमती ( स्वर्गीय )
कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता .!!!!
Is this true……..??????????