‘‘भाजप सरकारची चुकीची धोरणे, विकासात्मक कामांबाबत निष्काळजीपणा आणि वाढता भ्रष्टाचार यांमुळे कर्नाटकचा विकास खुंटला आहे,’’ अशी टीका करून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी कर्नाटक सरकारवर जोरदार आसूड ओढला.
हुबळी– ‘‘भाजप सरकारची चुकीची धोरणे, विकासात्मक कामांबाबत निष्काळजीपणा आणि वाढता भ्रष्टाचार यांमुळे कर्नाटकचा विकास खुंटला आहे,’’ अशी टीका करून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी कर्नाटक सरकारवर जोरदार आसूड ओढला.
पाच मे रोजी होणा-या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हुबळी येथे प्रचारसभेचे आयोजन केले होते. या सभेत पंतप्रधानांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘‘गेल्या पाच वर्षात या राज्यात तीनदा मुख्यमंत्री बदलण्यात आले. राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. या राज्यातील अल्पसंख्याकांमध्येही असुरक्षीततेची भावना वाढीस लागत आहे,’’ अशी टीका पंतप्रधानांनी केली.
कर्नाटक सरकारने राज्यातील शेतीकडे आणि रोजगाराकडे कायम दुर्लक्ष केले. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प अर्धवट आहेत. सिंचन विकासात्मक कार्यक्रमांतर्गत येणारी कामेही असमाधानकारक आहे. सरकारने पायाभूती सुविधांकडेही लक्ष न दिल्याने अनेक उद्योग हैदराबाद आणि पुणे या शहरांकडे वळले, असे पंतप्रधानांनी सांगितले.
भाजप सरकारने जाणुनबुजून अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अल्पसंख्याकांची संख्या असलेल्या रायचूर, बेलारी, गुलबर्गा आणि बिदर या परिसराचा विकास खुंटला. केंद्र सरकारच्या अनेक योजनांतर्गत मिळणा-या निधीचा कर्नाटक सरकारने योग्य वापर केला नाही. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास केंद्रीय योजनांच्या निधीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येईल. केवळ काँग्रेसच विकासाची कामे जलदगतीने करू शकतो, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
मनमोहन हे बोलले हे काय कमी आहे? लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वता कोरडे पाषाण