नरेंद्र मोदी यांना सहारा समुहाने ४० कोटी रुपये, तर आदित्य बिर्ला समुहाने १२ कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
मेहसाणा- ‘मी बोललो तर भूकंप होईल,’.. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या या दणकेबाज विधानानंतर मोदींच्या गुजरातमध्ये जावूनच बुधवारी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप करून प्रचंड दणका दिला. सहारा समूहाकडून नरेंद्र मोदी यांनी ४० कोटी रूपये घेतले आहेत आणि बिर्ला समूहाकडून १२ कोटी रूपये घेतले असे जाहीर सभेत सांगून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाचे तपशीलवार पुरावे सभेत फडकावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा समुहाने त्यांना ४० कोटी रुपये, तर आदित्य बिर्ला समुहाने १२ कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातच्या मेहसाणा येथील जाहीर सभेत बोलताना केला. याबाबतचे सर्व पुरावे इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असूनही आजवर कुठलीही चौकशी झाली नसल्याचे सांगत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत सहारा समुहाने नरेंद्र मोदी यांना ९ टप्प्यांमध्ये ४० कोटी रुपये दिले असून २२ नोव्हेंबर २०१४ रोजी इन्कम टॅक्स विभागाने सहारा समुहावर टाकलेल्या धाडीत याबाबतचे पुरावे इन्कम टॅक्स विभागाला मिळाले आहेत. तर आदित्य बिर्ला समुहाकडून मोदींनी १२ कोटी रुपये घेतल्याचेही पुरावे इन्कम टॅक्स विभागाकडे आहेत.
मात्र तरीही मागील अडीच वर्षात मोदींची साधी चौकशीही न केल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी मागील आठवडय़ात उत्तर प्रदेशातील सभेत बोलताना आपल्याकडे मोदींच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचे पुरावे असून याबाबत आपल्याला लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचे म्हटले होते.
आपण बोललो, तर राजकीय भूकंप होईल, असेही ते म्हणाले होते. यानंतर काही दिवस शांत असलेल्या राहुल गांधी यांनी अखेर मोदींच्या होमपिचवर जाऊन त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावेच देशासमोर मांडले असून मोदींच्या चौकशीची मागणी केली आहे.
तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊन त्यांनी मेहनतीने कमावलेल्या पैशांसाठी त्यांना रांगेत उभे केले. आता याच जनतेच्या वतीने मी तुम्हाला विचारतो, की ही माहिती खरी आहे? की खोटी? आणि जर ही माहिती खरी असेल, तर तुम्ही याची चौकशी कधी करणार? असा सवाल राहुल यांनी शेवटी केला. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांची चौकशी होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अशा हप्त्यांमध्ये सहाराने मोदींना दिल्या रकमा
- ३० ऑक्टोबर २०१३- २.५० कोटी
- १२ नोव्हेंबर २०१३- ५.०० कोटी
- २७ नोव्हेंबर २०१३- २.५० कोटी
- २९ नोव्हेंबर २०१३- ५.०० कोटी
- ६ डिसेंबर २०१३- ५.०० कोटी
- १९ डिसेंबर २०१३- ५.०० कोटी
- १३ जानेवारी २०१४- ५.०० कोटी
- २८ जानेवारी २०१४- ५.०० कोटी
- २२ फेब्रुवारी २०१४- ५.०० कोटी
- एकूण- ४० कोटी रुपये
‘सर्वसामान्यांना नोटबंदी आणि पंतप्रधानच लाचखोर!’
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांनंतर काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवर मोदींवर टीका केली आहे. ‘एकिकडे मोदी निर्लज्जपणे लाच घेताता आणि दुसरीकडे काळय़ा पैशाविरोधातील लढाई अअसल्याचे सांगत सर्वसामान्यांवर नोटबंदीचा निर्णय लादतात’ असे काँग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे. तर मोदींनी पैसे घेतले की नाहीत? इन्कम टॅक्सच्या धाडीत सापडलेल्या या कागदपत्रांनुसार आता चौकशी होईल का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे.
आप सभी नेता लोक जनताको अच्छे उल्लू बना रहे हो !