रत्नागिरी – यंदाच्या मासेमारी हंगामाची सुरुवात आश्वासक होऊनही बदललेल्या वातावरणाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. शनिवारी रात्रीपासून सुटलेल्या वा-यांनी मासेमारीची वाट रोखली आहे.
हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवस मच्छीमारांना कोळंबी, लेपा, पापलेट आणि बांगडा मिळत होता; मात्र शनिवारपासून पुन्हा वा-याने जोर धरल्यामुळे समुद्रात गेलेल्या मिरकरवाडा बंदरातील अनेक बोटी माघारी परतल्या. बदललेल्या वातावरणामुळे मासळी देखील खोल समुद्रात जात असल्याने मच्छीमारांनी आपापल्या नौका माघारी बोलावल्या.
वारा आणि पावसामुळे पाण्याला करंट आहे. समुद्रात बोटी उभ्या राहत नसल्याने मासेमारी करताना अडथळे येत आहेत. वातावरण केव्हाही बिघडण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमार सकाळी जाऊन संध्याकाळी बंदराकडे परतत आहेत. वादळ झाल्यास सुरक्षित ठिकाणी पोचता यावे यासाठी ही काळजी मच्छीमार घेत आहेत. हवामान विभागाकडूनही वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे वातावरण अजून दोन दिवस राहील, असा अंदाज आहे.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. पावसाळय़ापूर्वी प्रजननासाठी मासळी किना-यालगत येऊन अंडी देते. ही मासळी मिळवण्यासाठी अनेकदा मच्छीमार समुद्रात धाव घेतात. परिणामी प्रजनन प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नसल्याने मागील काही कालावधीपासून मच्छीमार हंगाम तोटय़ाकडे चालला आहे.
दोन महिन्याच्या बंदीनंतर मासेमारीचा हंगाम १ ऑगस्टपासून सुरू झाला. जून, जुलै महिन्यांच्या बंदीनंतर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना कोळंबीचे विविध प्रकार सापडत होते. सुरुवात चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मिरकरवाडा, हर्णे या मोठय़ा बंदरावर मत्स्य लिलावाची प्रक्रियाही सुरू झाली. मासे कमी मिळत असल्यामुळे व्यावसायिकांकडून दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. मासळी आली की असेल त्या दरात विकत घेतले जात आहेत. त्यातील दर्जेदार माल निर्यातीसाठी वापरण्यात येत आहे. पूर्णगड ते जयगड या पट्टय़ात मच्छीमारांना कोळंबी मिळत आहे. बुरोंडीसह दापोली भागात मच्छीमारांना काही प्रमाणात पापलेट मिळत आहे.
वातावरण अजून धोकादायकच आहे … अनूकुल झालेच केव्हा ?