द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा शिर्डीचे साईबाबा यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले.
नागपूर- द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा शिर्डीचे साईबाबा यांच्या विरोधात वक्तव्य करत शिर्डीच्या साई मंदिराचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी केली. तसेच साई शताब्दी महोत्सवासाठी ३० एकर जमीन आणि १२०० कोटी रुपये देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. हिम्मत असेल तर साईभक्तांनी आपल्याशी चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
नागपूर येथे गणेश जैस्वाल यांच्या निवासस्थानी शंकराचार्य पत्रकारांशी बोलत होते. साई हे संत नाहीत, गुरु नाहीत, आणि देवही नाहीत, असा स्पष्ट ठराव १८ जानेवारी रोजी झालेल्या सनातन धर्म संसदेत संमत झाला आहे, याची आठवण शंकराचार्य यांनी यावेळी केली.
हिंदू समाजाच्या कल्याणासाठी साईबाबांनी काय केले, असा सवाल करून शंकराचार्य म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगीरीतून देशाला सोडवण्यासाठीही त्यांचे कसले योगदान नाही. साईबाबा यांची भक्ती हा हिंदू समाजात फुट पडण्याचा एक कट आहे. काही विदेशी संघटनांचा हा कट आहे. हिंदू समाज एकसंघ राहू नये, असा या संघटनांचा डाव आहे.
साईभक्तांनी चालवलेल्या आंदोलनाला आपण भिक घालत नाही, असे शंकराचार्य म्हणाले. ते माझा पुतळा जाळू शकतात, मला तुरुंगातही पाठवू शकतात. मात्र हिंदू धर्माचे पावित्र्य जपण्याचा माझा लढा सुरूच राहील. साईबाबा हे साधे मनुष्य होते आणि म्हणून त्यांची भक्ती केली जाऊ नये. त्यांची देवळेही बांधू नयेत. साईबाबा हे मुस्लीम फकीर होते. हिंदू देवतांशी त्यांची तुलना कशी होऊ शकते किंवा पूजा कशी होऊ शकते? असा प्रश्न करत त्यांनी आपल्या पूर्वी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.
धर्म संसदेच्या इतर ठरावांची माहिती देताना शंकराचार्य म्हणाले, गंगा नदीवर धरण बांधण्याचे सारे प्रकल्प सरकारने रद्द करावे. गंगेला अखंड वाहू द्यावे. गंगेचे संरक्षण करण्याचा हा एकमेव उपाय आहे अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. तसेच देशात गोह्त्त्येवर बंदी आणावी, संस्कृत भाषेला प्रोत्साहन द्यावे, असेही धर्म संसदेला वाटते असे त्यांनी सांगितले.
साठी बुद्धी लाठी झाली AAHE