राज्यात ३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.
मुंबई- राज्यात ३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. तरीही फडणवीस सरकार शेतक-यांना कसलीही मदत करत नाही. तामिळनाडूला जास्त पाऊस झाल्यास तात्काळ मदत मिळते. मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही.
शेतकरीविरोधी फडणवीस सरकारच्या निषेधात ८ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर भव्य धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.
शेतक-यांना कर्जमाफी व महागाईवर नियंत्रणासह प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मोर्चात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
सोमवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक संपन्न झाली, त्यानंतर गांधी भवन काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. दुष्काळी भागात पाणी आणि चारा टंचाई आहे. भाकड जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. विंधण विहिरीही नाहीत. तरीही कोणतीही ठोस उपाययोजना सरकार करीत नाही. ऊस शेतक-यांना एफआरपीचे पैसे मिळत नाहीत. राज्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे.
कापसाला ८ हजार भाव देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. सरकारी साखर कारखाने मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारखान्याने दिलेला भाव आणि एफआरपी यातला फरक सरकारने अनुदान म्हणून थेट शेतक-यांना देण्याची मागणीही चव्हाण यांनी केली.
दरम्यान, राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकारी कर्मचा-यांना नियमित पगारही देता येणार नसल्याचे भाकीत चव्हाण यांनी केले. या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री फडणवीस यांचे युती सरकारच जबाबदार असून त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार आदी प्रश्नांना वाचा फोडणा-या प्रमुख मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे.
कापसाला रुपये ८०००/- प्रती क्विंटल भाव हा मिळालाच पाहिजे. व्यापारी अव्वाच्या सव्वा कमावतात मग शेतक-याला भाव का नको? कापसाला रुपये ८०००/- प्रती क्विंटल भाव हा सरकारने द्यायलाच आहे.