राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबर रोजी झालेली जयंती यंदा वेगळया अर्थाने चर्चेत होती. दरवर्षी केवळ वाईन शॉप बंद म्हणून ही जयंती चर्चेत असते. महात्मा गांधींचे पुण्यस्मरण व्हावे म्हणून यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली. परंतु अहिंसेचे पुजारी असलेल्या या महात्मा गांधी यांचा जयंती दिन केवळ सुट्टीशिवाय आपण कोणत्याही सत्कर्मी घालवत नाही. त्यामुळे यंदा केंद्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर रोजी सर्व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्राधिकरण, मंडळे यासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकारचे आदेश शिरसावंद्य मानून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण व मंडळे कामाला लागत स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतली. मोदी यांनी सर्वच बडया अधिका-यांना हाती झाडू घ्यायला लावली. खरे तर हे चित्र पाहून जर दर महिन्याला अशाचप्रकारे स्वच्छता मोहीम राबवली गेली तर मुंबईचे चित्र वेगळे दिसेल, यात कोणतीही शंका नसेल. त्यामुळे केंद्र सरकारने २ ऑक्टोबरचा मुहूर्त शोधून राबवलेली ही स्वच्छता मोहीम हा स्तुत्य उपक्रम आहे. नव्हे तर त्याची गरजच आहे. पण ही स्वच्छता संत गाडगेबाबांना अभिप्रेत अशी असायला हवी. अरविंद केजरीवालांसाठी नसावी. कारण ज्या संत गाडगे महाराजांनी हाती घराटा, डोक्यावर अन्नाची ताटली ठेवत गावागावांसह शहरांमधील भाग स्वच्छ केलेत. त्यांनी जनतेला जो स्वच्छतेचा मंत्र जनतेला दिला, तो मंत्र पुढे घेऊन जाताना त्यातून स्वच्छता हीच अभिप्रेत असेल. परंतु स्वच्छतेच्या नावावर हाती झाडू घेऊन अंगावर कॅमेरांचे फ्लॅश मारून घेत मॉडेलिंग करत फोटो काढून घेण्याचे प्रयत्न असून शकत नाहीत. त्या चमकेगिरी हेच पुरक नाव असेल. आणि ही चमकेशगिरी मोदींसह त्यांच्या पक्षाच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी हाती झाडू घेऊन केली. एकाच जागेवर सात ते आठ हातांनी झाडू फिरवल्या जात होत्या. जणू काही उंदीर आणि झुरळाला मारण्यासाठी चारही बाजूंनी झाडू हाती घेऊन टपून बसावे सावज आल्यास त्यावर हल्ला चढवायचा,असेच काहीसे चित्र झाडू मारणा-या सर्व नेत्यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर दिसून येत होते. क्षणभर तो कचराही घाबरून गेला असेल,अशी ही मंडळी झाडू मारायला उतरल्याचे पाहून. पण झाडू मारल्यानंतर पुढे काय? तो परिसर स्वच्छ झाला का? तिथे परत कचरा जमा होणार नाही, यासाठी काही केले का? अस्वच्छता करणा-यांना कचरा टाकू नये म्हणून आवाहन केले का? किंबहुना तशाप्रकारची जनजागृती या मोहिमेदरम्यान राबवली गेली का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून विचारली जाणार आहेत. कारण याच मुंबईत स्वच्छ-सुंदर आणि हरित मुंबईची संकल्पना तत्कालीन मुंबईचे नगरपाल नाना चुडासामा यांनी राबवली होती. पुढे ही योजना केवळ नावापुरतीच राहिली. ना स्वच्छता दिसली ना हरित मुंबई दिसली. त्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘मी मुंबईकर’ या योजनेची सुरुवातही झाडू हाती घेऊन केली. परंतु उद्धव ठाकरेंनीही हाती झाडू घेत मॉडेलिंग करत फोटो काढत चमकून घेण्यापलीकेकडे काहीच केले नाही. त्यामुळे अशा योजना या केवळ आणि केवळ आम्ही काही करतोय,करून दाखवतोय याचे चित्र निर्माण करण्यासाठीच केल्या जातात. यातून शंभर टक्के निकाल हा कधीच अपेक्षित नसतो किंबहुना तो मिळावा,अशी त्यांची मानसिकता नसते. ती योजना यशस्वी करण्याकरता त्यांचे हातही झटताना दिसत नाही. त्यामुळे निवडणुका डोळयासमोर ठेऊन चमकेशगिरी करण्यासाठी घेतलेल्या योजनांमधून मुंबई काय किंवा महाराष्ट्र काय किंबहुना हा संपूर्ण देश कधीच स्वच्छ होऊ शकत नाही. आपला परिसर आणि आपले शहर, राज्य स्वच्छ ठेवायचे असेल तर आधी प्रत्येक जनतेने मनापासून प्रतीज्ञा घेत यापुढे कधीही कचरा बाहेर टाकणार नाही. अस्वच्छता करणार नाही,असे ठरवले पाहिजे. त्यामुळे जेव्हा मनापासून स्वच्छतेची आवड लोकांमध्ये निर्माण होईल, तेव्हा अस्वच्छता करण्याची कोणाचीही मानसिकता होणार नाही. परिणामी सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वच्छता निर्माण झालेली पाहायला मिळणार नाही. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी मनामनांमध्ये अस्वच्छता न करण्याचे बिंबवत त्यांना अशाप्रकारे धडे दिले गेले तरच प्रत्येक परिसर स्वच्छता राखला जाईल, हे निश्चितच.
पण या सर्वामध्ये आश्चर्यकारक बाब म्हणजे मुंबई महापालिकेने घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचे. मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख आदींनी दूरदर्शनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली. महापालिकेने मुळातच अशाप्रकारची स्वच्छता राबवण्याऐवजी अन्य संस्था, प्राधिकरणे यांना स्वच्छता राखण्याचे धडे दिले असते तर समजण्याजोगे होते. पण ते सोडून स्वत:च झाडू हाती घेतली. बरं या लोकांनी झाडू मारायची कुठे, तर महापालिका मुख्यालयासमोर. जिथे कायमच चकाचक असते. त्याच परिसरात आयुक्तांनी आपल्या टीमसोबत हाती झाडू घेत स्वच्छता राबवणे म्हणजे अनिर्णित सामन्यात स्टार खेळाडूने शतक, द्विशतक ठोकून आनंद व्यक्त करण्यासारखा प्रकार आहे. रस्ते, महापालिकेच्या मालकीच्या जागांमध्ये स्वच्छता राखण्याचे मुंबई महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. ते कर्तव्य महापालिका पार पडत असते. दरदिवशी निर्माण होणा-या नऊ ते साडेनऊ मेट्रिक टन कच-याची साफसफाई करून तो कचरा संकलन केंद्राद्वारे जमा करत त्याची विल्हेवाट डम्पिंग ग्राउंडवर लावली जाते. त्यामुळे महापालिका आपले बंधनकारक कर्तव्य पार पाडत असते. परंतु रेल्वे, बीपीटी, एमएमआरडीएससह ज्या अन्य संस्था आणि प्राधिकरणे आहेत, जे कधीच स्वच्छता योग्यप्रकारे राबवत नाही, त्यांच्यासाठी या मोहीम बंधनकारक असणे समजण्याजोगे आहे. परंतु त्यात महापालिकेलाही स्वच्छता राखण्यास सांगणे आणि महापालिकेच्या प्रशासनाने केंद्राच्या आदेशाचे पालन करत ही स्वच्छता मोहीम राबवणे ही नक्कीच खेदजनक बाब आहे. बरे, आयुक्तांना जर ही स्वच्छता मोहीम राबवायची होती, तर मग त्यांनी मुख्यालयाचा परिसरच का निवडला हाही प्रश्न आहे. जर झाडू हाती घेत साफसफाईच करायची होती तर मग धारावी, माहीम, देवनार, चित्ता कॅम्प, गोवंडी, मानखुर्द, भांडुप, कांदिवली, मालाड आदी भाग होते. तेथील अनेक भागांमध्ये रस्त्यारस्त्यांवर, वसाहतींमध्ये कच-याचे ढीग पडलेले आहेत. तेथे ही स्वच्छता मोहीम का राबवली नाही. जर या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली असती तर तो परिसर किमान स्वच्छ करता आला असता. अशा स्वच्छतेमुळे महात्मा गांधींना ख-या अर्थाने श्रद्धांजली वाहता आली असती. परंतु आयुक्तांना असे अस्वच्छ भाग निवडून स्वच्छता मोहीम राबवावी असे वाटले नाही. आयुक्त आणि शिलेदारांनी हाती झाडू राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचे फोटो एवढे बोलके आहेत की, नक्की ही मंडळी झाडू मारतात की क्रिकेटचा सराव करतात हेच समजत नाही. आयुक्तांच्या हाती काठीला लावलेली झाडू आणि खातेप्रमुखांच्या हाती खराटा. परंतु ही काठीवाली झाडू हाती घेऊनही त्यांना ती झाडू मारता येत नव्हती. झाडू मारताना काठीवर एवढा जोर दिला जात होता की ती झाडूही वाकली जात होती. त्यामुळे झाडू मारणे हे केवळ आपण उपकारच करत आहोत, असाच काहीसा संदेश यातून मिळत होता. खऱ्या अर्थाने झाडू मारणे हीसुद्धा एक कला आहे. झाडू मारणा-या सफाई कामगारांना आपण नेहमी कमी लेखतो. परंतु तासन्तांस वाकून झाडू मारणा-या या कर्मचा-याची ठरावीक लांबीचा रस्ता किंवा वसाहतीत साफसफाई करताना काय अवस्था होत असेल, हे पाच मिनिटातच झाडू हाती घेतल्यावर आयुक्तांसह त्यांच्या शिलेदारांच्या लक्षात आले असेल. असो मोदींना, हाती झाडू घेण्याची प्रेरणा ही आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्याकडून मिळाली असेल. आणि त्यासाठी त्यांनी २ ऑक्टोबर दिवस निवडून ही मोहीम राबवली असेल. पण आज पंतप्रधान झाल्यावर जे मोदींना सुचले होते ते १९६३ साली तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सुचले होते. त्यांनी अशाचप्रकारे राज्यात स्वत:सह अनेकांच्या हाती झाडून साफसफाई मोहीम चालवली होती. त्यामुळे अशाप्रकारची कल्पना केवळ मोदींनाच सुचू शकते, अशातला भाग नसून प्रत्यक्षात अशा योजना राबवून स्वच्छतेचा कोणता मंत्र आपण जनतेला देऊ शकलो, हे सांगणे अपेक्षित आहे. संतगाडगे महाराजांनी हाती झाडू घेत साफसफाई मोहीम राबवली, त्या केवळ वृत्तपत्र आणि चॅनेल्सवर चमकण्यासाठी नव्हत्या. त्यावेळी जर अशाप्रकारे प्रसारमाध्यमांचे मोठे प्रस्थ असते तर गाडगेबाबांची किर्ती अजून सर्वदूर पसरली असती. अर्थात त्यांचे कार्य आजही सातासमुद्रापार पोहोचलेले आहेतच, यात कोणतीही शंका नाही. परंतु गाडगेबाबांनी ज्या नित्सिमभक्तीने साफसफाई मोहीम राबवली होती, त्याच भक्तीने ही मोहीम राबवली गेली तर मग ही योजना सार्थकी लागेल. परंतु अशाप्रकारे स्वच्छता राखली जावी, अशी कुणाचीच मानसिकता नसून निवडणुकीच्या या धामधुमीत आपल्या पक्षाची आणि उमेदवाराची पोळी कशी भाजून घेत त्यांच्या पदरी मते कशी पाडून घेता येईल, याचाच सर्वच विचार करत आहेत. त्यामुळे संत गाडगेमहाराजांनी घालून दिलेला स्वच्छतेचा मंत्र आज सर्वार्थाने सर्वानीच जोपासण्याचा नव्हे तर आत्मसात करण्याची वेळ आली आहे. स्वच्छता राखण्यासाठी २ ऑक्टोबर उजाडावा किंवा पंतप्रधानांनी निवेदन करावे, याची वाट न पाहता प्रत्येक जनतेने आपल्या घराप्रमाणे आसपासचा परिसर, कार्यालय, त्याभोवताचा भाग, रस्ता, पदपथ, उद्यान, मैदान आदी ठिकाणी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या मोहिमांची आवश्यताही नाही. आणि जेव्हा आपले अंगण आपण साफसुफ राखायला शिकू तेव्हाच पर्यायाने आपले शहरही स्वच्छ राखले जाईल. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी आता स्वच्छतेसाठी सज्ज व्हायला हवे, हेच या माधमातून सांगता येईल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदारांस दत्तक वस्ती योजना देऊन आपले हात वर करून घेतले आहे. कंत्राट दारानेसुद्धा नगरसेवकांनाहि आपल्या हाताशी बाळगले आहे. त्यामुळे आपल्या विभागातील नगरसेवकांकडे हे बघण्यास वेळही नाही कि आपण ज्या कंत्राटदारास काम दिले आहे ते काम त्याने कधीच केले नाही. आम्ही आमचा विभाग स्वच्छः ठेवू असे हमीपत्र देऊन ते नगरसेवकांकडून कंत्राट उचलतात. आजही त्यांचे कामगार रस्त्यावरील थोडी बहुत साफसफाई अर्धा, एक तासात पूर्णकरून पूर्ण दिवस भराचा पगार घेऊन जातात. पालिकेने दिलेली रक्कमेतील ८० टक्के रक्कम कंत्राटदाराच्या घशात जाते. जरी त्यांच्या कामगारांस नाले किंवा गटारे साफ करण्यास सांगितली तर ते तेथील स्थानिक नागरिकास उंच स्वरात धमकी देतात कि “ये काम हमारा नही है और ज्यादा बोलोगे तो हम और हमारे कंत्राटदार साहब तुम्हे कुत्ते कि तरह मारेंगे, नही तो झुटा केस करके पोलिस चौकी में लेजाकर मारेंगे. हमारे साहब को नगरसेवक, आमदार नही पुछ सकता तो आप कौन है?” जर कंत्राटदाराच्या एकाही माणसास बोललात तर तो विचारतो कौन बोला बोल पोलिसचौकी में सेटिंग लगायी है तू सिर्फ झगडा कर उसे मै अंदर कर दुंगा आणि हि खरी परिस्थिती आहे. संत गाडगे महाराजाने स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे शिकवले आणि गोपाला गोपाला देव कि नंदन गोपाला हा कानमंत्र दिला. आजही परप्रांतीय महाराष्ट्रात येत आहे त्यांना सुद्धा मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्र पोलिस अडवू शकत नाही. त्यांची दादागिरी हि पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. आजही रस्त्यावर त्यांनी भाजीपाल्यांची बिनापरवाने दुकाने मांडली आहे, महापालिका हि त्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही. त्यांच्या अधिकार्याने जर त्यांच्यावर कारवाई केली तर ते त्यांना त्यांच्या फिल्मी अंदाजमध्ये उत्तर देतात कि “हम यहा कोनो भिक नाही मांगत है, दिनरात मेहनत करत है, हमारे गांवमें कोनो रोजगार उपलब्ध नाही, इका खातीर हम यहा आये, हमार गांव में हमार दादा है, दादी है, मां है, बापू है, बेटा है, बेटी है, पोता है, पोती है, उका भुके रहेंगे. उन सारो कि जिम्मेदारी हमार पर है.” अशा गरीब कथा सांगितल्या तर कोणता पालिका अधिकारी किंवा पोलीसवाला त्यांना मारहाण करेल. रस्तोरस्ती मांडलेल्या दुकानामुळे आजही मुंबईचे रस्ते जाम आहे, त्याच दुकानामुळे आज आपले गटारे नाले तुंबले आहेत. प्रत्येक ठिकाणी ह्यांनी घाण करायची आणि तेथील स्थानिक व्यक्तींनी ती साफ करत बसायची, याला जबाबदार कोण पालिका कि कंत्राटदार कि बाहेरून येणारे पर प्रांतीय. सरकारी किंवा निमसरकारी (खाजगी कंपन्यातील) चतुर्थ श्रेणी कामगार सुद्धा आपली दिवसाची हजेरी लावून घरी स्वस्थ बसतो, हे कित्येक जनतेला माहित आहे. आम्हाला काम कुठे असते, असे उत्तर ते अधिकारी वर्गास देतात. म्हणून २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंतीचा दिवशी सर्व कार्यालये चालू ठेवून प्रथम वर्गीय अधिकार्यास सुद्धा साफ सफाई करावी लागली. किती हि साफ सफाई केली तरी खोडकर व्यक्ती पुन्हा ते परिसर घाण करून ठेवतो आणि मग भांडण उद्भवते अशा वेळेस पोलिस का तक्रार घेणार आहे का ? तेही खोट्या तक्रारीवर हा ला हा मिळवून मोकळे होतात, ते अशा लोकांना का बरे घाबरतात ह्याचे मुळ कारण हि आपला देश स्वतंत्र झाल्यापासून कळून चुकले नाही. काय त्यांना पैश्याचा हव्यास आहे कि पद आणि खुर्चीचा मोह. नुसते पोलिस अधिकारीच नव्हे तर पालिकेतील कर्मचारी वर्ग सुद्धा घाबरतात मग सरकारी नोकऱ्या करतात तरी कशाला. सदैव नागरिकांकरिता जागरूक असे यांचे घोष वाक्य चुकीचे असावेत.