सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. ही कुस्ती मॅटवरची आहे, की लाल मातीतली आहे, याचा अंदाज एवढय़ात येणार नाही. पण खडाखडी नक्की आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारात भांडणे होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रात दौरा करू लागले की, एकमेकाला संधी मिळेल तिथे, मिळेल तेव्हा चांगला चिमटा काढायचे.
सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. ही कुस्ती मॅटवरची आहे, की लाल मातीतली आहे, याचा अंदाज एवढय़ात येणार नाही. पण खडाखडी नक्की आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारात भांडणे होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रात दौरा करू लागले की, एकमेकाला संधी मिळेल तिथे, मिळेल तेव्हा चांगला चिमटा काढायचे. कधी कधी तुटून पडायचे. बाहेर असे वातावरण तयार झाले होते की, मंत्रिमंडळात गळय़ात गळे घालणारे बाहेर आल्यावर एवढे कसे भांडू शकतात? पण यातले मुख्य सूत्र होते सत्ता.
या दोन्ही पक्षांना सत्ता हवी होती. त्यामुळे नवरा-बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा सगळे शांत होते, तसाच प्रकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा होत होता. जेव्हा दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष सत्तेसाठी नाईलाजाने एकत्र?येतात, तेव्हा असे भांडण अपेक्षित आहे. पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सगळे नेते बाहेर बोलताना सांगायचे की, आम्ही कितीही भांडलो तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक आहोत आणि शेवटच्या घटकेपर्यंत ते एक राहिले. जेव्हा असे लक्षात आले की, आता काँग्रेसबरोबर राहून फायदा नाही, तेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली. तो त्यांचा निर्णय किती अंगलट आला, हे त्यानंतर स्पष्ट झाले आहे. पण मूळ मुद्दा होता भांडणाचा. ते भांडण १५ वष्रे या ना त्या रूपाने सुरूच होते.
आता भाजपा-सेनेचे सरकार आल्यानंतर जवळपास तीच स्थिती आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मूळ संस्कृती ही काँग्रेसची संस्कृती होती. सेना-भाजपाची संस्कृती एक नाही. बाळासाहेब ठाकरे असताना भाजपासोबत सेनेची जरी युती होती, तरी बिनधास्त बाळासाहेब भाजपाचा उल्लेख चक्क ‘कमळाबाई’ असा करत आणि या उल्लेखाबद्दल भाजपाच्या त्या वेळच्या नेत्यांनी बाळासाहेबांकडे नाराजी व्यक्त करण्याची हिंमतसुद्धा दाखवली नाही. शिवाजी पार्कच्या जाहीर सभेतही बाळासाहेब भाजपाला कमळाबाई म्हणत. १९९५च्या निवडणुकीनंतर या कमळाबाईसोबत सेनेने सरकार स्थापन केले. त्यावेळी कमळाबाईच्या पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे होते. त्या तगडय़ा नेत्यामुळे टोमणेबाजी झाली तरी, भाजपाचा एक दरारा होता आणि बाळासाहेबांना मुंडे यांच्याबद्दल प्रेम होते.
आताच्या भाजपा सरकारात मुंडे यांच्या पासंगाला पुरेल, असा एकही नेता नाही. जे आहेत ते मुंडे यांचे शार्गीद आहेत. शिवाय सेनेत आता बाळासाहेब नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तगडय़ा नेतृत्वाचे अवमूल्यन झालेले आहे. तरीसुद्धा धुसपूस वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले भांडायचे; पण राष्ट्रवादीच्या कोणाही मंत्र्याने ‘राज्याचे मुख्यमंत्री दोन नंबरचे पैसे घेतात,’ इतका बेफाम आरोप कधीही केलेला नव्हता. या सरकारातले मंत्री रामदास कदम यांनी हा आरोप उघडपणे केला आणि आज ज्या भाजपावाल्यांच्या नाकाला ‘मोदींमुळे पराभव झाला’ या वाक्यामुळे मिरच्या झोंबल्या आहेत, त्यांना मुख्यमंत्री दोन नंबरचे पैसे घेतात, या आरोपावरून कसलीच खंत वाटली नव्हती. खरे तर एखाद्या मुख्यमंत्र्याने मंत्रिमंडळातून असे आरोप करणा-या मंत्र्याला ‘सॅक’ केले असते. फडणवीसांजवळ तेवढी हिंमत नाही. त्यामुळे फडणवीसांवरचा आरोप कायम राहून त्याचे खंडनही झाले नाही आणि रामदास कदम मंत्रिमंडळातून बाहेर पडले नाहीत.
एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी हा आरोप नाकारला नाही, असे म्हणता येईल. इथून आरोप-प्रत्यारोपाची सुरुवात झालेली आहे. जर एवढा गंभीर आरोप केल्यावर मुख्यमंत्री गप्प राहिले तर?त्याचा फार वेगळा अर्थ होतो, हेही त्यांच्या लक्षात येत नाही किंवा अधिकार वापरायला त्यांची िहमत होत नसावी. या पूर्वी महाराष्ट्रात असे व्यक्तिगत आरोप कधीही झाले नाहीत आणि काही राजकीय आरोप झाल्यावर शंकरराव चव्हाण यांनी दिग्गज असलेल्या वसंतदादा पाटील यांना मंत्रिमंडळातून ‘सॅक’ केले होते. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी महसूलमंत्री शालिनीताई पाटील आणि ग्रामविकासमंत्री बाबूराव काळे यांना मंत्रिमंडळातून ‘सॅक’ केले होते. विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री असताना रणजीत देशमुख आणि हुसेन दलवाई यांना ‘सॅक’ केले होते आणि हे सगळे काढून टाकण्यात आलेले मंत्री एका पक्षाचेच होते. सेना-भाजपामध्ये आता जे आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत, ते आरोप दोन स्वतंत्र पक्ष एकमेकांवर करीत आहेत. त्यामुळे त्याचे स्वरूप आणखीनच गंभीर आहे.
नाईलाजाने एकत्र बांधलेली ही मोट आहे. फार दिवस या पद्धतीने एकत्र नांदणे, या दोन्ही पक्षांना शक्य होणार नाही. मुळात सेनेजवळ तगडा मंत्री नाही. त्या मंत्र्यांचे अवमूल्यनसुद्धा त्यांना अवमूल्यन वाटत नाही. सुभाष देसाई उद्योगमंत्री आहेत. दावोस येथे जे उद्योग प्रदर्शन भरले होते, त्या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उद्योगमंत्र्याला सोबत नेले नाही आणि त्यांनी प्रदर्शनाला जावे, अशी त्यांना परवानगीही दिली नाही. महाराष्ट्राचा उद्योगमंत्री इथे हात चोळत बसला. राज्याच्या मुख्यमंत्र्याने मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आणि ‘एमआयडीसी’ यशस्वीपणे चालवणारे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांना आपल्या सोबत नेले.
सेनेला हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहेर होता. आता सेनेचे मंत्री तक्रार करीत आहेत की, आम्हाला किंमत नाही. किंमत अशी मागून मिळत नसते. ती आपल्या दरा-याने मिळवून घ्यायची असते. आता तरी स्थिती अशी आहे की, केंद्रात मोदी जसे स्वत:च सगळे करीत आहेत, बाकी कोणत्या मंत्र्यांना किंमत नाही, तीच गोष्ट महाराष्ट्राची आहे. निर्णय कोणताही होत नसला तरी सब कुछ फडणवीस आहेत आणि त्यामुळे सेनेचा तडफडाट आहे. पण नुसता तडफडाट करून काय होणार? सत्ता सोडण्याची हिंमत दाखवणार आहेत का? तेवढी हिंमत उद्धव ठाकरे यांच्यात आहे का? उद्या सत्ता सोडली आणि दोन वर्षानंतर निवडणूक असलेली मुंबई महापालिका सेनेच्या हातातून गेली, तर मग हे दुकान चालायचे कसे? त्यामुळे जरी काटाकाटी झाली, काही वेळा जुंपली, तरी ही नूरा कुस्ती आहे, हे महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे.
हि तर झांकी आहे आनेवाली आंधी बाकी आहे .