दौलतरावांचे बोलणे व्यवहारी होते, कारण तुरा आलेला उसांचे वजन कमी भरते त्यामुळे गुळाला पिवळा धमक रंग येत नसे. मग शेतक-यांपासून गु-हाळ मालकापर्यंत सर्वाचेच हाल होते. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला उस मातीमोल दराने द्यावा लागे.
नुकतीच सुगी संपत चालली होती. वळीवाच्या पावसाने उघडीप दिल्याने राहिलेली शेतीची कामे, भूईमूग, तूर, उडीद काढण्याची लगभग चालू होती. काही जण गवत काढणी व रब्बी पेरणी करण्यात गुंतले होते. दिवाळीतील दोन-तीन दिवस वगळता यंदा शेतक-यांची पार दैना उडाली होती. पाऊस-पाणी चांगला झाल्याने प्रत्येकाच्या अंगावर मूठभर मास चढले होते. प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये पेरणीच्या कामात गुंतून गेला होता. कार्तिक महिना (ऑक्टोबर-नोव्हेंबर) असल्याने उन्हाच्या काहिलीने प्रत्येक जीव घालमेला झाला होता. भात कापणी झाल्याने शेतकरी थोडासा हलका झाला होता. काहींच्या शेतामध्ये नांगरट चालू होती अख्खा गाव शिवारात दिसत होता. प्रत्येकजण शेतामध्ये गहू, हरभरा, मका पेरण्यात दंग होता. मात्र दौलू कारभारी याला अपवाद. कारभारी आपल्या दातामध्ये काडी घालत विचार करत होते, पाऊस-पाणी चांगले झाल्याने यंदा पिकं चांगली आली होती. शिवारामध्ये कारभा-याची पाण्याखालची १०० बीग काळी कसदार जमीन होती. ते मोठे जमीनदार म्हणून सर्वपरिचित होते. १२ बैलाचा नांगर पूर्वी त्यांच्याकडे होता. इतकेच नव्हे तर ज्यावेळी विहिरीतून मोटेने पाणी काढत असत, त्याकाळी दौलतरावांकडे किर्लोस्करचे हत्ती (मोठे) इंजीन होते. २० ते २५ जनावरांनी गोठा भरलेला होता. दुध-दुभत्यांची कमतरता नव्हती. घरामध्ये त्यांचा इतका धाक होता की, कारभा-याच्या नजरेस नजर द्यायची कुणाची हिंमत नव्हती. चौरंगी वाडा आणि वाड्यांच्या मधोमध बालीग्यांवर बसून पान खात कारभारी बसत. वाडा एवढा प्रशस्त होता, यावरूनच त्यांच्या श्रीमंतीची प्रचिती येत होती. दहा-पंधरा गडी, दोन विहिरी, बुलेट गाडी आणि दरवर्षी लोकांना ६ महिन्यांचा रोजगार मिळवून देणारं ‘गुऱ्हाळ’. दौलतराव बालीग्यावर आज एकटेच बसले होते. कोणत्यातरी विचारात हरवून गेले होते. आज त्यांचे उतरते वय असले तरी नावाप्रमाणे सर्व प्रकारची खरी दौलत त्यांच्याकडेच होती. आम्ही मात्र त्यांना ‘दादा’ असे अदबीने म्हणत असू. मी माझ्या काकासोबत वाड्यावर गेलो होतो. काकांना तसा त्यांनी निरोप धाडला होता. काकालासुद्धा भारी मान होता. त्यांच्यासारखा खमक्या गुळव्या (गुळ तयार करणारा) अख्ख्या भागात नव्हता त्यांच्यावर दौलतरावांचा भारी लळा होता. ते काकाला मास्तर म्हणूनच हाक मारत असत (पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या काकाला का मास्तर म्हणत, ते त्यावेळी मला कळत नसे. नंतर कळले, हुशार माणूस म्हणून मास्तर). काकाही त्यांना ‘दादा’ या नावानेच हाक मारत. आम्ही वाड्याच्या आत शिरलो, तोच कारभारी दात टोकरतच ‘मास्तर’ निरोप मिळाला नाही का? तसा काका चाचपडत म्हणाला, ‘‘हो मिळाला, पण मी मळ्यात उसाला पाणी देत होतो. काय काम दादा गरीबाकडं काढलसा?’’
तसे दौलतराव मास्तरांकडे बघत, ‘‘यावर्षी लान (सुगी) वाढली. सिलगनांला दरवर्षी गुऱ्हाळाचा (उसाचा गुळ तयार करण्याचा छोटे खानी कारखाना) मूहूर्त असतोय. गेली चाळीस वर्षे व माझ्या बाच्या म्हणजे सुभानरावांच्या हयातीपासून आपलं गुऱ्हाळ तुळशीच्या लग्नाच्या मूहूर्तावर चालू होतं. आजून कशाचाच पत्ता नाही. तूपण वाड्यावर फिरकलास नाय. आमच्या पुढच्या पीडीच्या डोक्यात कारखान्याच्या साखरेने घोळ घातलाय. परंतु जोपर्यंत मी जीता (जिवंत) आहे तोपर्यंत गुऱ्हाळ असणारच’’ असं खमक्या आवाजात टेचात बोलले तसे मास्तर (गुळव्या) चाचपडत ‘‘होय दादा!’’ म्हणाला.
‘‘मग उशीर कशाला करताय, गुऱ्हाळ (काही ठिकाणी ठिय्यासुद्धा म्हणतात) येत्या पंधरवड्यात सुरू झालं पाहिजे. जर का एकदा उसाने तुरा टाकावयास सुरुवात केली, मग गुळाला वाण येणार नाही की, बाजारात त्याला किंमतही येणार नाही.’’ दौलतरावांचे बोलणे व्यवहारी होते, कारण तुरा आलेला उसांचे वजन कमी भरते त्यामुळे गुळाला पिवळा धमक रंग (कलर) येत नसे. मग शेतक-यांपासून गुऱ्हाळ मालकापर्यंत सर्वाचेच हाल होते. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला उस मातीमोल दराने द्यावा लागे. दर काय मास्तर आपल्या हातात असतो का? तसे माझे काका भानावर आले, ‘‘होय. तुम्ही म्हणता ते दादा खरं हाय! पण यंदा लाणीमुळं माणसं मिळत नाहीत. मास्तर मी येतो तुमच्या बरोबर ह्या जासूदांच्या गुऱ्हाळावर. आजवर माणसांची कमतरता कधीच पडली नाय.’’ दृढनिश्चयी असणारे कारभारी मनानं हळवे होते. प्रत्येकाच्या अडअडचणीस धावून जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना दहा गावांत मोठा मान होता. मी आपली काकाची पैरण धरून सर्व गोष्टी ऐकत होतो. गुऱ्हाळाचा गुळव्या म्हणून आमचा काका (रंगा मास्तर) सर्वाना ठाऊक होता. सांच्याला (संध्याकाळी) आपण जाऊ, असे कारभारी बोलल्यावर आम्ही वाड्यातून बाहेर पडलो. गु-हाळाच्या विचाराने आणि गुळाच्या वासाने (नुसती कल्पना) माझ्या अंगात चैतन्य पसरले, कारण मीही माझ्या आजाचं जेवण घेऊन प्रत्येक वर्षी गुऱ्हाळात जात होतो. आजाच्या मागे हे सर्व बंद पडले होते. परंतु गतदिवस माझ्या डोक्यातून जात नव्हते. आम्ही मुलं टंबरयाल (रस प्यायचं लोखंडी भांड)ने मधल्या सुट्टीत रस पित असू, त्यावेळी माझा आजोबा गुळव्या असल्याने मला कोणी हाकलत नव्हते. मीही मूठभर मास आल्यासारखा वागत होतो. त्यावेळी कारडेवाडी आमेणी, गुळणेवाडी, माणगाव आकुळे गावची माणसं गुऱ्हाळावर असत. सायंकाळी कारभारी नी मास्तर माणसे बघायला गेले होते. परंतु मी मात्र गुऱ्हाळातच डुंबलो होतो. ज्यांच्याकडे बैलगाडी असे लोक फडात काम करत असत (फड म्हणजे उसाचे शेत). फडकरी म्हणून हरण्यानाना असे. त्याच्या हाताखाली १५ ते २० गडी असायचे. रोज पहाटे तीन वाजता फडकरी ऊस तोडावयास शेतात जात असत. सगळ्यात जास्त कमाई ही त्यांनाच असे. कारण उसाचा पाला (वाडं) यांच्याच वाट्याला असल्याने वरकमाई त्यांचीच होत होती. फडातील सर्व ऊस बैलगाडीनी गुऱ्हाळावर आणला की, नंतर तो घाण्यावर टाकला जात असे (ऊसापासून रस काढण्याची जागा). तिथल्या आठ ते दहा माणसांना घाणेकरी असे म्हणत. यांना मात्र थोडीसी उंसत मिळत असे. कारण रस साठवण्यास जमिनीत मोठे भांडे होते त्यातून तो रस यंत्रामार्फत पाईपने वरच्या कायलीत चढवला जाई, तिथून जमा झालेल्या रस मोठय़ा कायलीमध्ये (चुलाणावरील भांडे) ओतला जात असे आणि तिथून पुढे खरे काम चालत असे. कांरडेवाडीचा शिवा कांरडा, नामदादा, शेटबाबा, नथू चरणकर व बंडूआबा हे पट्टीचे चुलवाणी होते. यांच्या जिवापारच अख्खा गुळाचा वाण ठरत असे. त्यानंतर खरे काम चाले ते मास्तरांचे ते गुऱ्हाळाचे मुख्य गुळवे होते. गुडघाभर चड्डी, अंगात बंडी डोक्यावर टोपी अशा पेहरावात रंगा मास्तर गुळ तयार करत असत. त्यांना माझ्या आजोबानेच तरबेज केलं होतं.
आम्ही मुलं सोड्याच्या गुळाचा आशेने बांधावरील भेंड्याची झाडे मुळासकट उपटून आणत आणू. (त्या भेंड्या म्हणजे गुळ तयार करण्यासाठी लागणारे मिश्रण होय.) गुऱ्हाळामुळे ५० ते ६० लोकांना पाच ते सहा महिन्यांचा हक्काचा रोजगार व धायभर गुळ मिळत असे. कायलीत रस गरम करून गुळपाक तयार झाला की, दोरखंडाच्या सहय़ाने दहा ते पंधरा गड्यांनी गुळपाक वाफ्यात ओतला की वल्हय़ाच्या मदतीने तो गुळव्या तयार करी. खरी कसरत गुळव्याची इथेच होई. नंतर वेगवेगळ्या प्रकारची पावडर टाकली की, गुळाला कलर येत असे. नुसत्या वासाने मन प्रफुल्लीत व आनंदी होत असे. आम्ही बोटानेच गरम गरम गुळ खात असू. आम्ही कांडी गुळ, सोडा गुळ व छोट्या-छोट्या गुळाच्या ढेपा बनवत असून. अशी अनेक गुऱ्हाळं आमच्या भागात होती, त्यामध्ये रावणाचे आणि दौलतराव जासूदांचे ही मुख्य व मोठी गुऱ्हाळे होती. माणगावचं पडवळाचं गुऱ्हाळ, नेर्लेच्या दिंडेचं, भेडससगांवच्या भानुदास निजामाचं गुऱ्हाळ, कापशीच्या बंडू कदमाचं अशी अनेक गुऱ्हाळे होती. आम्ही दररोज एक गुऱ्हाळ बदलत असू. थोडा गुळसुद्धा फडक्यातून घरी आणत असू.
कडसू पडलं होतं चपलांच्या आवाजानं मी तंद्रीतून बाहेर आलो तर रंगाकाका बरोबर दौलतराव आमच्या घरी आले. धष्टपुष्ट दादा आता वयानुसार थकले होते. मात्र त्यांचा खर्जातला आवाज तसाच होता. त्यांच्या बोलण्यात दुस-यांची काळजीच दिसत होती, ‘‘रंगा पुढल्या वर्षी काय आपला ठिय्या (गुऱ्हाळ) होईल आसं वाटत नाही. मुलांना कारखान्यात उस घालण्याची घाई झाली. त्यांना काय यात रस नाय आणि माणसं भी मिळत न्हाईत. पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत.’’ दादांच्या आवजातली कळकळ मला दिसत होती. गेल्या दोन पिढय़ांपासून असलेला गुऱ्हाळचा ठिय्या पुढच्या वर्षापासून नसेल या कल्पनेतच मन हेलावून गेलं. ज्या गुऱ्हाळाच्या अंगा-खांद्यावर आमचं बालपण गेलं, त्याचा बाज, त्याची ऐट, त्याच्या चुलवणातून ओकणारा धूर..पन्नास ते साठ जणांचं कुटुंब रस्त्यावर येणार, या कल्पनेनेच माझं मन गलबलून गेलं. दौलतरावांनी आयुष्यभर दुस-यावर दौलत अदा केली. उभ्या आयुष्यात दुस-याचा विचार करणारा माणूस पुन्हा कदापि सापडून मिळणार नाही. या रात्री मला झोप लागली नाही. आजही कधी भुतकाळातल्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा दौलतरावांसारख्या उमदा माणूस डोळ्यांसमोरून जात नाही. आज ज्या ज्या वेळी मी गावी जातो, त्या त्या वेळी जुन्या किल्ल्याप्रमाणे जीर्ण अवस्थेत जासूदांचे गुऱ्हाळ दिसते. कुठेही घाण्यांचा आवाज नाही की, धूर ओकणारी गुऱ्हाळाची चिमणी नाही. सगळीकडे स्मशानशांतता. जिथं गुऱ्हाळ होतं त्याच्या समोरच दादांचा या दगडी अर्धपुतळा तोही जीर्ण अवस्थेत दिसतो. माणसाचं खरं वैभव जिवंतपणीच असतं. तो गेल्यावर राहतात त्या आठवणी. आज गावाचं रूपडं ही बदलत चाललं आहे. शहरीकरणाची झूल त्याने कधीच अंगावर घेतली आहे. परंतु ते गाव आणि ती दौलतरावांची दौलत मात्र तशीच फक्त मनात उरली आहे.
फारच छान लिखाण !