आपल्याकडे कोणता विषय कधी राजकीय रूप धारण करील याचा सध्या कोणताही नेम राहिलेला नाही. २०१४ साली भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणार याची चाहूल लागताच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही. मात्र भारतीय जनता पार्टीचे सहानुभूतीदार म्हणून त्यांचा वावर सुरू झाला. अशा सहानुभूतीदारांच्या कळपातील एक नाव म्हणजे योगगुरू रामदेव बाबा.
गेल्या काही दिवसांत ‘भारतमाता की जय’ ही केवळ घोषणा राहिली नसून तिला राजकारण्यांनी वाद-विषयाचे स्वरूप दिले आहे. या देशात कायद्याची यंत्रणा आहे, अन्यथा ‘भारतमाता की जय’ असे न म्हणणा-या हजारो लाखो जणांची मुंडकी आम्ही कापून टाकली असती, असे उद्गार रामदेव बाबा यांनी मध्यंतरी काढले. अत्यंत हिंसक आणि चिथावणीखोर अशा या उद्गारांबद्दल रामदेवबाबा यांच्यावर पोलिसी कारवाईच व्हायला हवी होती, पण रामदेवबाबा सत्तारूढ भारतीय जनता पार्टीचे पाठीराखे असल्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई होताना दिसत नाही. लोकांना योगासनांचे धडे द्यावेत, त्यांचे प्रकृतीमान ठणठणीत राहावे याची आपल्या परीने काळजी घ्यावी हे खरे तर या बाबांचे काम, पण गेल्या दीड पावणेदोन वर्षात रामदेवबाबा योगासनाबद्दल कमी आणि राजकारणाबद्दल अधिक बोलताना दिसतात. बाबा, बापू, बुवा आणि साधून महंतांची भारतात नेहमीच चलती राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर अनेक साधू-महंत थेट भारताच्या लोकसभेत निवडून आले आहेत. बेधडकपणे कोणतीही विधाने करायची, त्यांच्या परिणामांची पर्वा करायची नाही, असा या मंडळींचा खाक्या असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी अनेकदा अडचणीत आली आहे. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून या मंडळींचे प्रताप वाढीस लागले. आपण काही चुकीचे बोलत आहोत, त्यातून समाजात अयोग्य संदेश जाऊ शकतात आणि त्यांचे सामाजिक परिणामही भयावह असू शकतात याची कसलीही फिकीर या मंडळींना नसते. रामदेवबाबा यांनी याच पठडीतील वक्तव्य केले आहे. मुस्लीम एतदुल्लाह मुसल्मीन (एमआयएम) या पक्षाचे स्वयंघोषित संस्थापक ओवेसी यांनी सर्वप्रथम आग भडकवण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्या गळ्यावर कुणी सुरी ठेवली तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही’, असे उद्गार या ओवेसींनी काढले आणि क्रियेवर प्रतिक्रिया उमटावी, तशा पद्धतीने रामदेवबाबा यांचेही हिंसक विधान जाहीर झाले. आपल्या मागे संपूर्ण मुस्लीम समाज आहे अशा थाटात ओवेसी यांचे वागणे आणि बोलणे असते, पण त्यांनी ‘भारतमाता की जय’ संदर्भात जे विधान केले त्याला मुस्लीम समाजातून काडीचाही प्रतिसाद मिळाला नाही. अगदी अलीकडेच काही सुशिक्षित मुस्लीम तरुणांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतात आमचा जन्म झाला आहे, आम्ही लहानाचे मोठे भारतातच झालो आहोत. आमचे शिक्षणही येथेच झाले असून पुढील करिअर आम्ही भारतातच करणार आहोत. हा सर्व विचार करता भारत हीच आमची मातृभूमी असून भारतमाता की जय म्हणण्यात आम्हाला काहीही चुकीचे वाटत नाही. इतके स्पष्ट करून त्या तरुणांनी भारतमाता की जय अशी घोषणाही दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी तर ‘भारतमाता की जय’वर आपले मुख्यमंत्रीपद पणास लावले आहे की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे. जे भारतमाता की जय म्हणणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक येथील भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात केले. सर्वसामान्य माणसालाही मुख्यमंत्र्यांच्या या विधानात अतिशयोक्ती आहे याची जाणीव होते. त्यामुळे विधिमंडळात या वक्तव्याचे पडसाद उमटले नसते, तरच ते नवल ठरले असते. मुख्यमंत्र्यांचे नाशिकातील भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील होते काय असा सवाल करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली. मुख्यमंत्र्यांना बोलते करणे हा कदाचित माजी मुख्यमंत्र्यांचा हेतू असावा. तो सफल झाला असे म्हणावयास हरकत नाही. कारण आपल्यावरील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडवणीस यांनी अंगातील सारे बळ एकवटून वरचा सूर लावल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या देहबोलीतही संताप जाणवत होता. मुख्यमंत्रीपद गेले काय आणि राहिले काय, मी भारतमाता की जय म्हणतच राहणार, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
केवळ भारतीयच नव्हे, कोणत्याही देशाचा नागरिक आपल्या देशाच्या सन्मानाची घोषणा कारणपरत्वेच देतो. यापुढचे चार तास रिकामेच आहेत, चला भारतमाता की जय ही घोषणा देऊ या. असा प्रकार कुणाच्याही बाबतीत घडताना पाहायला मिळणार नाही. अगदी आपले शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा नागरिकही त्याला मिळालेल्या फावल्या वेळात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देत फिरतोय, असे चित्रही पाकिस्तानात पाहायला मिळणे दुरापास्त आहे. वेगवेगळे विषय उपस्थित करून विधिमंडळ अधिवेशनाचे दिवस पार पाडणे, मुख्य विषयांवर सभागृहात होणारी चर्चा टाळावी हाही कदाचित मुख्यमंत्री महोदयांचा हेतू असावा. गेल्या अधिवेशनात राज्याचे तत्कालीन महाधिवक्ता श्रीहरी अणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला धावून आले होते. अणेंची विदर्भ एक्स्प्रेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षातील सदस्यांच्या अंगावर सोडली होती, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि श्रीहरी अणे दोघेही तोंडघशी पडले. अणेंना तर राज्यपालांकडे जाऊन महाधिवक्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. दुष्काळाचा प्रश्न तर कमालीचा गंभीर बनला आहे. गेल्या हंगामात पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने ग्रामीण भागात पाण्याची कमालीची टंचाई निर्माण झाली आहे. लातूरसारख्या ठिकाणी तर रेल्वेने पाणी न्यायची वेळ आली आहे. आता शहरी भागातील बायाबापडय़ांनाही डोक्यावर हंडे घेऊन पाणी शोधत फिरावे लागत आहे. ही अत्यंत आणीबाणीची वेळ आहे. संपूर्ण राज्यावर ओढवलेल्या या संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आणि विरोधकांनीही सर्व मतभेद विसरून, एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा. ‘भारतमाता की जय’सारखे राजकारण काय, यापुढेही मुख्यमंत्र्यांना करता येईल. पण सध्या त्याची गरज नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
आपल्या वृत्तपत्रातील परखड लिखाण आवडते. खर्या अर्थाने प्रहार हे नाव सामारोक आहे.
खर्या अर्थाने प्रहार नाव समर्पक आहे