मीडियाशी संबंधित कसलीही माहिती नसताना केवळ प्रसिद्धीच्या लोभापायी विद्यार्थी या क्षेत्रात येतात. डिग्री हातात आल्यावर आपण लगेच कोणत्या तरी चॅनेल किंवा वृत्तपत्रात चिकटू आणि मोठ-मोठया लोकांना भेटू असा गैरसमज माध्यमातील विद्यार्थ्यांना असतो. मात्र जेव्हा माध्यमातील कामात आपण रुजू होतो, तेव्हा वाटतं की स्वप्नरंजन आणि वास्तव यात किती खोल दरी आहे ती
गेल्या दोन आठवडयांमध्ये प्रसारमाध्यमात काम करणा-या ४ ते ५ पत्रकारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यामागचं कारण जरी अद्याप गुलदस्त्यात असलं तरी कामाच्या ठिकाणी सतत असणारं दडपण देखील यामागे असू शकतं. हे सगळे पत्रकार २३ ते ४० र्वष या वयोगटांतील होते. याच्याआधी ठाण्याच्या हुस्नोन वरेरकर हत्याकांड प्रकरणाचे छायाचित्रण करणारा एक छायाचित्रकार तिथली दृश्यं बघून हृदयविकाराच्या झटक्याने गेला.
आज अनेक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमधील कर्मचारी वर्गाचे सरासरी वय हे २१ ते २५ र्वष वयोगटांतील आहे. अनेक वाहिन्यांनी ‘युवा वर्ग’ हेच आपलं कर्मचारी नियुक्तीचं ध्येय ठेवलं आहे. त्यामुळे उमेदवारीच्या काळातच मिळणारी चांगली संधी, पाच आकडी पगार, याच्या जोडीला मिळणारं नाव, प्रसिद्धी, ग्लॅमर याला भुलून या क्षेत्राकडे वळणारे मोठया संख्येने आहेत.
प्रसारमाध्यमात काम करणं म्हणजे आपलं संपूर्ण जीवन आपल्या नोकरीच्या ठिकाणी एकवटणं असतं. डॉक्टर जसा २४ तास आपल्या रुग्णाशी बांधील असतो, तसंच प्रसारमाध्यमात काम करणा-या व्यक्तीचं असतं. या क्षेत्रात इतर क्षेत्रांसारखं ९ ते ५ किंवा १० ते ६ अशी आठ तासांची डय़ूटी कधीच करता येत नाही. इथे ऑफिसला जाण्याची वेळ निश्चित पण घरी येण्याची वेळ अनिश्चित असं काहीसं स्वरूप असतं.
वेळेची कमतरता, अपुरी झोप, शिफ्टनुसार करावं लागणारं काम, खाण्याच्या अनियमित वेळा, सतत सांभाळाव्या लागणा-या डेडलाइन्स आणि त्यासाठी प्रसंगी १६-१६ तास करावं लागणारं काम, वेळेच्या अभावी कुटुंबाकडे, घरच्या जबाबदा-यांकडे होणारं दुर्लक्ष, आपल्याला हव्या तेव्हा न मिळणा-या सुट्टया, त्यामुळे सण- समारंभ, महत्त्वाचे घरगुती कार्यक्रम यांना लागणारी अनुपस्थिती यासारख्या गोष्टींनी प्रसारमाध्यमात काम करणा-या व्यक्ती त्रासून गेल्या आहेत.
वृत्तवाहिनी असो किंवा करमणूकप्रधान कार्यक्रमांची वाहिनी किंवा वृत्तपत्रं – प्रसारमाध्यमात काम करताना सतत अलर्ट राहावं लागतं. चॅनलचा टीआरपी किंवा वाचकसंख्या कशी वाढेल, यासाठी सतत नवीन काय देता येईल, याचं दडपण काम करताना असतं. बॉम्बस्फोट खटला निकाल असो, अभिषेक बच्चनचं लग्न असो, २६ जुलैसारखी आपत्कालीन पूरपरिस्थिती असो, १८-१८ तास त्या ठिकाणी फक्त काही सेकंदाच्या बातमीसाठी वार्ताहराला उभं राहणं भाग असतं.
मी स्वत: प्रसारमाध्यमात काम केलेलं असल्यामुळे इथल्या या खाचखळग्यांची खूप जवळून ओळख आहे. याचाच फायदा मी माझ्या विद्यार्थ्यांना करून देते; कारण प्रथम वर्ष बीएमएमच्या विद्यार्थ्यांशी बोलताना लक्षात येतं की विद्यार्थी माध्यमांबद्दल अवाजवी कल्पना डोक्यात घेऊन आलेले आहेत. मीडियात काम करायला लागण्यासाठी फक्त पदवाची गरज आहे. ती काय आपण चुटकीसरशी मिळवू. नंतर एखाद्या वृत्तवाहिनीत किंवा वृत्तपत्रात सहजपणे काम मिळेल.
आजपर्यंत ज्या सेलिब्रिटींजना आपण छायाचित्रातून किंवा वाहिनीतून बघत होतो त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल, त्यांची मुलाखत घेता येईल, त्यांच्याबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकता येईल. मग ते फोटो बघून मित्रपरिवाराच्या येणा-या प्रतिक्रिया यासारखे विचार या नव्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात असतात.
अशावेळी या कल्पना कशा चुकीच्या आहेत, असा नकारात्मक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यापेक्षा माझ्या करिअरमधील अनुभवांवरून सत्य परिस्थितीचं आकलन त्यांना करून देणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच एक मैत्रीण म्हणून, एक समुपदेशक म्हणून त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. हे करताना त्यांच्या स्वप्नांना धक्का लागणार नाही याचं भानही शिक्षक म्हणून ठेवावं लागतं.
अनेकदा आम्ही प्रसारमाध्यमात काम करणा-या, विद्यार्थ्यांशी संवाद साधायला उत्सुक असणा-या नामवंतांना आमच्या महाविद्यालयात आमंत्रित करतो. याचा थेट फायदा अर्थातच विद्यार्थ्यांना होतो. माध्यम म्हणजे काय, आजच्या माध्यमांची गरज काय आहे, ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थीदशेतच काय तयारी करायला हवी याचा अंदाज त्यांना येतो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावं याचंही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत असतो.
महाविद्यालयात शिकणा-या आणि शिकविल्या जाणा-या ‘थिअरी’पेक्षा प्रसारमाध्यमांमधील ‘प्रॅक्टिकल’ खूपच वेगळी असतात. अशावेळी अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. तो होऊ नये आणि अत्यंत निकोप दृष्टीनं, विचारानं विद्यार्थ्यांनी माध्यमांमध्ये काम करावं हाच तर या सगळ्या प्रयत्नांमागचा विचार आहे. या क्षेत्रात अनेक प्रकारची आव्हानं दररोज नसली तरी वरचेवर उभी ठाकत असतात. त्यांनी खचून न जाता, वास्तवाचं भान ठेवत त्यांचा मुकाबला करणं हाच तर या शिक्षणाचा खरा उद्देश आहे.
हा सगळा गोंधळ चैनल्सची संख्या वाढल्यावर झाला आहे. हातात बूम पडल्यावर किंवा वशिल्याने बुलेटीन वाचायला लागल्यावर तो किंवा ती लगेच पत्रकार होते.प्रिंट साठी कितीही जीव तोडून बातमी तयार केली तरी वर्तमान पत्राच्या सर्क्युलेशन वर तिच भविष्य अवलंबन असत. या उलट सेटेलाईट चैनल कांही क्षणात घरोघर पोहोचत असल्यामुळे फार कमी जणाना हल्ली ख-या अर्थाने पत्रकार व्हावस वाटत. कारण तिथे मेहनत व अभ्यास जास्त व प्रसिध्दी कमी अस समीकरण असत…असो कालाय तस्मे नम:….राजू वेर्णेकर…