राज्यात भाजपप्रणीत सरकारमध्ये सामील होण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर आता शिवसेनेने उद्योगपतींच्या माध्यमातून सत्तेत घुसण्याची धडपड सुरू केली आहे.
मुंबई- राज्यात भाजपप्रणीत सरकारमध्ये सामील होण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर आता शिवसेनेने उद्योगपतींच्या माध्यमातून सत्तेत घुसण्याची धडपड सुरू केली आहे.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्योगपतींचा प्रभाव असल्याने शिवसेनेने उद्योगपती खासदार राजकुमार धूत यांच्या मध्यस्थीने बोलणी सुरू केली आहेत. धूत यांच्यासोबत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी रविवारी केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन चर्चा केली.
निवडणूक प्रचारात भाजप नेतृत्वाला ‘अफझल खानांच्या फौजा’ म्हणून टीका करणा-या शिवसेनेने आता याच फौजांमध्ये सामील होऊन सत्ता मिळविण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
अनेक कसरती करूनही भाजपकडून शिवसेनेला प्रतिसाद मिळत नाही. नाराजी व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आम्ही शपथविधी सोहळय़ाला हजर राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करताच सत्तेची दारे किलकिली झाल्याची आशा निर्माण होऊन ठाकरे सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळय़ाला हजर राहिले. खातेवाटप होण्यापूर्वी भाजप आपल्याशी चर्चा करील आणि आपल्याला हवे असलेली खाती देऊन सत्तेत सामावून घेईल, अशी आशा शिवसेनेला वाटत होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करून टाकल्याने शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली.
‘लाचारी करूनही सत्तेत स्थान मिळत नसल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने उद्योगपतींच्या माध्यमातून सत्तेत घुसण्याचा प्रयत्न चालवला आहे. अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींशी सलोख्याने वागतात हे लक्षात घेऊन शिवसेनेने खासदार राजकुमार धूत यांच्या मध्यस्थीने केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन चर्चा सुरू केली आहे. धूत, देसाई आणि जेटली यांच्यात बैठक झाली असली तरी काहीही ठोस शिवसेनेच्या हाती लागलेले नाही.
दोन दिवस थांबा
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी कोल्हापूर येथे महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाला गेले होते. तेथे पत्रकारांनी त्यांना सत्तेतील सहभागाबाबत विचारले असता, ‘दोन दिवस थांबा’ असा सल्ला पत्रकारांना दिला. मला सत्तेत जाण्याची घाई नाही. दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची जी घोषणा भाजप नेत्यांनी केली होती, ती आता कृतीत आणावी, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
वारे वाघ ! शिवाबाईंचे आता काहि खरे नाहि . हरामाचा ,घामाचा नाहीं, पैसा कमवायला हि अगतिकता . क़मीज़ नहीं तारे कमिजका काॅलर चलेगा. इंटरनेशनल फकिर आए है ।