सांघिक कामगिरी उंचावली की, कुठल्याही संघाला हरवणे शक्य आहे, हे महाराष्ट्राने पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत वानखेडे स्टेडियमवर दाखवून दिले.
मुंबई– सांघिक कामगिरी उंचावली की, कुठल्याही संघाला हरवणे शक्य आहे, हे महाराष्ट्राने पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत वानखेडे स्टेडियमवर दाखवून दिले. गतविजेत्या मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर चौथ्या दिवशी शनिवारी आठ विकेटनी हरवत महाराष्ट्राने रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तब्बल १७ वर्षानंतर त्यांना अंतिम चार संघात स्थान मिळवता आले.
चौथ्या दिवशी मुंबईला जिंकण्यासाठी आणखी नऊ विकेट तसेच महाराष्ट्राला २२४ धावा हव्या होत्या. पहिल्या डावात ढेपाळलेली पाहुण्यांची फलंदाजी, तिस-या दिवशी महाराष्ट्राच्या मध्यमगती गोलंदाजांना मिळालेले यश तसेच मुंबईकडे अनुभवी झहीर खान तसेच पहिल्या डावात प्रभावी ठरलेला शार्दुल ठाकूर असल्याने मुंबईसह महाराष्ट्राला जिंकण्याची समसमान संधी होती. मात्र पाहुणे सरस ठरले. केदार जाधवने (नाबाद १२०) सातत्य राखले तर विजय झोलने (नाबाद ९२) मागील डावातील चुका टाळताना दोन सत्रे खेळून काढताना महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावाच्या तुलनेत मुंबईच्या गोलंदाजांनी स्वैर मारा केला. त्याचा फायदा पाहुण्या फलंदाजांनी उठवला. उपाहारानंतर सामना हातातून गेल्यासारखेच मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या देहबोलीवरून जाणवत होते.
अभिषेक नायरच्या गोलंदाजी कव्हर पॉइंटला कौस्तुभ पवारने झोलला दिलेले जीवदान वगळता महाराष्ट्राच्या युवा दुकलीने यजमानांना वरचढ होण्याची संधी दिली नाही. दोघांनी पहिला तास सहज खेळून काढला. तसेच स्थिरस्थावर झाल्यावर मनमोकळी फलंदाजी केली. केदारने मोसमातील पाचवे शतक ठोकताना विजयसोबत तिस-या विकेटसाठी २१५ धावांची नाबाद भागीदारी केली. केदारने २३९ मिनिटे खेळपट्टीवर तग धरताना १४४ चेंडूंत नाबाद १२० धावांची खेळी केली. त्यात १४ चौकार आणि विशाल दाभोळकरला एकाच षटकात लगावलेल्या तीन षटकारांचा समावेश आहे. २००७-०८ मध्ये पदार्पण करणा-या केदारचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे नववे शतक आहे. १९ वर्षाखालील आशिया चषकात खेळलेल्या झोलची केदारला चांगली साथ लाभली. त्याने २५८ मिनिटे खेळपट्टीवर थांबून राहताना नाबाद ९१ धावा ठोकल्या. त्यात १३ चौकारांचा समावेश आहे. चहापानाला १० मिनिटे शिल्लक असताना शार्दूलला चौकार ठोकत जाधवने विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची गाठ बंगाल वि. रेल्वे यांच्यातील विजेत्याशी पडेल.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई – ४०२ आणि १२९
महाराष्ट्र – २८० आणि दोन बाद २५२ (जाधव नाबाद १२०, झोल नाबाद ९१, झहीर ५१-२).
निकाल : महाराष्ट्र आठ विकेटनी विजयी.
‘मुंबईच्या चुका आमच्या पथ्थ्यावर’
गतविजेता आणि यजमान मुंबईच्या चुका आमच्या पथ्थ्यावर पडल्याचे सांगतानाच महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी विजयाचे श्रेय सर्व क्रिकेटपटूंना दिले. तसेच केदार जाधव आणि विजय झोलचे अभिनंदन केले.
‘‘चौथ्या दिवशी दोनशेहून अधिक धावांचे लक्ष्य असल्याने मुंबईलाही विजयाची संधी होती. मात्र त्यांच्या मध्यमगती गोलंदाजांनी नव्या चेंडूवर सुरुवातीला स्वैर मारा केला. त्याचा फायदा केदार आणि विजयने उठवला. मुंबईला हरवणे सोपे नव्हते. मात्र सांघिक कामगिरी उंचावण्याला आम्ही प्राधान्य दिले. दुस-या डावात आमची गोलंदाजीही बहरली. तसेच क्षेत्ररक्षणही उंचावले. त्यामुळे आमचा संघ विजयासाठी पात्र आहे. मुंबईला त्यांच्या मैदानावर तसेच ‘नॉकआउट फेरी’त हरवल्याने यावेळचा विजय सवरेत्कृष्ट वाटतो,’’ असे भावे यांनी म्हटले. विजयाचा जल्लोष कसा करणार, असे विचारले असता ‘‘जल्लोष करण्याचे ठरवलेले नाही. मात्र ‘सेलेब्रेशन’साठी मुंबईसारखे दुसरे ठिकाण योग्य नाही,’’ असे भावे म्हणाले.
मुंबईविरुद्ध केवळ तिसरा विजय
‘ग्रुप सी’ मधून आलेल्या महाराष्ट्राचा रणजी करंडकातील इतिहासात मुंबईवरील हा केवळ तिसरा निर्णायक विजय आहे. २००५-०६ नंतर यजमानांना वानखेडेवर सलग दुस-यांदा हरवण्यात पाहुण्यांना यश आले. १९५२-५३ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राने मुंबईवर मात केली होती.
केदार जाधव नाबाद १०३४
मुंबईविरुद्ध मोसमातील पाचवे शतक ठोकणा-या केदारने या हंगामातील धावांची संख्या १०३४ वर नेली. या मोसमात एक हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. केदारपाठोपाठ त्याचा सहकारी सलामीवीर हर्षद खडीवलेला (९४४ धावा) एक हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
माधव मंत्री यांच्याकडून कौतुक
बुजुर्ग क्रिकेटपटू माधव मंत्री यांनी मुंबईला हरवणा-या महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंचे त्यांच्या ड्रेसिंगरूममध्ये जाऊन अभिनंदन केले. ‘‘तुमच्या संघात युवा क्रिकेटपटूंचा भरणा अधिक आहे. असेच चांगले खेळत राहा,’’ अशा शब्दांत मंत्री यांनी त्यांचे कौतुक केले.
बंगाल आणि रेल्वेमध्ये प्रचंड चुरस
कोलकाता- उपांत्य फेरी गाठण्यासाठी बंगाल आणि रेल्वेमध्ये प्रचंड चुरस आहे. दुस-या उपांत्य फेरीत २७१ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर शनिवारी रेल्वेने दुस-या डावात ३ बाद ११७ धावा केल्या. त्यांना विजयासाठी अद्याप १५४ धावांची गरज आहे तर यजमान बंगालला सात विकेट हव्यात.
तत्पूर्वी, चार बाद १३३ वरून बंगालचा दुसरा डाव २६७ धावांवर संपला. यजमानांतर्फे सर्वाधिक योगदान वृद्धिमन साहा (८१) आणि कर्णधार लक्ष्मीरतन शुक्लाने (७६) दिले. रेल्वेच्या अनुप्रीत सिंगने ७२ धावांत निम्मा संघ गारद केला. पाचव्या दिवसावर गेलेली या मोसमात ही एकमेव उपांत्यपूर्व फेरीतील लढत आहे.
संक्षिप्त धावफलक : बंगाल – ३१७ आणि २६७. रेल्वे – ३१४ आणि तीन बाद ११७.
कर्नाटक, पंजाब अंतिम चार संघात
बंगळूरु / बडोदा- कर्नाटक आणि पंजाबने अंतिम चार संघांत स्थान मिळवले. तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत बंगळूरुत यजमान कर्नाटकने उत्तर प्रदेशवर शनिवारी ९२ धावांनी विजय मिळवला. चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत पंजाबने जम्मू आणि काश्मीरचा १०० धावांनी पराभव केला. दुस-या उपांत्य फेरीत मोहालीत कर्नाटक आणि पंजाब एकमेकांशी भिडतील.
३३३ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा डाव एक बाद ५५ वरून दुस-या सत्रात २४० धावांत संपला. सलामीवीर तन्मय श्रीवास्तव आणि पियुष चावलाच्या प्रत्येकी ४४ धावा वगळता कर्नाटकचा लेगब्रेक श्रेयस गोपालसमोर (पाच विकेट) पाहुण्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. श्रेयसला अभिमन्यू मिथुन (तीन विकेट) आणि कर्णधार आर. विनय कुमारची (दोन विकेट) चांगली साथ लाभली. कर्नाटकचा हा सलग सहावा विजय आहे.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक – ३४९ आणि २०४ वि. उत्तर प्रदेश – नऊ बाद २२१ (डाव घोषित) आणि २४० (श्रीवास्तव ४४, श्रेयस गोपाल ५९-५). निकाल : कर्नाटक ९२ धावांनी विजयी.
रणजी इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठणा-या जम्मू आणि काश्मीरची घोडदौड पंजाबने रोखले. ३२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिस-या दिवसअखेर जम्मू आणि काश्मीरने दोन बाद ७७ धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील बहरलेली फलंदाजी पाहता पंजाबला विजयासाठी प्रयास पडतील, असे वाटले. मात्र मध्यमगती व्ही. आर. व्ही. सिंगच्या (पाच विकेट) प्रभावी मा-यासमोर चौथ्या दिवशी शनिवारी जम्मू आणि काश्मीरचा दुसरा डाव दीड सत्रात २२३ धावांवर संपला. आघाडीच्या फळीतील हरदीप सिंग (नाबाद ७६) वगळता त्यांच्या सर्वच फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या डावात शतक ठोकणा-या कर्णधार परवेझ रसूलला केवळ १० धावा करता आल्या. रसूलनंतर ओबेद हरूनला (०) लागोपाठच्या चेंडूंवर बाद केल्याने व्ही. आर. व्ही. सिंगला हॅटट्रिकची संधी होती. मात्र त्याची हॅटट्रिक पूर्ण झाली नाही. मात्र निम्मा संघ गारद करत व्ही. आर. व्ही. सिंगने छाप पाडली. त्याला मनप्रीत सिंग गोनीची (तीन विकेट) चांगली साथ लाभली.
संक्षिप्त धावफलक : पंजाब – ३०४ आणि २९६ वि. जम्मू आणि काश्मीर – २७७ आणि २२३ (हरदीप नाबाद ७६, व्ही. आर. व्ही. सिंग ४३-५). निकाल : पंजाब १०० धावांनी विजयी.
Jay Maharashtra this time Maharashtra should win Ranji trophy