मुंबई, ठाण्यासह राज्यात रविवारी दमदार पाऊस झाला. मराठवाड्यात वीज पडल्याने सात जणांना प्राण गमावावे लागले.
मुंबई- मुंबईत शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने दुस-याच दिवशी अक्षरश: दैना उडवली. मुंबई, ठाण्यासह राज्यात रविवारी दमदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने ‘पाणी तुंबणार नाही’ या महापालिकेच्या दाव्यावर पावसाने पाणी फिरवले. ‘आधीच मेगाब्लॉक, त्यात मुसळधार पाऊस’ यामुळे मध्य रेल्वेची रखडपट्टी कायम होती. पाणी तुंबणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड आदी कारणांमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बो-या उडाला आणि प्रवाशांचे बेहाल झाले.
शनिवारी संध्याकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासूनच बरसण्यास सुरुवात केली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. मुंबईतील हिंदमाता, मिलिंदनगर, कालिना, मानखुर्द, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, मालाडमधील पठाणवाडी, अंधेरी पूर्व-पश्चिम परिसर, तर ठाण्यातील वृंदावन, शिवाईनगर, कोपरी, वंदना चित्रपटगृह, कोर्टनाका, पडवळनगर, उथळसर आदी ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. रविवारी सुट्टी असल्याने प्रवाशांना जास्त त्रास झाला नाही, मात्र कामानिमित्त घराबाहेर पडण्याचे मनसुबे पावसाने उधळून लावले. अनेक ठिकाणी झाडे पडली, मात्र त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
मराठवाड्यात सात बळी
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत विविध ठिकाणी वीज पडल्याने सात जणांना प्राण गमावावे लागले. अनेक धरणे व बंधा-यांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाल्याने शेतक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कल्याण-ठाणे लोकलप्रवास दोन तासांचा
रविवारच्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसला. कल्याण-ठाणे मार्गावरील सिग्नल यंत्रणा नादुरुस्त झाल्याने लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे कल्याण ते ठाणे या अध्र्या तासाच्या प्रवासाला तब्बल दीड ते दोन तास लागत होते. जलदगती गाडय़ा पारसिकच्या बोगद्यापासून ठाणे स्थानकापर्यंत कासवगतीने चालत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यातच अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.
कोकणालाही झोडपले
शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने कोकणाला झोडपून काढले. मालवण, कुडाळ, वैभववाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडित झाला. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळल्याने रहिवाशांचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा, दिवेआगार, श्रीवर्धन, अलिबागमध्ये पावसाची संततधार कायम होती.
सतत पडणा-या पावसामुळे मुंब्रा येथील नदीम अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील जिना कोसळला. मात्र त्यात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. ही इमारत रिकामी करण्यात आली असून ही इमारत बांधणा-या शरीफ बिल्डरला मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातील मुरुड, जंजिरा या भागात पावसाची संततधार कायम आहे.
मुंबई, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच गोव्यात येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी दुपारपर्यंत कुलाबा येथे ३६.८ तर सांताक्रुझ येथे ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली.
ठाण्यातही मुसळधार
ठाणे – ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने रविवारी चांगलेच झोडपून काढले. उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुट्टीचा दिवस असल्याने पावसाचा मनमुराद आनंद लुटला. ठाणे शहरात ३० ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला. कल्याणमध्ये १२ तासांत १२२ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. डोंबिवली परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. उल्हासनगरमध्येही पावसामुळे दाणादाण झाली. नवी मुंबईत वादळी पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मात्र जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वसईतही दमदार पाऊस पडला.
वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह ठाणे शहरात सकाळीच पावसाने हजेरी लावली. वृंदावन, शिवाईनगर, कोपरी, वंदना टॉकीज, महाराष्ट्र विद्यालय, राममारुती रोड, पडवळनगर, आझादनगर, मुंब्रा, कळवा, महापालिका मुख्यालय आदी ठिकाणी पाणी साचले होते. रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा थांब्याजवळ प्रवाशांची मोठी रांग लागली होती. हे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील हनुमान मंदिर, आइस फॅक्टरी, मल्हार टॉकीज आणि विटावा पुलाजवळ झाड कोसळले. कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला विटावा सबवेही जलमय झाला. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला.
वाहतूक पोलिसांचे ‘मिशन पावसाळा’
ठाणे – पावसाळय़ात दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळणे, अपघात होणे, सखल भागात पाणी साचण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘मिशन पावसाळा’ सुरू केले आहे. पावसाळय़ापूर्वीच पोलिसांनी अपघात स्थळ, सखल भाग आणि दरड कोसळणा-या स्थळांची यादी तयार केली आहे. याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करून दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अपघातांच्या ठिकाणी फलक लावून चालकांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे.
ठाण्यातील विटावा ब्रीज, वंदना सिनेमागृह, राम मारुती रोड, तीन हातनाका, ठाणे पूर्वेकडील भाग, कल्याणमधील वालधुणीनाका, आंबेडकर रोड, स्टेशन रोड, शिवाजी चौक, उल्हासनगरातील राजीव गांधीनगर, शहाड उड्डाणपूल, म्हारळनाका, भिवंडीतील नदीनाका, म्हाडा कॉलनी, शिवाजी पुतळा, तीनबत्ती, बाजारपेठ, खाडी पार्क, साईबाबा जकात ते रांजणोली नाका हे मुख्यत: सखल भाग आहेत. जोरदार पावसामुळे सखल भागांत पाणी साचते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधित पालिकांशी यांबाबत पत्रव्यवहार केला आहे.
ठाण्यातील लोकमान्यनगर, मुंब्रा बायपास, वाघोबानगर, हाजी मलंग जवळील घरे, मुंब्य्राच्या डोंगर परिसरातील घरे आदी ठिकाणी पावसाळय़ात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे महापालिकांना याबाबत दक्षता घेण्याची सूचना ठाणे वाहतूक विभागाने केली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत राष्ट्रीय व राज्य महामार्ग येतात. महामार्गावरील हेच रस्ते चिंतेचा विषय बनले आहेत. महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. ठाणे, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा, कल्याणमधील खडकपाडा सर्कल, दुर्गामाता नाका या ठिकाणी सर्रास अपघात घडतात. घोडबंदर रोडवरील गायमुख चढणीवर नेहमी पावसाळय़ात वाहने बंद पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मुंब्रा बायपास मार्ग पावसाळय़ात खचला होता. तेथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी म्हणून वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे.
चार महिन्यांत ९२ जणांचा मृत्यू
जानेवारी ते एप्रिल या महिन्यांत विविध ५०० अपघात झाले असून, त्यात ९२ जणांचा प्राण गमवावा लागला. तसेच ३६४ जण जखमी झाले आहेत. यावर्षी सर्वाधिक अपघात जानेवारी महिन्यात झाले.
जलसदृश स्थिती
कल्याण-डोंबिवली परिसरात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील सखल भागांत पाणी साचले. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमान्यांना त्याचा फटका बसला नाही. १२ तासांत कल्याण तालुक्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
शनिवारी मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मात्र, रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागांत पाणी साचले. कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका व डोंबिवली पश्चिमेतील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. नागरिकांना घरातील सामान पलंगावर उचलून ठेवावे लागले. काही ठिकाणच्या गटार व नाल्यांची सफाई झाली नसल्याने गटारे तुंबली. गटारातील सांडपाणी व कचरा रस्त्यावरून वाहत होता. कल्याणच्या मुख्य रस्त्यावरील शिवाजी चौकात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातूनच वाहने मार्गक्रमण करत होती. कल्याण पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या आवारातही पाणी साचल्याने या पाण्यातूनच पोलिस वाट काढत होते. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांना स्थानकावरच ताटकळत रहावे लागले. कल्याण डोंबिवली रस्त्यावरील चौधरी कंपाउंडजवळ पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर जलमय झाला होता. कल्याण शहरात दिवभरात अवघ्या चार तासांतच ११७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. संध्याकाळी पाचनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.
पाणीच पाणी
मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील सुमारे १५ ठिकाणी रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शनिवार रात्रीपासून येथे पावसाने हजेरी लावली. नालेसफाई झालेल्या कॅम्प दोन येथील दूरध्वनी कार्यालयाजवळील गाळ उचलला न गेल्याने तो पुन्हा पाण्याच्या प्रवाहात जाऊन नाला तुंबला. सेवा सदन महाविद्यालयाचा चौक, गोल मैदान परीसर, गांधी रोड, ज्योती कॉलनी, दत्तमंदीर परीसर, आकाश कॉलनी येथेही हेच चित्र पहावयास मिळाले. उल्हासनगर कॅम्प पाच येथील प्रेमनगर टेकडीच्या प्रवेशद्वाराजवळील नाला तुंबल्याने हिलव्ह्यू आणि शेजारील तीन इमारतीत चार चार फुटांपर्यंत पाणी घुसले.
दिवसभर संततधार
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असताना वसईतही शुक्रवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून वसईत पावसाची संततधार सुरू होती. गेल्या २४ तासांत वसई तालुक्यात नऊ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर शुकवारपासून आतापर्यंत १०० मिलीमीटरच्या वर पाऊस बरसला आहे.
सासत्याने पडणा-या पावसाने वसईत थंडगार वातावरण अनुभवायला मिळत आहे. प्रामुख्याने तरुणवर्गाने याचा मनमुराद आनंद लुटला. मोटरसायकलवरून पावसात भिजत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत जल्लोष केला. वसई-विरार परिसरातल्या समुद्रकिना-यांवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. पाऊस थांबून थांबून पडल्यामुळे मोठय़ाफार प्रमाणात कुठेही पाणी साचले नाही. मात्र नालासोपा-यातल्या आचोल, तुळींजसारख्या सखल भागांत थोडेफार पाणी साचले. पहिल्या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरलाय. रविवारी दिवसभर पालिकेच कर्मचारी पाणी साचलेल्या भागांत पाणी जाण्याचे मार्ग तपासत होते. दरम्यान, रविवारी वसईत तालुक्यात तीन झाडे उन्मळूल पडली.
दमदार पाऊस
मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ऐरोली परिसरात सर्वाधिक ११०.७० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. बेलापूरमध्ये ५५.६०, नेरूळमध्ये ७४.०८ आणि वाशी येथे ७३.०८ मिलीमीटर पाऊस पडला. कोपरखैरणे रा. फ. नाईक शाळा परिसर सेक्टर १५ ते १८ परिसर, सेक्टर पाच या ठिकाणी पाणी साचले होते. घणसोली गुणाली तलाव, बेलापूर सेक्टर आठ, ऐरोली नाका, नेरूळ सेक्टर ४४ या ठिकाणी वृक्ष कोसळल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने रविवारी चांगलेच झोडपून काढले. उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुट्टीचा दिवस असल्याने पावसाचा मनमुराद आनंद लुटला. ठाणे शहरात ३० ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला. कल्याणमध्ये १२ तासांत १२२ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. डोंबिवली परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. उल्हासनगरमध्येही पावसामुळे दाणादाण झाली. नवी मुंबईत वादळी पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मात्र जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वसईतही दमदार पाऊस पडला.
वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह ठाणे शहरात सकाळीच पावसाने हजेरी लावली. वृंदावन, शिवाईनगर, कोपरी, वंदना टॉकीज, महाराष्ट्र विद्यालय, राममारुती रोड, पडवळनगर, आझादनगर, मुंब्रा, कळवा, महापालिका मुख्यालय आदी ठिकाणी पाणी साचले होते. रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा थांब्याजवळ प्रवाशांची मोठी रांग लागली होती. हे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील हनुमान मंदिर, आइस फॅक्टरी, मल्हार टॉकीज आणि विटावा पुलाजवळ झाड कोसळले. कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला विटावा सबवेही जलमय झाला. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला.
हवामानाचा अंदाज
दिनांक | कमालतापमान (डि.से) | किमान तापमान(डि.से) | पर्जन्य स्थिती |
१० जून | २३.० | २९.० | मुसळधार |
११ जून | २३.० | ३०.० | मध्यम स्वरुपाचा पाऊस |
१२ जून | – | – | निरभ्र वातावरण |
१३ जून | – | – | निरभ्र वातावरण |
प्रहारच्या यूजर्संना आवाहन…
पावसामुळे मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले आहे. पावसासंदर्भातील सर्व अपडेट्स प्रहार प्रतिनिधींच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. मात्र तुम्हीसुद्धा तुमच्या भागातील स्थितीची माहिती प्रहारला कळवू शकता. माहिती देण्यासाठी आपली प्रतिक्रिया नोंदवा..
Yandacya pawasacha pahila danaka aaj basala. Office la velet pohochava mhanun 2.20 chi fast train pakadali.. kahi antar chalalyanantar tya fast local cha slow madhe kadhi rupantar zala kalalach nahi.. Dombiwali te thane he antar kapayala ya gadila tabbal 1 tas lagala.. Pudhe konthi fast local nasatana evadha vel ka lagala he gadicha motormanlach mahit. Radatkhadat dadar la utaralo. Gardi evadhi ki kiman 5 manasana ekmekanvar kosalali.. Jiv janyachi vel.. Punha slow sathi pratikshya.. Tabbal 20 minute vaat pahilyanantar slow local avatarli.. Punha tufan gardi.. Parel la utarlyanantar baher sachalela paani janu vatach pahat hota.. Kashibashi vaat kadhat office madhe pohichalo ani jiv bhandyat padala…
उपनगरात पाऊस जास्त आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष करणा-या पालिका अधिका-यांनी आता आपल्या हाताखालील कर्मचा-यांना ठिकठीकाणी कामाला जुंपले आहे. तरीही रस्त्यावर पाणी साचले आहे…