बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नसून हा ‘दलालां’चा पक्ष बनला आहे, अशी बोचरी टीका करणारे शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांची सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली.
मुंबई- बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नसून हा ‘दलालां’चा पक्ष बनला आहे, अशी बोचरी टीका करणारे शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांची सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे शिवसेना संपवायला निघाले असून तेच खरे अस्तनीतले निखारे असल्याचा आरोप करत, रावले त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाला टीकास्त्राचे लक्ष्य बनवत असतानाच घाईघाईत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सर्वसामान्य शिवसैनिकाला मातोश्रीवर जाणे अवघड होऊन बसले आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेता येत नाही. आपण खासदार असतानाही उद्धव यांच्या भेटीसाठी चार वर्षे लागली. आपली अडवणूक करण्यात नार्वेकरच आघाडीवर होते, असे सांगत रावले यांनी सध्याचे शिवसेनेचे नेतृत्व हे दुस-याचे ऐकून निर्णय घेत असल्याची टीका केली. बाळासाहेबांच्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकांना वाली राहिलेला नाही. बाळासाहेबांना कार्यकर्त्यांची पारख होती. ते कधीही कोणावर अवलंबून राहिले नाहीत. नार्वेकरांमुळेअनेक शिवसैनिक दुरावत आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही किती शिवसैनिकांना खुशाल पक्ष सोडा असे सांगणार आहात, असा रोखठोक प्रश्नही त्यांनी या वेळी शिवसेना नेतृत्वाला केला. आपण दु:खी आहोत असे सांगत त्यांनी, लोकसभेचे तिकीट द्यायचे नव्हते तर आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे होते. मात्र आपल्याला जाणीवपूर्वक टाळण्यात आले असून, याला नार्वेकरच जबाबदार आहे, असेही सांगितले.
माझी हकालपट्टी अपेक्षितच होती, नार्वेकरांवर टीका केली की पक्षातून काढले जाणार हे माहित होते त्यामुळे त्याचे वाईट वाटले नाही. तसेच नार्वेकरांवर कोणतीही कारवाई होणार नाही हे आपल्याला माहित असल्याचे आहे. आपण बाळासाहेबांचे सच्चे सैनिक असून लवकरच आपल्या राजकारणाची दिशा ठरवू, असे रावले यांनी यावेळी सांगितले. मात्र मनोहर जोशींप्रमाणे माफी मागणार नाही असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांचा होता नार्वेकरला विरोध
मिलिंद नार्वेकर हा माणूस शिवसेना संपवायला निघाला आहे ही बाब शिवसेनाप्रमुखांनी ओळखली होती. तसेच नार्वेकरांना शिवसेनेतून काढून टाकण्याचा आदेशही दिला होता, मात्र तो पाळला गेला नाही. नार्वेकर यांना विधान परिषदेवर निवडून जायचे होते. त्याला बाळासाहेबांचा विरोध होता. मिलिंद आमदार झाला तर शिवसेनापमुखपद सोडण्याची धमकी बाळासाहेबांनी दिली होती, असा गौप्यस्फोट रावले यांनी या वेळी केला.
ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेला एव्हड मोठ केले त्या निष्ठावंत शिवसैनिकांना आज शिवसेनेत फंदफितुरीमुळे दुय्यम दर्जा दिला जातो हा त्यांचा अपमानच नाही का ? काही चुगलखोरांमुळे खरा शिवसैनिक पक्षप्रमुखांना आता दिसेनासा झाला आहे त्यांनी अश्या मूर्खांच्या चुगलखोरीमुळे रावले सारखा खरा शिवसैनिक गमावला आहे,साहेबांच्या वेळी असे का होत नव्हते याचा पक्षप्रमुखांनी एकदा निवांत विचार जाणीवपूर्वक करावा हि एका सच्चा शिवसैनिकाची नम्र विनंती आहे……जय महाराष्ट्र