‘डेव्हिड हेडली हा सराईत थापेबाज असून इशरत जहाँबद्दल दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे अमेरिकन पत्रकार अॅड्रीयन लेव्ही यांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली- ‘डेव्हिड हेडली हा त्याच्या साक्षीत कोणतीही नवी गोष्ट सांगत नसून तो सराईत थापेबाज आहे. ऐकीव माहिती, इकडून-तिकडून गोळा केलेली माहिती एकत्र करून सांगण्याची त्याला सवय आहे. सध्या त्याचे तेच सुरू आहे. इशरत जहाँविषयी त्याने दिलेली माहितीही मुळ मुद्दय़ाला बगल देण्यासाठी केलेली थापेबाजीच आहे’, असा दावा २६/११ हल्ल्याविषयी पुस्तक लिहिणारे पुरस्कारविजेते पत्रकार अॅड्रीयन लेव्ही यांनी केला आहे.
लेव्ही हे ‘द सीज: द अॅटॅक ऑन द ताज’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत. ‘हेडलीने याआधी एलईटी, आयएसआय, सीआयएलाही थापा मारल्या होत्या. आता तो भारताला गुंडाळतोय. आतापर्यंतच्या त्याच्या साक्षीत त्याने आधी दिलेल्या जबानीपेक्षा वेगळे असे फारसे काहीही सांगितलेले नाही. पण तो पक्का बनेल, खोटारडा आहे. चौकशीदरम्यान तो अनुभवी प्रश्नकर्त्यांनाही लिलया गुंडाळतो, हे लक्षात घ्यायला हवे. एफबीआयने केलेल्या त्याच्या चौकशीचा व्हीडिओ पाहिलेत तरी हे सहज लक्षात येते, असेही लेव्ही यांनी म्हटले आहे.
‘अर्धसत्य गोष्टी, ऐकीव माहिती यातून तो समोरच्याला घोळात घेतो. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, त्याची कातडी वाचवण्यासाठी त्याने आजवर त्याच्या जवळच्या अशा प्रत्येक व्यक्तीचा, अगदी पत्नी, मैत्रिणी, बालपणीचे मित्र असा सगळ्यांचाच विश्वासघात केला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. इशरत जहाँचा दावा हे हेडलीच्या थापेबाजीचे उत्तम उदाहरण आहे. ऐकीव माहिती आणि अर्धसत्य यातून त्याने ही विश्वासार्ह वाटावी अशी कथा रचली आहे.
मुंबईवर हल्ल्याच्या आधीच्या दोन प्रयत्नांशी त्याचा प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता. त्याला ही माहिती नंतर कळल्यावर आता गोपनीय गोष्टी म्हणून तो त्या पुढे करतो आहे. भारतीयांसाठी त्याने पुन्हा हफीझ सईदचे नाव घेतले आहे. प्रत्यक्षात सईदने त्याला दूरच ठेवले होते. तो डबल एजंट असल्याचा त्याला संशय आला होता. लष्करचीही त्याच्यावर बारीक नजर होती. त्यामुळेच त्याला २६/११ च्या प्रत्यक्ष कटव्यवस्थापनापासून दूर ठेवण्यात आले होते.
आयएसआयलाही तो फितूर असल्याची खात्री पटली होती. म्हणूनच त्यांनी हेडलीशी थेट भेटीगाठी टाळून फक्त इमेल आणि सांकेतिक दूरध्वनींद्वारे संपर्क ठेवत त्याला मुंबईतील भलत्याच स्थळांची पाहणी करण्यासाठी पाठवले. ही स्थळे हल्ल्यासाठी निवडण्यात येणारच नव्हती. ही सगळी माहितीच तो आता भारताला त्याला हव्या त्या प्रकारे सरमिसळ करून सांगतो आहे.
त्याने धूर्तपणे सगळ्यांनाच एकाचवेळी नाचवले. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना त्याचा फार मोठा फटका बसला. त्यांनी त्याला इतकी मोकळीक दिली की पुढे मुंबईवरील हल्ला रोखणे अशक्य झाले. अमेरिकन यंत्रणांनी मुंबईतील निशाण्यांची कल्पना भारताला देऊनही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यात आल्या नाहीत आणि समुद्रमार्गे होणारा हल्ला रोखण्यासाठीही काही प्रयत्न करण्यात आले नाहीत, हे भारतीय यंत्रणांचे अपयश आहे, असे लेव्ही यांनी म्हटले आहे.
भारताची सध्याची सुरक्षाविषयक परिस्थितीही दयनीयच आहे. आयबी, रॉ या यंत्रणांकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, त्यांचे आधुनिकीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. या गोष्टी चिंताजनक आहेत. गुप्तचर यंत्रणांमध्ये नव्या रक्ताची, नव्या योजनांची, निष्णात गुप्तचरांची गरज आहे. या यंत्रणांमधील नगण्य महिलावर्ग आणि हिंदूंखेरीज इतर धर्मीय कर्मचा-यांचाही अगदी किरकोळ टक्का हे चित्रही सुधारण्याची निकड आहे’, असे मतप्रदर्शन लेव्ही यांनी केले आहे.
नसीब हेमंत करकरे हे जिवंत आहेत हे सत्य त्यांनी सांगितले नाही.