माहिती आणि दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी गुरुवारी भारत सरकारच्या ‘ई-ग्रीटिंग’ या नव्या वेबसाईटचे लाँचिंग केले.
नवी दिल्ली – भारत सध्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून वेगाने प्रगती करत आहे. ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी माहिती आणि दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी गुरुवारी ‘ ई-ग्रीटिंग’ या नव्या वेबसाईटचे लाँचिंग केले आहे. या वेबसाईटद्वारे मंत्री आणि सरकारी अधिकारी तसेच भारतातील नागरिकांना आपली मित्रमंडळी तसेच सहका-यांना ‘ईग्रीटिंग’च्या माध्यमातून स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देता येणार आहेत.
शुक्रवारी १५ ऑगस्टला साजरा होणा-या ६८ व्या स्वातंत्रदिनाच्या धर्तीवर ही नवी वेबसाईट लाँच करण्यात आली आहे. या नव्या आणि अनोख्या योजनेबद्दल मी सर्व आयटी विभागाचे अभिनंदन करतो असे प्रसाद यांनी लाँचिंगनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या नव्या योजनेचा वापर केवळ सरकारी अधिकारी अथवा मंत्रींच करु शकत नाही तर इतर नागरिकही या वेबसाईटद्वारे आपल्या आप्तस्वकीयांना ग्रीटिंग पाठवून स्वातंत्रदिनाच्याशुभेच्छा देऊ शकता असेही प्रसाद म्हणाले.
सरकारकडून http://egreetings.india.gov.in ही नवी वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. MyGov.nic.inअथवा India.gov.in अथवा NIC Email यावर नोंदणी केलेल्या यूझर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात. याबाबत अधिक माहिती या नव्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेचा भाग असणा-या या नव्या योजनेसाठी सरकारकडून ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा