अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे संतप्त पडसाद राज्यभर गेले काही दिवस उमटत आहेत.
श्रीगोंदा- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे संतप्त पडसाद राज्यभर गेले काही दिवस उमटत असले तरी गृहखाते सांभाळणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. यामुळे जनमानसात असलेल्या प्रक्षोभाला रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सामोरे जावे लागले. संतप्त महिलांनी त्यांची श्रीगोंदा येथेच वाट अडवली आणि सरकारी बेफिकिरीचा जाब विचारला, तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केसरकर यांना बांगडय़ांचा आहेर दिला.
कोपर्डी गावात बुधवारी घडलेल्या या अमानुष घटनेनंतर लोकभावना प्रक्षुब्ध झाली असली तरी असंवेदनशील सरकार मात्र शनिवापर्यंत हलले नव्हते. पालकमंत्री राम शिंदे शनिवारी जिल्ह्यात पोहोचले तर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी लाजेकाजेस्तव रविवारी संध्याकाळी कोपर्डी गाठले. घटनास्थळी गेल्यानंतर संबंधित पीडितेच्या शोकाकुल चुलत बहिणीने गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांची चांगलीच झाडाझडती घेतली. ‘‘पाच दिवस झाले तुम्ही कोठे होता? आतापर्यंत तुम्ही का आला नाहीत? तुम्ही आम्हाला संरक्षण न देता आरोपींना संरक्षण दिले. तुम्हाला आम्हाला संरक्षण देण्याची इच्छा नाही का?’’ अशा शब्दांत या दुर्दैवी मुलीच्या कुटुंबीयांनी केसरकरांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यामुळे भांबावलेल्या केसरकरांची बोलतीच बंद झाली. भेटीचे सोपस्कार कसेबसे उरकून स्थानिक शिवसैनिकांच्या संरक्षणात दीपक केसरकरांनी तेथून काढता पाय घेतला.
केसरकर कोपर्डी येथे येणार असल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केसरकरांना घेराव घातला. यावेळी चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री केसरकर आणि सरकारच्या एकूणच कारभाराबाबत ताशेरे ओढले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हे अभियान केवळ नावापुरते आहे का?’ असा सवाल उपस्थित करीत चित्रा वाघ यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली. तर उपस्थित महिलांनी दीपक केसरकरांना घेराव घालत त्यांना बांगडय़ांचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि शिवसैनिकांच्या गराडय़ात स्वत:ला लपवत केसरकरांनी तेथून काढता पाय घेतला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही रविवारी रात्री पीडित कुटुंबाची सोपस्कार म्हणून भेट घेतली. तृप्ती देसाई यांनीही या कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार एवढी बेफिकिरी दाखवत असताना या नराधम आरोपींना पोलिसांना लोकांनी मिळवून दिले असून या वीटभट्टी कामगारांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राशीन आदी ठिकाणी रस्ता रोको, गाव बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली. सोमवारी उस्मानाबाद बंदचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
आरोपींचे वकील पत्र घेण्यास बार असोसिएशनचा नकार
कायद्यात जरी आरोपींना आपल्या वकिलांमार्फत आपली बाजू मांडण्याचा अधिकार असला तरी त्यांचे वकीलपत्र जिल्हा सत्र न्यायालयातील कोणतेच वकील आरोपपत्र स्वीकारणार नाही अशी माहिती वकील बार असो.ने दिली आहे. या घटनेचा संताप व्यक्त करीत आरोपींना कडक शासन होण्यासाठी मदत करू, असेदेखील त्यांनी सांगितले.
आंदोलक महिलांपुढे बोलती बंद!
- आमच्या लेकीने किती वेदना भोगल्या त्याची कल्पना आहे का?
- कशाला वाचवायच्या लेकी?
- बेटी बचाओ आंदोलन कशाला?
- नराधमांच्या ताब्यात द्यायला का?
- राम शिंदेंवरील आरोपांसाठी मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले; पण या अमानुष हत्येबाबत गेले तीन दिवस त्यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही. ही कुठली संवेदनशीलता?, असे संतप्त सवाल आंदोलकांनी केल्यावर भेटीचे सोपस्कार उरकणा-या नेत्यांची बोलती बंद झाली होती.
Virodhak suddha 15 varshe sarkar made hote tevha tyani kay dive lavle te saglya jantela mahit aahe…..