रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत बिघडतो, असे म्हटले जाते. त्यामुळे सध्या सेंद्रिय शेतीचा बोलबाला वाढला आहे.
आचरा- रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत बिघडतो, असे म्हटले जाते. त्यामुळे सध्या सेंद्रिय शेतीचा बोलबाला वाढला आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी या खतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी खते विकत घेऊन शेती करणे किफायशीर ठरण्याची शक्यता कमीच. म्हणून सेंद्रिय खतांची निर्मिती करून आपल्या शेतांमध्ये वापर वाढवणे लाभदायक ठरते. याबाबत कृषी विभागाकडून जीवामृताची शिफारस केली गेली आहे.
याबाबत कृषी विभागाचे अय्याज शेख यांच्या म्हणण्यानुसार जीवामृतमुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन सेंद्रिय कर्बामध्ये वाढ होतेच, शिवाय उत्पादन खर्च कमी झाल्याने शेतक-यास आर्थिक लाभ मिळू शकतो. याबाबत शेती शाळेतून ते शेतक-यांना मार्गदर्शन करतात. या जीवामृतासाठी खर्च नगण्य, पण फायदा अफाट मिळतो. यासाठी २०० लिटरची प्लॅस्टिक, लाकडी किंवा दगडी पाणी साठवण्याची टाकी आवश्यक तसेच गाईचे शेण २० किलो देशी गाईबैलाचे गोमूत्र १० लिटर, कडधान्य पीठ दोन किलो, काळा गूळ असल्यास २ किलो अथवा शुद्ध मध असल्यास २०० ग्रॅम, वडाच्या झाडाखालील माती एवढे साहित्य आवश्यक आहे. हे बनवण्याची क्रिया ही तशी सोपी असल्याचे शेख सांगतात. ते बनवण्यासाठी प्रथम धान्यपीठ वगळून इतर सर्व घटक वेगवेगळे विरघळून मग पाण्यात मिक्स करावे लागतात. यात गोमूत्र आणि शेण एकत्र करून नंतर पाण्यात ओतावे. तसेच वडाच्या झाडाखालील माती पाण्यात विरघळून मग टाकीतील पाण्यात ओतावी. असे हे मिश्रण करावे जेणेकरून सर्व घटक एकत्र चांगले मिक्स होऊ शकतात. अशा प्रकारे तयार झालेले द्रावण सात दिवस तसेच ठेवणे आवश्यक असते. फक्त किमान दिवसातून दोन ते तीन वेळा ढवळणे आवश्यक असल्याचे शेख सांगतात. यासाठी लाकडी सुक्या काठीचा वापर करण्यास ते सांगतात. ढवळत असताना घडय़ाळाच्या दिशेने तसेच विरुद्ध दिशेने असे ढवळावे, जेणेकरून मिश्रणातील तयार गॅस निघून जाऊन त्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढू शकते. ढवळून झाल्यावर मिश्रण झाकण लावून बंद करून ठेवावे. सात दिवसांनंतर हे वापरण्यास योग्य होते. त्यानंतर वापरेपर्यंत त्यात धान्याचे पीठ दररोज २०० ग्रॅम या प्रमाणात मिसळणे गरजेचे असते. सात दिवसांनंतर या मिश्रणात जीवाणूंच्या संख्येत वाढ होत असल्याचे ते सांगतात. या जीवाणूंचे अन्न म्हणून या कडधान्य पिठाचा उपयोग होत असतो. यासाठीच हे धान्य पीठ त्यात मिसळले जात असते. मिश्रणात १०० ग्रॅम हिंग मिसळल्यास त्याची उपयुक्ततेत दुपटीने वाढ होत असल्याचे अय्याज शेख सांगतात.
जीवामृतात जीवाणूंचे प्रमाण साधारण एका पेल्यात एक कोटी एवढय़ा प्रमाणात असते. त्यामुळे या जीवामृताचा डोस वनस्पतींना दिल्यास एकदम जादू झाल्यासारखेच परिवर्तन रोपांवर, फळवृक्षांवर होत असते. या जीवामृतामध्ये जर १० किलो रुईच्या झाडाचा पाला बारीक करून मिसळल्यास भाजीपाला फळवृक्षांचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होऊ शकते. एवढेच नव्हे तर रुईमुळे टॉक्सीन वायू तयार होत असल्याने न धरणारी जुनाट झाडेही धरू लागतात, असे आढळले असल्याचे शेख यांनी सांगितले. याशिवाय जीवामृताची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात शेळय़ामेंढय़ा खात नसलेला पाला जरी बारीक करून मिसळल्यास रोपांना फळपिकांना त्रास देणा-या जमिनीतील वाळवी रोटावरही निमंत्रण मिळू शकते. हे देण्याची पद्धतही सोपीच आहे. जर पाटाने पाणी देत असाल तर पाटाच्या सुरुवातीला धार धरून ओतावे किंवा फळपिकांना देताना साधारण एका झाडास अडीच लिटर एवढे देणे आवश्यक. मोठी झाडे असल्यास पाणी गरम करून पूर्ण थंड झाल्यावर अडीच लिटर जीवामृत मिसळून वापरल्यासही चालते. शेतकरी मित्रांनो आहे की नाही, सेंद्रिय खत बनवण्याची सोपी पद्धत. हे जीवामृत नावाप्रमाणेच शेतीसाठी जीवामृत आहे. याच्या वापराने जमिनीची सुपीकता वाढतेच त्याचबरोबर जमिनीतील उपकारक जीवाणूंची संख्यापण वाढण्यास मदत होते. भाजीपाला फळझाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने शेती जोमदार होते. पर्यायाने उत्पादनातही वाढ होत असल्याने जीवामृत हे शेतीसाठी संजीवनी देणारे अमृतच आहे. त्यामुळे याचा वापर जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. याची उपयुक्तता वाढवण्यासाठी अय्याज शेख सांगतात की, उत्तरायण दक्षिणायनाचा विचार करून हे बनवल्यास अधिक उपयुक्त ठरते. उत्तरायणात बनवलेले जीवामृत लाभदायक ठरते तर देताना सकाळच्या सत्रात म्हणजेच दक्षिणायनात दिल्यास उपयुक्त या दृष्टीनेच शेतकरी मित्रांनो अगदी अल्प खर्चात बनणारे मात्र लाखो पटीने लाभदायक जीवामृत शेतीला वापरून आपली उत्पादनक्षमता वाढवणे आवश्यक असते. साधारण २०० लिटरमध्ये होणारे जीवामृत एक एकर क्षेत्रावरील शेतीस उपयुक्त ठरू शकते.
उत्तम .. मस्त