पावसा, तू उशिराने का होईना आलास म्हणून काही गोष्टी तुझ्या कानावर टाकायच्या आहेत. कदाचित काही गोष्टी तुला रुचणार नाही, पटणार नाहीत, पण उशिरा येणा-यांना दम देण्याची आमची परंपरा आहे. त्या परंपरेचे आम्ही सारे पाईक आहोत, म्हणून हे सारे तुला सांगण्याचा, तुला दम देण्याचा मोह आवरत नाही. या बोलण्याचे वाईट वाटून न घेता, दिलेला शब्द पाळत जा आणि धो-धो बरसत रहा..
उशिराने आलास आणि धो धो बरसलास. तीन-चार दिवस मुंबई बेटावर धिंगाणा घातलास. त्यानंतर कालपरवाच महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचलास. तू असाच बरसत रहा, कुणी तुला थांब म्हणणार नाही, पण जरा दमानं घे. तुझ्या उन्मादाने आमच्या जगण्याची धांदल उडेल, असे वेडय़ासारखे वागू नकोस. उशिराने यायचे आणि आमचे संसार विस्कटवून टाकायचे, हे बरे नव्हे!
पावसा, खरं तर तू उशिरा आल्याबद्दल आधी दिलगिरी व्यक्त करशील असे वाटले होते. तसे सौजन्य तू दाखवलेच नाहीस. सौजन्याची ऐसीतैशी करत सारे अंदाज चुकवत तुफान कोसळलास. सारी कसर भरून काढायची ठरवून जोरदार फटकेबाजी केली. मुंबईत उत्तुंग षटकार हाणलेस. महापालिकेच्या टुकार व्यवस्थापानाचे धिंडवडे काढलेस.
रेनकोट, छत्र्यांनाही न जुमाणा-या तुझ्या सरी सा-यांनी अंगा-खांद्यावर घेऊन आनंद व्यक्त केला. लोकलच्या दारा-खिडक्यांमधून घुसखोरी करत आम्हाला चिंब भिजवलेस. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालणेही कठीण करून टाकलेस. तरीही आमची तुझ्याबद्दल अजिबात तक्रार नाही. तू पडत रहा, तुझ्या पद्धतीने. तुझी वाट पाहता पाहता गेल्या दीड महिन्यांपासून आमच्या शेतक-यांच्या डोळ्यांतील अश्रूही आटून गेले होते.
पेरलेले उगवलेच नाही, म्हणून जीव मेटाकुटीला आला होता. तुझ्या येण्याचा मुहूर्त टळल्यानंतर आता येशील, घडीभराने पडशील, आमच्या पिकांना संजीवनी देशील, असे स्वप्न आमचा शेतकरी शेताच्या धु-यावर बसून विणत होता. त्या डोळ्यांतील स्वप्नांचीही तुला कीव आली नाही. तुझ्यावर कुणाचाही भरवसाच राहिला नाही.
तुझ्याबद्दलच्या या टोकाच्या अविश्वासाबद्दल तुला साधी खंतही वाटली नाही. एक-दोन दिवस नाही तर तब्बल ३५-४० दिवसांनंतर तू आलास. शेतक-यांच्या स्वप्नांचा आधार झालास. त्यांच्या मनात एक आशेची पालवी फुटली आहे. ती पालवी वाढवण्यासाठी, बहरवण्यासाठी, जगवण्यासाठी तुझ्याच सोबतीची गरज आहे.
पावसा, तू आमच्या शेतक-यांच्या स्वप्नांचा शिल्पकार हो. त्याचे श्रेय कुणालाही लाटू न देण्याची हमी दे. तूच आहेस त्यांचा सखा, तूच आहेस त्यांचा सोबती, तूच आहेस त्यांचा वाली, आमच्या शेतक-यांची तुझ्याशीच आहे अतूट मैत्री. त्यांच्याशी दगाफटका करण्याचा बेमुर्वतपणा करू नकोस.
पावसा, आजकाल तू ऋतुचक्राचेही भान हरवून बसला आहेस. दरवर्षी मृगाचा पाऊस म्हणून तुझा किती सन्मान होता. तो सन्मान तुझ्या उशिराने येण्याच्या विक्रमाने पार विझून गेला. मृग नक्षत्राची चाहूल लागताच सारेच कसे सज्ज असतात. तुझ्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी शेतकरी आपले शेत नांगरुन-वखरून ठेवतात.
पहिल्या पावसात मातीच्या सुगंधासाठी सारेच कसे आसुसलेले असतात. पण हा मृग चक्क कोरडा गेला आणि पावसाच्या ढगांऐवजी दुष्काळाच्या ढगांनी प्रचंड अस्वस्थ करून सोडले. पाणीकपातीच्या संकटाने आमच्या शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले. तुझ्या बेभरोसेपणामुळे गल्लीबोळात तुझ्या नावाने बोटे मोडली गेली.
तू यावा म्हणून कुणी देवळात घंटानाद करत बसले. कुणी बेडकांचे लग्न लावून दिले. त्याला तू कधीच जुमानत नसतोस पण देवभोळ्या माणसांनी हे सारे करून पाहिले. तू बहिरेपणाचे सोंग घेऊन ना घंटानाद ऐकलास, ना बेडकाच्या लग्नाला वऱ्हाडी म्हणून आलास. तू असे कुणाच्या अंधश्रद्धेला बळी पडूही नयेस. पण आमच्याशी दगाफटकाही करू नयेस, एवढीच कळकळीची विनवणी करायची आहे तुला. तू वाजत-गाजत यावेस, तुझ्या स्वभावाप्रमाणेच कोसळावेस, पण कुणाची नासधूस करू नयेस. कुणाचे संसार उघडय़ावर आणण्यासाठी तू कारणीभूत ठरू नयेस.
मागच्या हंगामात तू अकाली बरसलास. विजांच्या कडकडाटासह गारांचा मारा केलास. शेतात असणारा गहू, हरबरा उद्ध्वस्त केलास. संत्र्यांची नासधूस केलीस. फळांचा राजा असलेला आंबाही तुझ्या गारपीटीत प्रचंड जखमी झाला. एवढा, नको तेवढा धिंगाणा तू घातलास. निवडणूक आचारसंहितेच्या कारणावरून तू केलेली नासधूस भरून काढण्यासाठी सत्ताधारी तत्काळ मदत देण्यासाठी नापास ठरले. नेमकी हीच संधी साधून विरोधकांनी आमच्या शेतक-यांना ‘बदला’चे गाजर दाखवले.
तुझ्या प्रतापामुळेही विरोधकांचे फावले, असे काही राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर बोलू लागले. आता केंद्रात सत्तापालट झालाय. तू केलेल्या शेतपिकाच्या नासाडीचाही फायदा लाटून घेणा-यांनी कोरडय़ा दुष्काळासाठी शेतक-यांना अद्याप काहीही मदत केली नाही. तुझ्या अकाली येण्याचे, नासाडी करण्याचे राजकीय फायदे उठवले जातात, हे तुझ्या कानावर का कुणीच टाकत नाही, याचेच आश्चर्य वाटते.
पावसा, तू राजकारण्यांच्या हातचे बाहुले होऊ नयेस, कारण तू सा-यांचा आहेस. तुझी गरज शेत पिकवणा-या शेतक-यांना सर्वाधिक असली तरी सा-या सजीवसृष्टीला जगवण्यासाठीची संजीवनी देणारा तूच आहेस. पावसा कुठलाही दुजाभाव न करता, तू सा-यांसाठी यावेस. अन्नदाता सुखी होण्यासाठी तुझे बेभरवसेपणाचे नखरे जरा दूर ठेवावेस. त्यासाठी आम्ही काय करायचे ते सांग..
आणि पाऊस हसला..
माणसाचे हे सारे गा-हाणे गुमान ऐकून घेतल्यानंतर पाऊस खुदकन हसला. काय करायचे म्हणून उलट मलाच काय विचारतोस, असा रागानेच खेकसला. उशिरा येणे मलाही आवडत नाही. पण माझ्या वाटेत अडथळे कुणी आणले, हे स्वत:लाच विचार, असं म्हणून तो पुन्हा रागारागाने धो-धो बरसायला लागला. विजांचा धाक दाखवून कडकडायला लागला. या विजांच्या विचकावण्याचा अर्थ आपण सारे समजून घेऊ. झाडे लावू, झाडे जगवू, पावसाचे पाणी साठवून ठेवू!
लेख वाचून अगदी चिंब झालो बघा… शेवटही मस्तच केलात!