गणपतीपाठोपाठ गौरी आल्या आणि घराघरातील आनंद द्विगुणीत झाला. गोडधोड पदार्थासोबतच वेगवेगळया रानभाज्यांचा सुवास दरवळू लागलाय. कोकणातल्या वारलीपाडय़ांपासून ते मलबार हिलच्या उत्तुंग गर्भश्रीमंत घरांपर्यंत या गौरी-गणपतीच्या सणाचा उत्साह ओसंडून वाहतोय.
महाराष्ट्राबरोबरच देशाच्या विविध भागांत गणपतीसह गौरीचं आगमनही उत्साहात साजरं होतंय. या गोरी उत्सवाला प्रांतानुसार नावं मात्र वेगवेगळी आहेत. या उत्सवामागे नव्या अन्नाचा, वनस्पतींचा संदर्भ मात्र सर्वत्र सारखा असल्याचं दिसून येतं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ‘गौरी किंवा गौराई’ म्हणून ज्यांची पूजा होते, त्यांनाच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ‘महालक्ष्मी’ नावानं पूजलं जातं. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या विविध भागांतही वेगवेगळया नावानं हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. कोकणात गौरी-गणपती असा संयुक्तिक उत्सव असला तरी इतरत्र मात्र स्वतंत्रपणे ‘महालक्ष्मी’चा हा सण साजरा होतो. हा उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जात असला, तरी त्या-त्या भागातील लोकजीवनुसार तो साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळया असल्याचं पाहायला मिळतं.
कोकणात गौरी-गणपतीच्या सणांचं कौतुक काही निराळंच आहे. कोकणात गौरी ही सासुरवाशीण असून ती तीन दिवसांसाठी माहेरी येते, या भावनेतून तिची पूजा केली जाते. मराठवाडयात मात्र काहीशी वेगळी पद्धत पाहावयास मिळते. ‘गौरी’ असा उल्लेख न करता तिला ‘महालक्ष्मी’ असं संबोधलं जातं आणि महालक्ष्मीच्या रूपातच तिची पूजा केली जाते. मराठवाडयात नव्यानं लग्न झालेली मुलगी या दिवशी आवर्जून माहेरी येते. मुलीच्या लग्नानंतर पहिल्या महालक्ष्मी सणाच्या वेळी तिचे आई-वडील ‘महालक्ष्म्या’ घेऊन मुलीच्या घरी (सासरी) जातात. नव्या सुपात ठेवून या महालक्ष्म्या सासरच्या घरी सन्मानानं दिल्या जातात. सासरची मंडळीही आपल्या घरी ‘लक्ष्मी’ आली या भावनेनं देवीच्या या प्रतिमांचा स्वीकार करतात आणि सुनेलाही महालक्ष्मीच्या रूप मानतात.
पूर्वी वर्षभर सुनेला सासूरवास सहन करावा लागत असला तरी या तीन दिवसांच्या काळात मात्र तिला अत्यंत सन्मानानं वागवलं जायचं. आता सासूरवासाचं प्रमाण कमी झालं असलं तरी या तीन दिवसांत सुनेचा सन्मान मात्र कायम आहे. दिवाळीत जेवढे फराळाचे पदार्थ केले जातात तितकेच पदार्थ या सणाच्या निमित्तानं केले जातात. मराठवाडयात आणि विदर्भातील उत्सवात बरंच साम्य असल्याचं दिसून येतं. विदर्भात ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असाही एक प्रकार आहे. ज्येष्ठा गौरी श्रीरावणातच येतात. तर कनिष्ठा गौरी भाद्रपद महिन्यात येतात. दोन्हीकडे लक्ष्म्यांच्या पुढे वेगवेगळया प्रकारचे खेळ, त्या लक्ष्मीच्या मुली, असा परिवार असतो. त्याशिवाय वेगवेगळया धान्याच्या राशी महालक्ष्मीपुढे ठेवल्या जातात. एकंदरच हा उत्सव शेतीशी निगडित असल्याचं दिसतं.
कोकणात गौरी या माहेरवाशिणी म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. सासरी शिणली-भागलेली गौरी माहेरी येते. तिचं तीन दिवस पूजन करून माहेरवाशिणीचं कौडकौतुक करावं तसंच गौरीचं केलं जातं. आदिवासीपाडय़ांपासून ते गर्भश्रीमंतांच्या घरांपर्यंत या उत्सवाचं महत्त्व सारख्याच प्रमाणात असल्याचं आढळून येतं. याबाबत कोकणातील आदिवासींमध्ये एक लोककथाही प्रसिद्ध आहे. तिची मांडणीही लोकगीतातूच केल्याचं दिसतं. खेळायला गेलेली गौरी उशीरा घरी येते आणि मग तिला कुणीच दार उघडत नाही. सासू, सासरा, नवरा, नणंद, दीर कुणीही दार उघडत नाही. तेव्हा ही गवर वेगवेगळया लोकांच्या दारात जाते. तिला कुणीच घरी घेत नाही. मग ती एका गरीब घरात जाते, तिथे मात्र तिचं सन्मानानं स्वागत केलं जातं. ती ज्या घरात जाते, त्या कुटुंबाची गरिबी जाऊन तिथं समृद्धी नांदू लागते. म्हणून वारली महिला या गौरीला मोठया प्रेमानं आपल्या लोकगीतातून निमंत्रण देतात.
‘‘लाडके गौराय कधी येसी
पानी पडलं नय भारलं
भादव्याला येणं
को-या सुपात येणं
झणकत येणं’’
कोकणाला लागून असणा-या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत गौरी असाच उल्लेख आहे. इतरत्र मात्र तिची महालक्ष्मी म्हणूनच पूजा केली जाते.
महालक्ष्मी, गौरी हे मोठया उत्सहात साजरे केले जात असले तरी त्याबाबत पुराणात थेट दाखला फारच कमी मिळतो. ‘देवी भागवत’मध्ये शाकंबरी देवीची कथा सोडली तर पुराणात थेट दाखला कुठे सापडत नाही. त्या काळी प्रचंड ओला दुष्काळ पडलेला असतो. कोणतंही पीक नीट येत नाही. लोक अन्न-पाण्यावाचून तडफडू लागतात. तेव्हा लोक बनशंकरी देवीची उपासना करतात. तेव्हा देवी प्रसन्न होते आणि आपल्या वेगवेगळया अवयवापांसून वेगवेगळया भाज्या तयार करते. त्या भाज्यांचं सेवन करून लोक जगतात. त्या देवीच्या वेगवेगळया शाखांपासून निर्माण झालेल्या भाज्यांमुळे आपण जगलो, या भावनेतून लोक तिला ‘शाकांबरी देवी’ असं म्हणू लागले. आज महालक्ष्मी वा गौरीसाठी ज्या वेगवेगळया भाज्या केल्या जातात, त्या पाहता त्याचा संदर्भ या बनशंकरी किंवा शाकांबरी देवीशी असल्याचा दिसतो. सीकेपी (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) समाजात तर या देवीला सोळा प्रकारच्या भाज्या, सोळा प्रकारच्या कोशिंबिरी, पाच प्रकारच्या पोळया असा नैवेद्य करण्याची पद्धत आहे. इतरही भागांत आंबाडयाची भाजी, माठाची भाजी, तेरडा या वनस्पतींना महत्त्व असल्याचं आढळतं.
पुराणात उल्लेख आढळत नसला तरी महालक्ष्मीची लोककथा प्रसिद्ध आहे. एका राजाला दोन राण्या असतात. एक आवडती आणि दुसरी नावडती. अर्थात, आवडती राणी राजासोबत राजवाडयात राहत असते, तर नावडती गावाबाहेर राहत असते. एके दिवशी त्या राजाच्या दोन मावश्या त्याला भेटण्यासाठी येतात. अर्थात, पहिल्यांदा त्या राजवाडयात जातात. मात्र आवडती राणी त्यांना आपल्या घरात घेत नाही. त्या दोघी पुन्हा नावडत्या राणीकडे जातात. तिची गरिबी असते तरी ती त्या दोघींचंही ती छान प्रकारे आदरातिथ्य करते. त्या दोघीही तिच्यावर खूश होतात आणि तिला महालक्ष्मीचं व्रत करायला सांगतात. नावडती राणी महालक्ष्मीचं व्रत करते आणि त्यातून तिच्या घरी ऐश्वर्य येतं. तर आवडतीच्या घरी दारिद्रय येतं. पुढे राजाही त्या नावडत्या राणीकडे येतो. समृद्धी आणि सुख देणारं असं हे व्रत म्हणून महालक्ष्मीचं पूजन केलं जातं.
देशाच्या विविध भागांत या गौरीपूजनाची प्रथा आहे. नवं धान्य देणारी देवी म्हणूनही तिची पूजा केली जाते. हिमाचल प्रदेशात तिला ‘बिह माता’ म्हणून पूजलं जातं. गौरी किंवा महालक्ष्म्यांचा हा उत्सव मातृपूजक संस्कृतीचं प्रतीक मानण्यात येतो. तिच्यापुढे मांडण्यात येणा-या धान्याच्या राशी ऐश्वर्याचं प्रतीक समजल्या जातात. वनस्पतींच्या पूजनातून निसर्गाच्या ऋणातून मुक्त होण्याचा असा हा एक प्रयत्न!
महालक्ष्मी (गौरी) पूजनाशी संबंधित ज्या कथा प्रचलित आहेत त्यांची माहिती मिळू शकेल काय?