कणकवली-देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाची ३० वर्षाची मक्तेदारी मोडीत काढत काँग्रेसचे युवा उमेदवार नितेश राणे यांनी प्रमोद जठार यांचा दारुण पराभव केला.
कणकवली- कणकवली-देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची ३० वर्षाची मक्तेदारी मोडीत काढत काँग्रेसचे युवा उमेदवार नितेश राणे यांनी भाजपचे उमेदवार प्रमोद जठार यांचा दारुण पराभव केला. नितेश राणे यांनी २५ हजार ९७९ चे नेत्रदीपक मताधिक्य मिळवत प्रमोद जठार यांच्यासह सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुव्वा उडवला. नितेश राणे यांनी ७४ हजार ७१५ मते मिळवली, तर जठार यांना ४८ हजार ७२४ मते मिळाली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कणकवली तालुक्यात जाहिर सभा होऊनही त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
मतदारांनी गाढ विश्वास दाखवलेल्या नितेश राणे यांच्या विरोधातील शिवसेनेचे सुभाष मयेकर, राष्ट्रवादीचे अतुल रावराणे, विजय सावंत यांच्यासह सहा उमेदवारांची अमानत रक्कमही जप्त झाली आहे.
कणकवली मतदारसंघात एकूण ८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी जठार दुस-या क्रमांकावर तर शिवसेनेचे सुभाष मयेकर हे १२ हजार ८६३ मते मिळवून तिस-या क्रमांकावर राहीले. राष्ट्रवादीचे अतुल रावराणे यांनी ८ हजार १९६ मते मिळविली. अपक्ष उमेदवार विजय कृष्णाजी सावंत यांनी ७ हजार २१५ मते मिळविली. शिवराज्य पक्षाचे डॉ. तुळशीराम रावराणे यांनी १ हजार ३२६ मते, तर बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांना ८२७ मते मिळाली. अपक्ष उमेदवार विजय श्रीधर सावंत यांना ७०० मते मिळाली. या मतदार संघातून १ हजार ३८१ मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला. काँग्रेस पक्षात असतानाही परिषदेची आमदारकी घेवून बंडखोरी केलेले विजय सावंत या निवडणुकीत पार पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. विजय सावंत यांनी दाखवलेल्या साखर कारखान्याच्या भुलभुलय्याही मतदारांनी झुगारून दिला.
मतमोजणीच्या प्रक्रियेत पहिल्या फेरीपासूनच नितेश राणे आघाडीवर होते. पहिल्याच फेरीत १ हजार ०५२ चे मताधिक्य आणि दूस-या फेरीत ३४१ चे मताधिक्य मिळवल्यावर ही लढत नितेश राणे आणि प्रमोद जठार यांच्यातच असल्याचे स्पष्ट झाले. हे मताधिक्य प्रत्येक फेरीनुसार वाढतच चालल्यावर पराभवाचा अंदाज आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि काही प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. टपाल मतांमध्येही नितेश राणे यांनी आघाडी घेतली. १ हजार ०९६ मते त्यांना मिळाली. प्रमोद जठार यांना ७२ , अतुल रावराणे यांना ४, सुभाष मयेकर यांना २१, तुळशीराम रावराणे यांना १, विजय कृष्णाजी सावंत यांना १७ तर अपक्ष विजय सावंत यांना १ मत मिळाले. एकूण १ लाख ५५ हजार ९५९ मतदारांनी मतदान केले . त्यात ४०० मते ही पोस्टल मते होती.
सर्वांचे जाहीर आभार
कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघातील मतदारांचे मनापासून धन्यवाद! माझ्यावर टाकलेला विश्वास आणि मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करीन. काँग्रेस पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी जी मेहनत माझ्यासाठी घेतली त्यामुळे माझा विजय शक्य झाला आहे असा माझा ठाम विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्व मतदारांचे, सर्व वृत्तपत्रांचे आणि आपण दिलेल्या सहकार्याबाबत आपले मनपूर्वक आभार! – नितेश राणे, आमदार, कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघ
[EPSB]
होय, माझा पराभव झाला!
हा पराभव मी स्वीकारला असून ज्या कोकणी माणसाने यापूर्वी भरभरून मते दिली. अनेक उच्चपदेही त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनीच आज पराभूत केल्यावर त्यांच्यावर मी नाराज वा दु:खी नाही.
माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या विकासाच्या मॉडेलचा, कोकणाच्या परिवर्तनाच्या विचाराचा ऊहापोह हे या लेखाचे प्रयोजन आहे.
[/EPSB]
नीतेश साहेब तुम्ही निवडून याल याची खात्री होती पन त्याच्बरोबर राणे साहेब पन निवधून येतील याचीही उत्क्ण्टा होती… दुर्दैव अस की या कोकणी माणसाला विकास काय असतो हे कधीच कळू शकलो नाही ……साहेबांचा पराभव झाला हे शब्द कानावर पडताच डोळ्याच चटकन पाणी आल…विश्वास बसू शकला नाही अस हे भाकीत खर ठरलं …खूप यातना होतात …साहेबांचा पराभव म्हणजे एकटा त्यांचा पराभव नाही तर माझ्या एका घरातल्या व्यक्तीचा पराभव झाला असच वाटत….साहेब तुम्ही पुन्हा नव्या उमेदीने उभे राहाल हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो ………….
अभिनंदन श्री, नितेश राणे यांचे,!!