देशभरात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. काहींना यश मिळते तर काही अपयशी ठरतात. अपयश आले तरी प्रयोगशील शेतक-यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी होताना दिसत नाही.
देशभरात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. काहींना यश मिळते तर काही अपयशी ठरतात. अपयश आले तरी प्रयोगशील शेतक-यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी होताना दिसत नाही. त्रिपुरा राज्यातील रंगकंग गावातील मुक्ताल हुसेन या शेतक-याने तेथील विपरीत हवामानात यशस्वी द्राक्षशेती करून कृषी संशोधकांनाही चकित केले आहे.
त्रिपु-यात द्राक्षशेती व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होऊ शकेल का याबाबत कुतूहल निर्माण झालेल्या या संशोधकांनी अधिक संशोधनाची आवश्यकता व्यक्त केली आहे. गोमती जिल्ह्यातील रंगकंग हे छोटेसे गाव असून मुक्ताल हुसेन यांच्या या करामतीने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हुसेन यांनी केलेल्या या प्रयोगशील शेतीतून त्यांना चांगले द्राक्ष उत्पादन मिळाले आहे.
या यशाने आनंदित झालेल्या हुसेन यांनी ‘वाइनयार्ड’ सुरू करण्याचे स्वप्न असल्याचेही बोलून दाखवले आहे. राज्याचे कृषी विभागाचे अतिरिक्त संचालक बहारूल इस्लाम यांनी हुसेन यांचे कौतुक केले आहे. बोक्सानगरसह सिपाहीजला जिल्ह्यातील इतर गावांमध्येही द्राक्षशेती होऊ शकते याची जाणीव हुसेन यांच्या प्रयोगामुळे आता आम्हाला झाली आहे.
मात्र त्रिपु-यातील कृषी हवामान पाहता द्राक्षपीक राज्यात मोठय़ा प्रमाणावर घेता येऊ शकेल का, यासाठी चौकस चाचणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. द्राक्षपिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान योग्य मानले जाते. त्याचबरोबर ९०० सेंमीपेक्षा जास्त पाऊस या पिकास मानवत नाही.
हे सर्व गुण त्रिपु-यातील हवामानात आढळून येतात. मात्र हवामानातील जास्त प्रमाणातील आद्र्रता ही या पिकाच्या लागवडीत अडथळा ठरू शकते, असे कृषी संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळेच व्यावसायिक तत्त्वावर द्राक्ष उत्पादनाची शक्यता आणि ते फायद्याचे ठरेल का, याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.
द्राक्षपीक घेण्याचा आपण प्रयत्न केला. विपरीत हवामानातही वेलींना द्राक्ष धरणे आणि त्यांची चांगली वाढ होणे हा आपल्यासाठीही आश्चर्याचा सुखद धक्काच असल्याचे मुक्ताल हुसेन यांनी सांगितले. आमच्या एका शेजा-याने त्याच्या शेतात द्राक्षाची लागवड केली. मात्र वेलीवर द्राक्षच धरली नाहीत. मात्र मी त्या रोपावर कलम करून त्याची आपल्या शेतात लागवड केली. त्याची योग्य वाढ होऊन त्याला द्राक्षही धरली, असे हुसेन यांनी सांगितले.
द्राक्षाची जोपासना कशी करतात याची आपल्याला अजिबात माहिती नव्हती. द्राक्षवेलींची लागवड केल्यानंतर या पिकाला शेणखत आणि कम्पोस्ट खत दिले. तसेच योग्य प्रमाणात पाणी दिल्याने या पिकाची चांगली वाढ झाल्याचे हुसेन यांनी सांगितले. प्रयोग यशस्वी केल्यानंतर द्राक्षाची व्यावसायिक शेती करण्याचे त्यांनी ठरवले आहे. यासाठी द्राक्ष लागवडीसाठी योग्य मार्गदर्शनाच्या ते प्रतीक्षेत आहेत. द्राक्षशेतीच्या व्यावसायिक यशस्वीतेबाबत आपल्या मनात कोणतीच शंका नाही. यापूर्वी मोसंबी आणि संत्रा यांचेही उत्पादन घेतले जात नव्हते. मात्र आता याची राज्यात व्यावसायिक लागवड झालेली आहे, असे उत्साहित झालेल्या मुक्ताल यांनी सांगितले.
संशोधनासाठी सरकारी मदतीची आवश्यकता
व्यावसायिक द्राक्षशेती यशस्वी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. त्रिपु-यातील मातीचे परीक्षण करून ती द्राक्ष लागवडीसाठी योग्य आहे का हे संशोधनानंतरच स्पष्ट होईल. तसेच या पिकावर बुरशीजन्य रोगांची शक्यता पडताळून त्याच्या नियंत्रणाच्या उपाययोजनांवरही काम करण्याची गरज आहे. यासाठी कराव्या लागणा-या संशोधनाच्या आर्थिक खर्चाचा भार सरकारकडून उचलला जाण्याची अपेक्षा कृषी संशोधकांनी व्यक्त केली आहे.
मोसंबी आणि संत्र्याप्रमाणेच द्राक्षशेतीही त्रिपु-यात यशस्वी होईल. मोठय़ा प्रमाणावर द्राक्ष लागवड असलेल्या महाराष्ट्रात जाऊन तेथील शेतक-यांकडून या पिकाच्या लागवडीविषयी जाणून घ्यायला आपल्याला आवडेल.
– मुक्ताल हुसेन, प्रयोगशील शेतकरी
द्राक्ष पिक व त्यावर आधारित उध्यो सुरु करण्यापूर्वी त्रिपुरातील शेतकर्यांनी नाशिक,सांगली,तासगाव भागातील शेतकरी व wine उत्पादकांशी चर्चा करावयास हवी.एखादे वेळी एखाद्या प्रदेशात तेथे नेहमी न येणारे पिक येऊ शकेल पण त्याची चव,खर्च,वगैरे बाबी लक्षात घ्य्वायास हव्या.हापूस म्हटला म्हणजे फक्त कोंकण,सफरचंद काश्मीर,,मोसंबी नागपूर. तेव्हा ज्या भागात सहजगत्या जे होईल तेच पिक घ्यावे.भलते सलते प्रयोग करण्यात वेळ/खर्च करू नये.