हृदयविकार हा केवळ पुरुषांमध्ये आढळून येतो, हा समज अतिशय चुकीचा असून पुरुषांपेक्षा हे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आढळल्याचं दिसून येतंय. २९ सप्टेंबर २०१४ ला असणा-या ‘जागतिक हृदय दिना’ निमित्त स्त्रियांमध्ये आढळून येणा-या हृदयाघाताची लक्षणं नेमकी काय आहेत आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
आपल्यापैकी प्रत्येकाचा एकतरी कुटुंब सदस्य किंवा मित्र हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त असतो. हा आजार अगदी रक्तदाबाप्रमाणे सामान्यही असू शकतो किंवा धमनी काठीण्याप्रमाणे जटीलदेखील असू शकतो. हृदयघाताची उदाहरणं ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल की हे सर्व कसं काय होऊ शकतं.
२०१० वर्षी भारतात २४ टक्के मृत्यु (संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे) हृदय संबंधित आजारांनी होत असल्याचे नोंदवण्यात आले आहेत. हृदय संबंधित आजार मुख्यत्वेकरून पुरुषांनाच होत असतात, हा समज अतिशय चुकीचा आहे. सध्याच्या आधुनिक काळामध्ये पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही हृदय संबंधित आजार होत असल्याचं आढळून आलं आहे.
हे कशामुळे घडून येतं ?
बदलत्या जीवनशैलीमुळे हार्मोन्समध्ये मोठे बदल घडून येत आहेत. परिणामी, ओएस्ट्रोजन हार्मोन्स कमी होतात. मासिक पाळी सुरू असल्याच्या काळापेक्षा रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये हृदयाघात होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे. कारण, या काळात ओएस्ट्रोजन स्त्रवणं बंद होतं.
स्त्रियांमधील हृदय संबंधित आजारांची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे-
>खूपच जास्त थकवा
>निद्रानाश
>श्वासोच्छ्श्वासाला त्रास
>अपचन
तज्ज्ञांना असं आढळून आलं आहे की, स्त्रियांमध्ये ब-याचदा हृदयरोगाची लक्षणं दिसून येतात. तसंच त्या क्वचितच तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याने हृदयरोगाचं निदान आणि त्यावरील उपचार वेळेवर होऊ शकत नाही. भारतातील हृदय संबंधित आजारांचा वाढता धोका ध्यानात घेता प्रत्येक स्त्रीचं हे कर्तव्य आहे की त्यांनी नियमित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. कुटुंबाचा कणा असलेल्या स्त्रीने नेहमीच तिच्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे.
हृदयरोगाला प्रतिबंध करण्याकरिता तिने खालील काही साध्या गोष्टींचा अवलंब करावा :
>नियमित ३० मिनिटांचा व्यायाम : शारीरिक व्यायाम तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तसेच यामुळे हृदयावर ताण येणारी स्थिती म्हणजेच, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल व मधुमेह वाढण्याची शक्यता कमी होते.
>ठरावीक कालावधीनंतर व नियमितपणे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणं : तुमचा रक्तदाब व कोलेस्टेरॉलचा स्तर नियमितपणे तपासून घ्या. कारण त्यामुळे तुमचं हृदय व रक्तवाहिन्यांना हानी पोहोचू शकते. तथापी, यांचं प्रमाण सामान्य स्तरावर नसेल किंवा हृदयाशी संबंधित आजाराची इतर लक्षणं आढळून आली तर तुम्ही वारंवार त्यांची तपासणी करत राहिली पाहिजे. खासकरून तुमच्या कौटुंबिक इतिहासामध्ये कुणाला मधुमेह असेल तर रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य आहे का याची तपासणी करून घेतली पाहिजे.
>हृदय स्वस्थ ठेवणा-या आहाराचे सेवन करा : ओमेगा ३ फॅटी अॅसिडस्ने समृद्ध आहाराचं सेवन करा. कोलेस्टेरॉल, चरबीयुक्त पदार्थ व मिठाचं प्रमाण कमी असलेल्या आरोग्यपूर्ण समतोल आहाराचं सेवन करावं. लाल मांस व सॅच्युरेटेड फॅटस्चं सेवन टाळावं. अळशी, बदाम, ओटमील, ब्राउन राइस, पालक, अक्रोड, टोमॅटो, मासे इत्यादींचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा.
>वयोमानानुसार आपले वजन नियंत्रित ठेवा : स्त्रियांचं वय जसजसं वाढतं तसतसं त्यांचं वजनही वाढतं. योग्य आहार आणि बागकाम, घराची साफसफाई, नृत्य इत्यादी शारीरिक हालचालींद्वारे वजन आटोक्यात ठेवा.
>आवश्यक झोप घ्या : रात्री ७-८ तास झोप घ्या. तसेच ९ तासांपेक्षा जास्त वेळ झोपू नका.
>धूम्रपान व तंबाखू सेवन टाळा : धूरविरहित तंबाखूसहित सर्व प्रकारच्या तंबाखू उत्पादनांपासून लांब राहा. तंबाखूमध्ये असलेली रसायनं हृदय व रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात. यामुळे तुमच्या हृदयातील धमण्या अरुंद होऊ शकतात. सिगारेटमध्ये असलेले निकोटिन रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो.
सर्वावर जीवनामध्ये व्यावसायिक व वैयक्तिक जबाबदा-या असतात. पण, सर्वात मुख्य जबाबदारी आपल्या स्वत:च्या शरीराची काळजी ही आहे. कारण, जीवनामध्ये छोटासा बदल मोठे परिवर्तन आणू शकतो. नियमित आरोग्य तपासणी, दररोज तीस मिनिटांचा व्यायाम, जंक फूड टाळणं आणि फळं व भाज्या यांचं जास्त सेवन केल्यास तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतो.
आयुष्य हे अमूल्य आहे, तुमच्या हृदयाची काळजी घ्या आणि मग ते देखील तुमची काळजी घेईल.
एकदम चांगली माहिती लिव लस रे बाबा ,देव तुझा भला करो ,!