मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक अग्रेसर विद्यापीठ असून ‘पहिल्या तीन विद्यापीठांपैकी एक’ असा मान मुंबई विद्यापीठाने पटकावला आहे. याशिवाय जगातल्या ‘टॉप ट्वेंटी’ विद्यापीठांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठ नवव्या स्थानावर असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया तसेच ‘एमआयटी’लाही मागे टाकत जगाच्या पाठीवर मुंबई विद्यापीठाचे नाव अधोरेखित झाले आहे.
मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७मध्ये झाली. ‘वुड्स शैक्षणिक योजने’ अंतर्गत या विद्यापीठाची स्थापना झाली आहे. पूर्वी ‘बॉम्बे विद्यापीठ’ अशी याची ओळख होती. मात्र ‘बॉम्बे’ शहराचे ‘मुंबई’ असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव ४ सप्टेंबर १९९६ रोजी ‘बॉम्बे विद्यापीठ’ऐवजी ‘मुंबई विद्यापीठ’ असे करण्यात आले. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या राजाबाई टॉवरमुळेही मुंबई विद्यापीठाची शान वाढली आहे.
गिल्बर्ट स्कॉटने या इमारतीचा आराखडा तयार केला होता. १५व्या शतकातील इटालियन भवनासारखी मुंबई विद्यापीठाची इमारत दिसते. विद्यापीठाची मुख्य इमारत, ग्रंथसंग्रहालय, दीक्षांत सभागृह व ८० मीटर उंचीचा राजाबाई टॉवर या वास्तू मुंबई विद्यापीठाच्या सौंदर्यात भर घालतात.
मुंबई विद्यापीठाला समृद्ध आणि वैभवशाली परंपरा आहे. या काळात मुंबई विद्यापीठातून शिकलेल्या अनेकांनी जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महादेव गोिवद रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, द्वारकानाथ कोटणीस, मोहम्मद अली जिना, लालकृष्ण अडवाणी, जगदीश भगवती, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, वसुंधरा राजे, प्रफुल्ल पटेल, अजित गुलाबचंद असे अनेक दिग्गज या विद्यापीठांचे विद्यार्थी होते.
विद्यापीठाचे आरंभीचे स्वरूप, वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था, असे होते. त्यावेळी मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापीठाचे कुलपती असायचे. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिंध यांचा समावेश होता; परंतु संलग्न महाविद्यालये केवळ चार ते पाचच होती. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एलफिन्स्टन हे मुंबई विद्यापीठाचे प्रथम कुलपती, तर मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू होते. १८५७च्या कायद्यानुसार, कुलसचिवाची नेमणूक सिनेट फक्त दोन वर्षासाठी करीत असे. १९०२साली प्रथम फर्दुनजी दस्तूर या एलफिन्स्टन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकाची अर्धवेळ कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. हे पद त्यांनी १९३०पर्यंत भूषवले. त्यानंतर एस. आर. डोंगरकेरी, टी. व्ही. चिदंबरम व का. स. कोलगे हे कायम स्वरूपाचे कुलसचिव होते.
मुंबईमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे डॉ. जॉन विल्सन, ज्यांच्या नावाने मुंबईत विल्सन महाविद्यालय आहे, ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे पहिले सभासद होते. १९४८चा माध्यमिक शालान्त परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचे काम मुंबई विद्यापीठाकडे होते. १८५९ साली पहिली मॅट्रिकची परीक्षा झाली. या पहिल्या मॅट्रिकच्या परीक्षेत १३२ मुलांपैकी फक्त २२ मुलेच उत्तीर्ण झाली होती. पहिली प्रथम वर्ष (कला) परीक्षा १८८१मध्ये झाली. त्यात पहिल्या मॅट्रिकच्या तुकडीतील १५ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी सातच उत्तीर्ण झाले. या सातांपैकी पहिल्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात सहा विद्यार्थी बसले, त्यांपैकी चार उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा हा मान महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांनी पटकावला.
भारतीय विदयापीठ अधिनियम १९०४मध्ये मंजूर होऊन विद्यापीठाचे स्वरूप बदलले. १९१३ सालापासून पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य मुंबई विद्यापीठाने सुरू केले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे, ही काय्रेही विद्यापीठाकडेच होती. १९२८च्या अधिनियमानुसार, विद्यापीठाच्या सिनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधिक स्वरूपाची झाली. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापीठाच्या कक्षेत आले व त्यानुसार संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांना विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून मान्यता देणे, या तरतुदी करण्यात आल्या. पदवीपर्यंत शिक्षण संलग्न महाविद्यालयात व पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठाच्या विभागांद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई विद्यापीठाच्या १९५३च्या अधिनियमानुसार विद्यापीठाची पुनर्रचना झाल्याने सर्व संलग्न महाविद्यालये घटक-संस्था होऊन विद्यापीठाचे स्वरूप संघात्मक (फेडरल) झाले. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संशोधन संस्था यांमधील पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षणावर नियंत्रण ठेवता येऊन त्या संबंधी कार्यकारी मंडळात शिफारसी करता येतील, अशा शैक्षणिक विभागांची निर्मिती झाली. बहि:शाल शिक्षण, निरंतर शिक्षण, विद्यापीठ व्याख्यानमाला, विद्यापीठेतर शिक्षणक्रम, विद्यार्थी कल्याण केंद्र, पत्रद्वारे शिक्षण, पाठनिर्देश पद्धती, आरोग्य केंद्र, माहिती संचालनालय, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र इत्यादींची विद्यापीठीय कार्यात भर पडली. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांच्या कार्याची तपासणी करणे, प्राध्यापक व सेवक यांच्या कार्याची तपासणी करणे, प्राध्यापक व सेवक यांच्या नेमणुका करणे, त्यांच्या सेवेच्या शर्ती ठरवणे, पदव्युत्तर शिक्षण केंद्रावर नियंत्रण ठेवणे, या स्वरूपाचे अधिकारही विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळास प्राप्त झाले.
जगभर शिक्षण क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत आहेत. हे बदल वेळोवेळी मुंबई विद्यापीठाने अंगीकारले आहेत. या बदलांच्या अनुषंगाने शिक्षणपद्धतीत होणा-या बदलांची योग्य सांगड मुंबई विद्यापीठाने घातली. गेल्या तीन-चार वर्षात विद्यापीठाने जवळपास ५५ नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे, याची कास धरणा-या मुंबई विद्यापीठाने कम्युनिटी कॉलेजेस सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता यावेत म्हणून अभ्यासक्रम सुरू केले आहेत. शैक्षणिक संशोधन व्हावे, यासाठी जवळपास चार लाखांहून अधिक रीसर्च जर्नल्स ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी, यासाठी सूक्ष्म विज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल करत नॅनो सायन्स व टेक्नॉलॉजी हा अद्ययावत विभाग सुरू करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरे या खेरीज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा प्रदेशातील सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाली.
पहिल्या १७ वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाची स्वत:ची इमारत नव्हती. विद्यापीठाची कचेरी टाऊन हॉलमध्ये होती. सिनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही याच ठिकाणी होत. १८६९मध्ये कावसजी जहांगीर रेडीमनो यांनी विद्यापीठाला इमारतीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहास ‘सर कावसजी जहांगीर हॉल’ असे नाव देण्यात आले. १८६४ मध्ये प्रेमचंद रायचंद यांनीही दोन लाख रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या स्मरणार्थ मनोरा (टॉवर) बांधण्यास आणखी दोन लाख रुपये दिले. विद्यापीठाच्या वाढत्या कार्यक्षेत्रामुळे जुनी जागा अपुरी पडू लागली. विद्यापीठाच्या काही विभागांचे काम सांताक्रूझ येथील ‘विद्यानगरी’ येथून सुरू झाले. सध्या विद्यापीठाच्या एकूण ३४ इमारती आहेत. चार इमारतींचे बांधकाम सुरू आहे व १२ इमारती बांधावयाची योजना तयार आहे.
ही माहिती खरच खूप महत्वाची आहे. ज्या विद्यापीठातून मी शिकत आहे. त्याचा इतिहास असा आहे हे वाचून मान प्रफुल्लित झाले. खूप आभार ‘ वर्षा फडके ‘ यांचे .