कोणाशीही मैत्रीचा हात पुढे करायचा आणि हातात घेतलेला हातच बेसावधपणे खेचून घ्यायचा ही पाकिस्तानची कूटनीती आता भारताच्या मुळावर येत आहे. पाकिस्तान आणि भारत यांचे नाते सख्खे भाऊ आणि पक्के वैरी अशातले आहे. मूँह में राम आणि बगल में छुरी ही म्हण पाकिस्तानला तंतोतंत लागू पडते. मात्र भारताने कितीही पेकाट मोडले तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे सापाला दूध पाजून काही उपयोग नाही. त्याच्या फणाच ठेचल्या पाहिजेत या मुद्दय़ापर्यंत भारतीय जनमत आले आहे. मात्र सरकारला जनमताप्रमाणे चालता येत नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करून त्याप्रमाणे पावले उचलावी लागतात. म्हणूनच भारत पाकिस्तानचे सगळे अत्याचार सहन करत आहे. सीमेवर सर्व काही शांत आहे असे वाटून भारताने थोडा सुटकेचा निश्वास सोडावा तर पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुठे ना कुठे गोळाबार होतोच. कर्तव्य या नात्याने जवान कधी झोपेत नसतातच, ते सतत डोळ्यांत तेल घालून सरहद्दीचे रक्षण करत असतात, पण नाहक प्राण गमावतात याचे सामान्यजनांनाही दु:ख होते. आताचेच लक्षात घेतले तर पाकिस्तानकडून सलग तिस-या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. बुधवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सकाळी पावणेनऊच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मंगळवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. त्यानंतर बुधवार सकाळपासून पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरूच ठेवला. जेव्हा मोठय़ा यंत्रणांच्या साह्याने होणारा गोळीबार लक्षात येतो तेव्हा पाकिस्तान युक्ती योजून लहान शस्त्रांचाही उपयोग करतो. बुधवारी लहान शस्त्रांच्या मदतीने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. याशिवाय पाकिस्तानी लष्कराकडून मोर्टारचाही वापर करण्यात आला. या भागात भारतीय जवानांकडून गस्त घातली जात असताना पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये मोहिंदर शहीद झाले. पाकिस्तानकडून सोमवारपासून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सोमवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास श्रीनगरमधील विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. १८२ व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला. यानंतर विमानतळ परिसराला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा मनसुबा धुळीस मिळवला. सीमा सुरक्षा दलाच्या जवावांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात सहाय्यक उपनिरीक्षक बी. के. यादव यांना वीरमरण आले.
जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी घुसल्याची गोपनीय माहिती आधीच उपलब्ध झाल्याने दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात बीएसएफला यश आले. ते दहशतवादी अफजल गुरू स्क्वॉडचा भाग होते. त्याने दोन गटांमध्ये विभागणी केली होती. सात दहशतवादी सदस्य आधी सीमा ओलांडून घुसले होते. त्याच्या नंतर दुसरा गट पाकिस्तानच्या पंजाबच्या नारोळ भागातून भारतातील गुरदासपूर येथे दाखल झाला. त्यानुसार अफजल गुरू स्क्वाडच्या तीन दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस कॅम्पवर हल्ला केला, त्यात ८ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. भारतीय सैन्य दलाने एक मोठी कामगिरी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अरनियामध्ये सुरुंगाच्या माध्यमातून भारतीय हद्दीत प्रवेश करणा-या दहशतवाद्यांचाही प्रयत्न हाणून पाडला आहे. या सुरुंगातून भारतात प्रवेश करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन फसला आहे. अरनिया हा भाग पाकिस्तान सीमेला लागून आहे, त्यामुळे या परिसरातून दहशतवादी नेहमीच भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात. या सुरुंगाच्या माध्यमातून दहशतवादी भारतात प्रवेश करणार होते. त्यानंतर सणा-सुदीच्या काळात घातपात घडविण्याचा त्यांचा डाव होता.
पाकिस्तानने या तीन दिवसांत भारताविरुद्ध केलेले हे कारनामे आहेत. गेल्या एक महिन्यापासून सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या वर्षभरात भारतीय सैन्याने आतापर्यंत १२५ हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पाकिस्तानच्या एकूणच कारनाम्याचा विचार केला तर युद्धात कामी आले नसते त्याहून कितीतरी अधिक जवान शहीद झाले आहेत. जेव्हा सीमेवर पाकिस्तानचे काही चालत नाही तेव्हा त्यांनी आता जवानांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांनी बीएसएफ जवानाच्या घरावर हल्ला केला. इतकेच नाही तर बीएसएफ जवान रमीज अहमद यांची घरात घुसून हत्या केली. शिवाय रमीझ यांच्या घरातील दोघेजण जखमी झाले आहेत. रमीझ हे राजस्थानात सेवा बजावत होते आणि ते सुट्टीवर काश्मीरमध्ये घरात आले होते.
सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होते. तेथे भारतीय जवान शहीद होतात, मात्र ते घरातही स्वस्थ राहू शकत नाही. तेथेही दहशतवाद दबा धरून बसलेला असतो. तो जवानांचा घात करतो. हे किती काळ सहन करणार असा प्रश्न सामान्यजन करत आहेत. याला शेवट नाही का? भारताचे नंदनवन असलेला काश्मीर हा कळीचा मुद्दा आहे. त्यावर पाकिस्तानचा डोळा आहे. म्हणूनच हा सातत्याचा रक्तपात घडत आहे. बळी दिलेल्या प्राण्याच्या रक्ताने सैतान शांत होतो, पण जवानांचा रक्तपात घडवून पाकिस्तानरूपी सैतान शांत होत नाही ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
कधीतरी बातमी येउद्या कि भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि पाकिस्तानचे ५० सैनिक मारले गेले.
ते जमत नसेल तर आमची मारली म्हणून सारखे रडू तरी नका …. हसू करून घेऊ नका.