भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन लढतींच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (१० जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरुवात होत आहे.
हरारे- भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन लढतींच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (१० जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरुवात होत आहे. नवोदित क्रिकेटपटूंचा भरणा असूनही पाहुणा संघाला विजयासाठी दावेदार मानला जात आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वगुणांसह युवा क्रिकेटपटूंच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या मोसमातील पहिल्या परदेश दौ-यात (बांगलादेश) प्रमुख क्रिकेटपटू असूनही भारताला पराभव पाहावा लागला. संथ खेळपट्टय़ांवर फलंदाजीतील बदललेला क्रम पाहुण्यांना महागात पडला. बांगलादेशातील मानहानीजनक मालिका पराभवानंतर झिम्बाब्वेच्या छोटेखानी दौ-यासाठी सर्वच प्रमुख क्रिकेटपटूंना विश्रांती देताना नवोदितांना संधी देण्यात आली.
मुंबईचा प्रतिभावंत फलंदाज अजिंक्यकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. कर्णधार रहाणेसह मुरली विजय, ऑफस्पिनर हरभजन सिंग हेच थोडे फार अनुभवी असले तरी मालिकेत विजयासाठी भारतच ‘फेवरिट’ मानला जात आहे.
कर्णधारपदाची भूमिका चोख पार पडण्यासह अजिंक्य हा मधल्या फळीतील स्थान अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे. रॉबिन उथप्पासह मनोज तिवारी, केदार जाधव, अंबाती रायडू आणि मनीष पांडेला आपली क्षमता दाखवून देण्याची संधी आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा हरभजन वनडे संघात स्थान कायम करण्यास उत्सुक आहे. भुवनेश्वर कुमारवर मध्यमगती मा-याची भिस्त आहे. त्याच्या सहकाऱ्यांसाठी मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीसह संदीप शर्मामध्ये चुरस आहे.
ऐतिहासिक पाकिस्तान दौ-यात झिम्बाब्वेला वनडे आणि कसोटी मालिका गमवावी लागली. ‘स्टार’ क्रिकेटपटूंचा अभाव आणि फार कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाटय़ाला येत असल्याने झिम्बाब्वेचा दर्जा उंचावत नाही.
मात्र घरच्या पाठीराख्यांसमोर इल्टन चिगुंबुरा आणि कंपनीला कमी लेखून चालणार नाही. चिगुंबुरासह हॅमिल्टन मॅसॅकद्झा, सीन विल्यम्स, सिकंदर रझा, वुसी सिबांडा, चामू चिभाभाकडून यजमानांना खूप अपेक्षा आहेत.
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजन सिंग, अक्षर पटेल, करन शर्मा, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.
झिम्बाब्वे : इल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चाकाब्वा (यष्टिरक्षक), चामू चिभाभा, ग्रॅमी क्रीमर, नेविल मॅडझिवा, हॅमिल्टन मॅसॅकद्झा, रिचमंड मुटुंबामी (यष्टिरक्षक), तिनाशे पनयांगारा, वुसी सिबांडा, सिकंदर रझा, डोनाल्ड टिरिपॅनो, ब्रायन विटोरी, प्रॉस्पर उत्सेया, माल्कम वॉलर, सीन विल्यम्स.
वेळ : दु. १२.३० वा.
थेट प्रक्षेपण : डीडी वन आणि स्टार स्पोर्ट्सवर.
दोन वर्षापूर्वीही नवोदित संघ वरचढ ठरला होता
भारताने २०१३ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात नवोदितानांचा भरणा होता. त्यावेळी भारताने यजमानांचा ५-० असा धुव्वा उडवला होता.
लेगस्पिनर अमित मिश्राने १८ विकेट घेत देशांतर्गत मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. तशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरला. मिश्राला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
अजिंक्य म्हणतो, यजमान चुरस देतील
भारताचा नवा वनडे कर्णधार अजिंक्य रहाणे हा प्रतिस्पध्र्याना कमी लेखण्यास तयार नाही. झिम्ब्वावे संघ चांगली चुरस देईल, असे त्याने वनडे मालिकेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सांगितले.
‘‘बांगलादेश दौ-यातील अपयशाचे दडपण आमच्यावर नाही. तो दौरा आता भूतकाळ झालाय. सध्या विद्यमान दौ-याचा आम्ही अधिक विचार करतोय. यजमानांच्या कमकुवत बाबी हेरतानाच सांघिक कामगिरी उंचावण्याचा आणि सातत्य राखण्याचा आम्ही प्रयत्न करू.
प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालत नाही. यंदाही प्रतिस्पर्धी संघ चांगला आहे. त्यांच्यात समतोल आहे. आम्ही त्यांचा आदर करतो,’’ असे रहाणेने म्हटले.
विद्यमान मालिकेत आयसीसीतर्फे नव्या वनडे नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याबाबत विचारले,‘‘प्रत्येक नव्या नियमांचा कसा उपयोग करवून घेतो, यावर खूप काही अवलंबून आहे. त्यामुळे ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका असल्याचे,’’ अजिंक्यने सांगितले. कर्णधारपदाची जबाबदारी हे माझ्यासाठी नवे आव्हान आहे. मात्र हे आव्हान निश्चित पेलेन, असे तो म्हणाला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील शुक्रवारपासून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला चांगली लढत मिळेल अशी अपेक्षा