डोंबिवलीच्या टुमदार वाडा संस्कृतीत १९५१ मध्ये फडके रोडवर उभी राहिलेली पहिली बिल्डिंग वजा चाळ म्हणजे पित्रे बिल्डिंग. एक चाळ, एक मजली आणि इतर दोन्ही दुमजली. गिरगावातील चाळींप्रमाणे आतील भागात तीन बाजूंनी बि-हाडं आणि मधे एक मोकळा चौक. तर बाहेर रस्त्याच्या बाजूला अंगण, त्यावरचा मांडव, विहीर, कृष्णकमळ, विलायती फणस, चाफा ही झाडे असा बिल्डिंगच्या सभोवतालचा परिसर ही पित्रे बिल्डिंगची शान होती. डोंबिवलीतील गणेशोत्सव, आप्पा दातार चौकात रंगणारी दिवाळी पहाट, गुढीपाडव्याची नववर्ष स्वागतयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या सभा यांची साक्षीदार असलेली ही चाळ आता शहरीकरण आणि पुनर्विकासाच्या ओघात केवळ आठवणीपुरतीच राहिलीय.
अनंत हरी पित्रे, बाळकृष्ण हरी पित्रे आणि मधुकर पित्रे यांनी या बिल्डिंगचं हे कुटुंब उभारलं. मार्च १९६७ पासून भाडेकरू म्हणून त्यांच्याशी जोडलं गेलेलं नातं, त्यांच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्यामुळे आजही टिकून आहे. मुंबईतून डोंबिवलीसारख्या गावात स्थलांतरीत होताना मनात धाकधुक होतीच; पण या चाळीतील रहिवाशांचा एकमेकांशी असलेला घरोबा, एकोप्यामुळे ती दूर झाली. येथील ब्राह्मण, मराठा तसंच मद्रासी, गुजराथी अशा सर्व भाडेकरूंनी आपल्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांचे सण, उत्सव, हळदीकुंकू समारंभ, लग्न, मुंज एकत्रितपणे साजरे केले.
मद्रासी कुटुंबीयांकडे ओनम, नवरात्रोसारख्या सणाला आख्खी चाळ लोटायची. प्रसाद म्हणून वाटल्या जाणा-या गोड अप्प्यांवर सर्व जण तुटून पडायचे. राजे कुटुंबीयांकडे श्रावणात पिठोरी अमावस्येला होणारी पूजा एक पर्वणीच असायची. गोपाळकाल्याला दोन चाळींमधील चौकात दहीहंडी बांधली जायची. ती फोडण्यासाठी बालगोपाळांमध्ये चुरस असली तरी कधी कोणाची भांडणं झाली नाहीत. पाऊस पडत असतानाही हंडीसाठी लागलेल्या थरांवर पाणी टाकण्यात वेगळी मज्जा यायची. अशात कित्येकदा थर कोसळत असे. हंडी फोडल्यानंतर पाऊस-थंडीमुळे गारठणा-या मुलांच्या अंगावर भराभर गरम पाणी ओतलं जाई. त्यानंतर दही-पोहे खाताखाता रंगणा-या गप्पांमुळे दिवस कसा सरायचा, हे कळायचंही नाही.
चाळीतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती मंदिरातील गणेशोत्सवाला साजेसा आमचा समोरचा पित्रे बिल्डिंगचा उत्सव असायचा. फडके रोडवरच्या अंगणातील पत्र्याच्या मांडवात हा उत्सव साजरा व्हायचा. १५ ऑगस्टपासूनच सर्वाना त्याचे वेध लागायचे. त्यासाठी वर्गणी काढण्यापासून सजावट, गणपतीची मूर्ती ठरवणं, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कलाकारांना निमंत्रण, स्पर्धा, बक्षिसं यासाठी रात्री बैठकांवर बैठका होत असत. पंडित भीमसेन जोशी, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. राम मराठे, मधुवंती दांडेकर, नकलाकार वि. र. गोडे यांसारख्या मंडळींचे कार्यक्रम-मैफली मध्यरात्रीपर्यंत रंगल्या आहेत. त्याला चाळीतील रहिवाशांबरोबर अन्य नागरिकही गर्दी करत. आरती-नैवेद्याचा मान आलटून-पालटून सर्वानाच मिळत असे. विसर्जनाच्या दिवशी तीन-चार तास ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर चालणारी मिरवणूक हे आणखी एक खास आकर्षण. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण त्यात सहभागी होत असत. विसर्जन झाल्यावर कोणाच्या तरी घरी श्रमपरिहारासाठी कॉफी आणि भेळेचा कार्यक्रम व्हायचा.
नवरात्रात चाळीतील मुली, महिला दररोज भोंडल्याचा फेर धरत असत. त्यानंतर खिरापत ओळखण्यासाठी त्यांची चढाओढ लागत असे. दस-याच्या दिवशी सोनं लुटण्यासाठी मुलांची वरात एका घरातून दुस-या घरात अशी चाळभर निघत असे. दिवाळीत चाळ नटायची ती मोठमोठय़ा रांगोळ्या आणि घरी बनवलेल्या कंदिलांनी. दिवाळीच्या पहिल्या पहाटे फडके रोडवर लोटणा-या डोंबिवलीकरांमध्ये चाळही सहभागी व्हायची. ग्रामदैवत असलेल्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तरुण-तरुणींचे ग्रूप चाळी खालीच रेंगाळायचे. दिवाळीचा पाडवा, भाऊबीज आणि पुढे तुलसी विवाहापर्यंत उत्साही वातावरण असायचं. गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेचा समारोपही इथे होत असल्यामुळे कार्यक्रम पाहण्यासाठी डोंबिवलीकर चाळीच्या पहिल्या-दुस-या मजल्यावर गर्दी करत.
चाळीतील खोल्या १० बाय १२ च्या, इतक्या लहान. पण आमच्या घरात काही कार्य निघालं तर सगळी चाळ म्हणजे एक घर. चाळीतील मधल्या चौकात-घरातही लग्न-मुंजीसारखं कार्य व्हायचं. अंगणातील मांडव ही पाहुणे मंडळींची बसायची जागा. हा मांडव पित्रे बिल्डिंगची एक शोभा होती. मुलांना खेळण्याची जागा तर पावसाळ्यात गुरा-वासरांसाठी निवारा होता. पण फडके रोडच्या रुंदीकरणात हा मांडव इतिहासजमा झाला. सुखं-दु:खं वाटायला माणसं लागतात हे या चाळीत कधी जाणवलंच नाही.
चाळ म्हटलं की, भाडणं आलीच. पण मुलांची भांडणं मुलांनीच आणि मोठय़ांची मोठय़ांनीच सोडवायची, हा इथला एक अलिखित नियमच असल्यामुळे ती तातडीने सोडवलीही जात. मुलंबाळं अंगावर ल्यालेली नांदती ही चाळ होती. पण पुनर्विकासाच्या ओघात दोन चाळींच्या जागेवर आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. शेवटची आमचीच एक चाळ शिल्लक असून, या कुटुंबाच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत.
कालाय तस्मै नम:!
माहिती वाचली आणि पित्रे परिवार बद्दल abhiman vatla