एका विजयामुळे हुरळून जाऊन अमित शहा यांच्यासारखे ‘देश आता काँग्रेेसमुक्त करू’ असे म्हणायला लागले आहेत. राजकीय जीवनात पराभव होतात पण कोणता पक्ष संपवणे इतके सोपे नाही.
काँग्रेसने आसाम आणि केरळ ही राज्ये गमावलेली आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपाला दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही. आता त्यांनी आसाम जिंकले, त्याचे कौतुक जास्तच झाले. त्याचवेळी बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पाँडेचरी या चारही राज्यांत मोदींच्या प्रचारसभा झालेल्या असताना तिथे मोदींना लोकांनी स्वीकारले नाही. भाजपाच्या दिल्लीच्या कार्यालयात आसामच्या विजयाचा जल्लोष झाला. पण या अन्य चार राज्यांत भाजपाचा सपाटून पराभव झाला, त्याची खंत कुठे व्यक्त झालेली नाही. एका विजयामुळे हुरळून जाऊन अमित शहा यांच्यासारखे ‘देश आता काँग्रेेसमुक्त करू’ असे म्हणायला लागले आहेत. राजकीय जीवनात पराभव होतात पण कोणता पक्ष संपवणे इतके सोपे नाही. एक पराभव झाला असेल. इतिहासाची अशी साक्ष आहे, दत्ताजी शिंदे लढत असताना तो पराभूत झाला. तेव्हा पराभव करणा-यांनी विचारले, क्यो दत्ताजी लढेंगे?’ दत्ताजी म्हणाले, ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ पुढच्या अनेक पिढय़ांना त्याच्या एका वाक्याने खूप मोठी शक्ती दिली होती. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ त्याची पुनरावृत्ती १९६७ साली पुन्हा झाली.
९ राज्यांतून काँग्रेस पराभूत झालेली होती. त्यामध्ये तामिळनाडूत (अण्णा दुराई), केरळ नम्बुद्रीपाद, ओरिसा (हरिकृष्ण मेहताब), पश्चिम बंगाल (अजय मुखर्जी), मध्य प्रदेश (गोविंद नारायण सिंग), उत्तर प्रदेश चौधरी चरणसिंह, बिहार कर्पूरी ठाकूर, (पंजाब प्रकाशसिंग बादल), काश्मीर शेख अब्दुला, एवढय़ा राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी ही ‘देशातून काँग्रेस संपली’ असेच त्यावेळची वृत्तपत्रे हेच लिहीत होती. सुदैवाने चॅनेलवाले तेव्हा नव्हते पण अनेक वृत्तपत्रांनी अग्रलेखाचा रतिब घातला. तेव्हा इंदिराजींनी हेच उत्तर दिले होते की, ‘थांबा आणि वाट पाहा’ आणि १९७१च्या निवडणुकीत सगळे चित्र बदलले. १९७७ साली जनता पक्षाचे वादळ आले. त्यात केंद्रातील काँग्रेसची सत्ता प्रथम पराभूत झाली. खुद्द इंदिरा गांधी पराभूत झाल्या, संजय गांधी पराभूत झाले. १९७७ ते १९८० या तीन वर्षात त्यावेळी एकच सूत्र सांगण्यात येत होते की, ‘आता देशातून काँग्रेस संपली’. काँग्रेस हा काही राजकीय पक्ष नाही. हा देशाला एक ठेवण्याचा विचार आहे, सर्व?जाती-धर्माना बरोबर घेऊन जाण्याचा. निवडणुकीतले पराभव हे पुढे-मागे होत असतात. आज ‘अ’चा विजय झाला, तर उद्या ‘ब’चा विजय होणार. पण काँग्रेसने देशाला जो मुख्य विचार दिला, बाबासाहेबांनी संविधान दिले, विविधतेमधील एकता दिली, त्याचा पराभव कधीच होऊ शकणार नाही. १९७७च्या पराभवानंतर तीन वर्षात पहिल्यांदा इंदिरा गांधी पवनारला जायला निघाल्या, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभे राहिले होते. नागपूरच्या पत्रकार परिषदेत त्या उसळून म्हणाल्या की, ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’ आणि १९८० साली काय झाले, त्याचा इतिहास देशासमोर आहे. पुन्हा काँग्रेसच सत्तेवर आली, इंदिराजीच पंतप्रधान झाल्या. मोदींच्या राजवटीला २ वर्षे झाली आहेत. जर मोदी खरंच प्रभावी असते, तर बंगाल, तामिळनाडू, केरळ याठिकाणी मोदींच्या अनेक सभा झाल्यानंतर आणि प्रचंड पैसा भाजपाने ओतल्यानंतर त्या राज्यात मोदींना यश का मिळाले नाही? त्यामुळे एक आसाम जिंकले म्हणून भाजपाने हुरळून जाण्याचे कारण नाही. आसाम गमावले म्हणून काँग्रेसने खचून जाण्याचे कारण नाही. १९५२ ते २०१६ पर्यंत आसाममध्ये जनसंघनंतरचा भाजपा ६४ वर्षे?निवडणुका हरतच होता. केरळमधील काँग्रेसची राजवट पराभूत झाली असली तरी तिथे साम्यवादी पक्ष सत्तेवर आलेला आहे. इथून पुढे वेगवेगळे पक्ष राज्यात सत्तेत येऊ शकतात. भाजपा किती हुरळला तरी आज देशातील बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, तामिळनाडू, आंध्र, केरळ ही मोठी राज्ये भाजपाकडे नाहीत.
महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर, मोदींच्या २०१४च्या लाटेनंतरही महाराष्ट्रात भाजपा विरोधात ६५ टक्के मतं पडलेली आहेत. मध्य प्रदेशमधील भाजपाने बहुमत मिळवले. राजस्थान, गुजरातमधील भाजपाने त्यांच्या पक्षाला बहुमत मिळवून दिले. महाराष्ट्रातल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत छत्रपतींचे नाव वापरल्यावरसुद्धा बहुमत मिळालेले नाही. जे भाजपाचे १२३ उमेदवार विजयी झाले त्यामधले २७ उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपाने आयात केलेले उमेदवार आहेत. ते वजा केले तर, भाजपाचे शुद्ध शाकाहारी ९६ आमदार आहेत. पुरोगामी महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने एक गोष्ट समजून घ्यावी, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी तोडली आणि स्वसामर्थ्यांवर जिंकण्याच्या फुशारका मारल्या आणि दोन्ही पक्षांच्या हाती धुपाटणं आलं. कोणाला आवडो न आवडो, पटो न पटो, महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकहाती बहुमत मिळवून देऊ शकत नाही आणि राष्ट्रवादीलाही एकटय़ाच्या भरवशावर बहुमत मिळवणं केवळ?अशक्य आहे. भाजपा बहुमत मिळवू शकला नाही हे तर सिद्धच झालं. सेनेची तीच अवस्था आहे. इथे प्रादेशिक भावनेवर महाराष्ट्रात सेनेला बहुमत मिळणे कधीही शक्य नाही. मुंबई-ठाण्याची गोष्ट वेगळी आहे. इथे सेनेच्या विजयाची कारणं वेगळी आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांचा काळ?वेगळा होता. १९६७च्या निवडणुकीत ९ राज्यांत काँग्रेस पराभूत झाली असताना वसंतदादा अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने २०२ जागा जिंकल्या होत्या आणि १९७१ साली २२२. महाराष्ट्र काँग्रेसचा तो सुवर्णकाळ होता. आता ती स्थिती राहिलेली नाही हे मान्य करा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा केला. तरीही शरद पवार यांना ५०-५५च्या आमदारांच्या पुढे महाराष्ट्रात विजय मिळवता आला नाही आणि काँग्रेसशी केलेली आघाडी तोडल्यानंतर ते ४० आमदारांवरच थांबलेले आहेत. विरोधी पक्षनेतेपदही त्यांना मिळू शकले नाही त्यांच्या पक्षात महाराष्ट्राचे सरकार आघाडी तोडल्यामुळे गेले, त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापले अहंकार बाजूला ठेवावेत. महाराष्ट्रातचा मुख्य शत्रू? कोण? हे समजून घ्यावे. हातात हात घालून उद्याची विधानसभा, उद्याची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन लढवली तर, भाजपाचा पराभव अजिबात अशक्य नाही. आसाममध्ये भाजपाला का विजय मिळाला याचे कारण आजारी तरुण गोगई?यांना सलग १५ वर्षे?मुख्यमंत्री ठेवले हे आहे. महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०१ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने ८८ जिंकल्या ही बेरीज १८९ आहे. सेनेला ६६ आणि भाजपाला ३३ म्हणजे सेना-भाजपावाले एक झाले तरी ग्रामीण भागात ते ९०-९५च्या आसपास आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादी १९०च्या आसपास आहे. हा १००चा फरक विधानसभा निवडणुकीतही निश्चितपणे दाखवता येईल. फक्त दोघांनी आपले अहंकार बाजूला ठेवले पाहिजेत. एकदा आघाडी झाली की, आघाडीचा राजधर्म इमानदारीने पाळला पाहिजे. काँग्रेस पक्षामध्येसुद्धा ‘तू का मी’ चालत असते. वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक सर्व?काँग्रेसवाल्यांनी जिद्दीने लढवली असती तर तिथेही पराभव झाला नसता, कारण २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला १० हजार मते होती. त्या १० हजारांवरून नारायण राणे ३२ हजारांवर पोहोचले, पण त्यांच्या पराभवानंतर एकमेकाला टाळी देणारे काँग्रेसवाले महाराष्ट्रात काँग्रेस कशी मोठी करू शकतील? तेव्हा घरातले मतभेद, बाहेरचे मतभेद या मतभेदातून भाजपाने संधी साधलेली आहे. काँग्रेसला बदनाम करण्याची मोहीम वाहिन्यांनी चालवली. आज त्याच वाहिन्या गप्प आहेत. महाराष्ट्रात चार मंत्री दीड वर्षात उघडे पडले. १९९५च्या युतीच्या सरकारच्या काळात ४ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यात शशिकांत सुतार, महादेव शिवणकर, शोभाताई फडणीस, बबनराव घोलप हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे गेले आणि आताही तावडे, मुंडे, खडसे यांचे जे काही चालले आहे, त्याची चर्चा?होत नाही. भाजपातर्फे झालेला भ्रष्टाचार शुद्ध आहे, सोवळा आहे, असे मानले जाते का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी त्याविरोधात हल्लाबोल केला पाहिजे. दुष्काळाचे केवढे मोठे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, या सगळय़ा प्रश्नांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊनच आता महाराष्ट्रात ‘हल्लाबोल’ची भूमिका घेतली तर, भाजपाचा पराभव महाराष्ट्रच करू शकतो आणि जे महाराष्ट्रात घडते तेच देशात घडते, म्हणून इथून पुढे भाजपाच्या हातात, संघाच्या हातात देश द्यायचा नसेल तर, काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावे. शरद पवार यांनी औरंगाबादच्या दुष्काळी परिषदेत आक्रमक भाषण केले, पण व्यवहारातही तीच भूमिका कायम ठेवून त्यांनी पुढाकार घ्यावा. त्याचवेळी त्यांचा खरा शत्रू भाजपा की काँग्रेस हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हे करणे गरजेचे नाही तर हा देश, देशाचे संविधान, सर्व?जातीधर्माचा सलोखा आणि विविधतेतील एकता जपण्यासाठी भाजपाचा पराभव करणे आवश्यक आहे.
काय आहे हे आव्हान?
म्हणून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण ज्या नारायण राणे यांच्याशिवाय काँग्रेसची कोणतीच सभा यशस्वी होत नाही, हे महाराष्ट्र पाहतो आहे. ते श्री. नारायण राणे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जोगेंद्र कवाडे, बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे दौरे एकत्र करावेत. हे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र दिसले पाहिजेत. इथून पुढे महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे लढली पाहिजे. मग ती नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा, लोकसभा असो, त्यासाठी सोपे सूत्र ठेवले पाहिजे, ते सूत्र असे की,
एक सोपे सूत्र
१) ‘जिथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे ती जागा काँग्रेसला.
२) जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे ती जागा राष्ट्रवादीला.
३) जिथे काँग्रेस पराभूत झाली आहे पण क्रमांक दोनची मते काँग्रेसला आहेत, तो मतदारसंघ काँग्रेसला.
४) जिथे क्रमांक दोनची मते राष्ट्रवादीला आहेत, तो मतदारसंघ राष्ट्रवादीला.
५) जिथे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तीन किंवा चार नंबरला आहे, त्या मतदारसंघाचा निर्णय जिल्हा परिषदांमधील त्या त्या पक्षाची मते बघून त्याप्रमाणे.
६) याशिवाय काही मतदारसंघात चर्चा करण्याची गरज असेल तर शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे काँग्रेसतर्फे नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अशा चार-पाच जणांच्या समितीने निर्णय करावा.
महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आता पुढचे दौरे शक्यतो एकत्र करावेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात त्यावेळचे समाजवादी, प्रजासमाजवादी, त्यावेळचे कम्युनिष्ट अगदी हिंदू महासभासुद्धा, एका ध्येयासाठी एकत्र आले होते की नव्हते? काय होते ते ध्येय? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवणे. या एकमेव ध्येयासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. आता एकमेव ध्येय समोर ठेवा, या देशातून आणि या महाराष्ट्रातून भाजपाला पराभूत करायचे आहे. संविधान तोडू पाहणारा, देशातील शत्रू नंबर एक हा भाजपाच आहे. इतक्या प्रखर विरोधाने महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकदा मैदानात उतरले तर या महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करणे अजिबात अवघड नाही. २०१४च्या प्रचंड लाटेनंतरही अवघी ३१ टक्के मते मिळवून मोदी राज्यावर बसले आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत लोक मोदींबरोबर असतीलच, असे समजण्याचे कारण नाही. औरंगाबादला दुष्काळ परिषदेत आक्रमक भाषण करणा-या शरद पवार यांनी आता पुढाकार घ्यावा. नारायण राणे यांची तोफ आज तुमच्याजवळ आहे. लातूरच्या दौ-यात नारायण राणे यांच्या भाषणाने काय वातावरण तयार झाले हे तिथल्या लोकांनाच विचारा.. आता भाजपाच्या पराभवासाठी आक्रमक आणि सांघिक नेतृत्वाची गरज आहे. तसे झाले नाही तर भाजपा यांना सत्तेतून बाजूला करण्याची एक मोठी संधी आपल्या हाताने आपण गमावू. महाराष्ट्राने याचे नेतृत्व करावे. महाराष्ट्रच देशात भाजपाला पराभूत करू शकतो आणि महाराष्ट्राचा निर्णय देश स्वीकारतो.
हे कोण बोलले बोला…
पत्रकार अरुण शैरी यांची एका वाहिनीवरील मुलाखत देशाने ऐकली. अरुण शौरी अगोदर पत्रकार आहेत, नंतर भाजपावाले आहेत. श्री. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात अरुण शौरी यांना मोठय़ा प्रेमाने घेतले होते. भाजपामध्ये वाजपेयी असे व्यक्तिमत्त्व होते की, पक्षाच्या सगळय़ा सीमा ओलांडून ते त्या पलीकडचे नेते होते. त्यांच्या मनाची व्यापकता होती. आज जे मोदी पंतप्रधान आहेत, त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना वाजपेयींनीच राजधर्माची आठवण करून दिली. अरुण शौरी यांच्या मुलाखतीत त्यांनी मोदी आणि वाजपेयी यांची तुलना केली नाही. तुलना करणे योग्य नाही. कुठे वाजपेयी आणि कुठे मोदी. आता अमित शहा हे मोदींची तुलना लालबहाद्दूर शास्त्री यांच्याशी करतात तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोदींची तुलना महात्मा गांधींशी करतात! मोदी सत्तेवरून खाली उतरले की, त्यांची स्थिती जी काही होईल त्यावेळी हे लोक काय बोलतात हे बघावे लागेल. अरुण शौरी यांनी मुलाखतीत वाजपेयींचे मोठेपण सांगितले आणि मोदींचे छोटेपणही अतिशय स्पष्ट शब्दांत मांडले. मोदी आणि भाजपा यांची सालटी काढण्याचे काम अरुण शौरी यांनी केले. ‘मोदींना या देशाशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या खेरीज काहीही पडलेले नाही. स्वत:ची प्रतिमा आणि स्वत:च्या मोठेपणासाठी मोदी सगळा देश वापरीत आहेत. सरकार वापरीत आहेत.’ इतक्या स्पष्ट शब्दांत अरुण शौरी यांनी मोदींचा पंचनामा दिवसाढवळय़ा केला.
प्रख्यात वकील राम जेठमलानी १५ मे रोजी रविवारी उल्हासनगरमध्ये होते. तिथे त्यांचे भाषण झाले. तेही कट्टर भाजपावाले. भाजपातर्फे राज्यसभेत त्यांना निवडून दिले गेलेले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे कट्टर प्रचारक म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली. ‘मोदी पंतप्रधान व्हायलाच हवेत. कारण देशातील ९० लाख कोटी रुपयांचे काळे धन जे परदेशात लपवून ठेवले आहे, मोदी ते भारतात आणणार आहेत.’ अशी त्यांची भाषणे होती. उल्हासनगरच्या सभेत बोलताना राम जेठमलानी यांनी जाहीरपणे देशाची माफी मागितली. त्यांचे शब्द असे होते की, ‘मी, रामजेठमलानी देशाची माफी मागून सांगतो आहे की, मला माफ करा. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा प्रचारक म्हणून काम करत होतो, ही माझी मोठी चूक होती. ९० लाख कोटी रुपयांचे काळे धन मोदी भारतात आणतील, असा माझा विश्वास होता, पण मोदींनीच देशाची फसवणूक केली आहे. एवढेच नव्हे तर मोदी पंतप्रधान झाले तर जगात या देशाची प्रतिष्ठा वाढेल, अशी आमची सगळय़ांची भावना होती. पण आता पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे. आणि मला हे सांगायला लाज वाटते आहे की, मोदींनी देशाची फसवणूक केलेली आहे.’
१५ मे रोजी औरंगाबाद येथे दुष्काळी परिषद होती. ही परिषद राष्ट्रवादीचे अध्यक्ष, देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पक्षाने आयोजित केली होती. या परिषदेचे उद्घाटन शरद पवार यांनी केले. गेल्या कित्येक दिवसांत इतक्या आक्रमकपणे ते बोलले नव्हते. त्या परिषदेत त्यांनी मोदींच्या ‘अच्छे दिन’ या घोषणेची धोबीघाटावरील धुलाई?केली. ‘अच्छे दिन’ राहू द्या.. लोक असे म्हणतात, ‘मागच्या सरकारचे दिवस आले तरी आम्हाला चालतील’. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही त्यांनी हल्ला केला. ‘शेतक-यांच्या कर्जाची पुनर्रचना करू, अशी थाप मारणा-या मुख्यमंत्र्यांनी, ना कर्जाची पुनर्रचना केली, ना शेतक-याला कोणती मदत दिली. ना केंद्र सरकारकडून दुष्काळाचा निधी आणला. ना निधीचे वाटप केले. आज देशात अन्नधान्याच्या बाबतीत जो स्वावलंबी आहे, त्याचे सगळे श्रेय मागच्या सरकारचे आहे. या सरकारने भीषण दुष्काळात पाणी वाटपाची जबाबदारी स्वीकारली नाही. पशुधन वाचवण्याकरिता चारा छावण्या काढल्या नाहीत आणि शेतक-यांची फसवणूक केलेली आहे.’
अरुण शौरी आणि राम जेठमलानी हे तसे कट्टर भाजपावाले नाहीत. काँग्रेस विरोध म्हणून त्यांनी भाजपा स्वीकारला. पण मोदींविरुद्ध बोलण्याची हिम्मत त्यांनी दाखवली. आज सत्य लिहिणा-यांची संख्या जशी अत्यंत कमी आहे, त्याचप्रमाणे स्पष्ट बोलणा-यांची संख्या त्याहून कमी आहे.
‘सत्य’ला लोक घाबरतात. त्याची कारणे दोन. सत्ताधीशांकडून फायदा मिळवायचा किंवा चुकीची कामे केली असतील तर सत्ताधीश आपला काटा काढतील ही भीती. ज्यांना सत्ताधीशांकडून काहीही मागायचे नाही आणि ज्यांच्या पायाखालची सतरंजी स्वत:ची आहे, अशा लोकांना कोणाचीही, कधीही भीती वाटण्याचे कारण नाही. शौरी, जेठमलानी आणि शरद पवार यांचे हे सरकार काय वाकडे करू शकणार आहे? आता वेळ अशी आली आहे की, कोणाचे काहीही वाकडे करो, या सरकारविरोधात जनमत अतिशय प्रखरपणे करण्याची गरज आहे. कारण जेवढे दिवस हे सरकार अधिकारावर राहील, तेवढे दिवस या देशात एक ‘अहिंसक अराजक’ आपोआप निर्माण होत आहे. ते दिसत नाही. पण सगळा समाज अस्वस्थ आहे. सगळा धर्म अस्वस्थ आहे. परस्पर विश्वास संपलेला आहे आणि हा देश आणि हे सरकार संघाच्या हातात दिलेले आहे. हा सगळय़ात मोठा धोका आहे. साध्वी प्रज्ञा सिंग किंवा कर्नल पुरोहित यांच्यावरील गंभीर आरोप रातोरात बदलले जातात. कन्हैयाला राष्ट्रदोही ठरवले जाते. जे जे संघाचे आहेत, हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत त्यांना त्यांना संरक्षण आहे आणि जे विरोध करणारे आहेत, सर्व जाती-धर्र्माना या देशात समान हक्क आहे, असे माननारे आहेत त्यांना त्यांना ‘राष्ट्रदोही’ ठरवण्याचा कार्यक्रम आता उघडपणे राबवायला सुरुवात झाली आहे. मग ते सनातन असतील, मनातन असतील, हे सगळे रेशीमबागेत एक होणारे आहेत. आणि इथून पुढे देश रेशीमबाग चालवणार आहे. अशा वेळी शौरी, जेठमलानी, शरद पवार यांनी स्पष्टपणे बोलणे हे शुभचिन्ह मानले पाहिजे. भाजपामधील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह ही सर्व मंडळी मोदींच्या कारभारावर, त्यांच्या स्वयंकेंद्रित प्रशासनावर आणि पक्षाला दुय्यम लेखून मोदी महात्म्याची तारीफ करणा-या मोदी आणि अमित शहा या जोडीवर कमालीची नाराज आहेत. पण उघडपणे बोलण्याची हिम्मत नाही. ही हिम्मत ज्या दिवशी होईल, त्या दिवशी एक बंड उभे राहील. मोदींची तुलना शास्त्री आणि गांधीजींशी होऊ लागली, याचे कारण भाजपामध्ये चमचेगिरी सुरू आहे. अमित शहा ‘फरार’ आहेत. देशासाठी, राज्यासाठी, सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी यांनी काय केले? यांच्या नावावर काय आहे? एका दिवसांत बांडगुळासारखे वर येऊन वाजपेयी आणि अडवाणींच्या पक्षावर कब्जा केला. आणि ‘व्यापम’ घोटाळय़ात ५० लोकांचा बळी गेल्यावर राजीनामा न देणा-या शिवराजसिंह चौहान यांना मोदींमध्ये महात्मा गांधी दिसू लागले आहेत. आता मोदींना साबरमतीच्या आश्रमातच पाठवा. लाचारीला काही सीमा राहिलेली नाही. म्हणून अशावेळी देशासमोर एक फार मोठे आव्हान उभे आहे.
आता उलटी मोजणी चालू
शुभेच्चा