परस्परांविषयी आदरभाव आणि व्यक्तिगत स्पेस या दोन्ही एकच गोष्टी आहेत, हे मान्य करणे किती जणांना जमते आहे? हे सर्व मान्य केले तर आयुष्य सुकर होईल. पण कशाचाही अतिरेक झाला तर ती असते कायम सुरू असलेली एकटेपणाकडे वाटचाल. हे मनात कायम असणे खूप आवश्यक आहे. मैत्रीकडे सोय वा गरज म्हणूनच बघायचे का? त्याशिवाय त्याच्याकडे एक मूल्य म्हणून बघायला मला आवडते. श्रीकृष्ण आणि सुदाम्याचे उदाहरण देऊन सतत संस्कृतीचे दाखले वा उदात्तीकरण नको. केवळ वस्तुस्थितीचे भान खूप झाले.
माझ्या आजूबाजूला मंडळी गप्पा मारत बसली आहेत. काही जण धावत आहेत, काही लगबगीने चालत आहेत. चालता चालता आपल्या मित्र-मैत्रिणींशी बोलायला म्हणून थांबत आहेत. आवाज एकमेकांत मिसळले आहेत. मला बोलणे पुरेसे नीट ऐकू येत नसले तर ओठांच्या हालचालीवरून तर्क करता येतो, नजरेतले भाव ओळखता येतात. तास-दीड तास हे असेच शांतपणे मी बघते आहे. सगळे आत सामावून घेते आहे. या तासात एकही परिचित व्यक्ती भेटली नाही. माझा मोबाइल दर पंधरा मिनिटांनी वाजतो आहे. मला कुणी ओळखत आहे, कुणाला माझ्याशी संपर्क करावासा वाटतो आहे, याची जाणीव हा मोबाइल करून देतो.
या शहरात माझे नातेवाईक आहेत, स्नेही आहेत. पण ही अशी वेळ आहे की सर्व जण अजून कार्यालयात आहेत, कामांमध्ये व्यग्र आहेत. मी हा अमेरिकन कट्टा लिहिते आहे शिवाजी पार्कवरून!या भारतभेटीची सुरुवात अतिशय वेगळी झाली. मध्यरात्री बाहेर पडल्यावर नेहमी एअरपोर्टवरून थेट पुणे वा मुंबईत जाण्यापेक्षा मी एअरपोर्टवरच थांबण्याचा निर्णय घेतला. एकदा कस्टम्समधून बाहेर पडले की, प्रवाशांना कुठे बसायला वा विश्रांतीसाठी जागा आहे का? मला तरी दिसली नव्हती. नातेवाइकांची झोपमोड नको, म्हणून आणखी दोन-तीन जणही माझ्यासारखे थांबले होते, हे नंतर समजले.
टॅक्सी सव्र्हिसेस, परदेशी चलन विक्रेते (करन्सी एक्स्चेंज), ट्रॅव्हल्स आणि टूर्स, देशांतर्गत विमानसेवा अशा सर्व दुकानांमध्ये असलेला स्टाफ तरुण आहे असे दिसत होते. लोकांच्या संतापाला वा इतर मूड स्विंग्सना सामोरे जाण्याचे काम करायचे तेही रात्री-झोप टाळून. हॉस्पिटल, टॅक्सी, हॉटेल्स, कॉल सेंटर इत्यादी सेवादाते आणि त्यांचे कर्मचारीही याच गटात. यामध्येच आपली एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीसुद्धा आहे. काम करताना आणि एरव्ही त्यांच्याकडून अपेक्षित असलेले मानसिक संतुलन कायम ठेवणे वा संयमाने एखादी गोष्ट करणे मला जमेल अशी आहे असे वाटत नाही. या सर्व मंडळींना काम संपवून घरी आले की तरी यांना विश्रांती मिळते का, हा वेगळा मुद्दा.
एअरपोर्टवर उतरताच वेगवेगळे आवाज लक्ष वेधतात.
अमेरिकेत अगदी हाय-वेजवळ घर असेल, तर वाहनांचा आवाज असतो. इथे घरात टीव्ही, लाऊडस्पीकर्स, घरातली उपकरणे, बोलणे, दारावरची बेल असा आवाज एखाद्याला नको असला तरी भरभरून ऐकू येत असतो, अशा माणसांची आणि घरांची संख्या जास्त आहे. वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले सगळ्यांना त्रास होईल असा असतो हा आवाज. मी अमेरिकेत जिथे राहते, तिथे रोज असा आवाज जवळजवळ नसतोच. बाहेरचे लॉन कापायला येणारी माणसे एकच दिवस ठरवून सगळ्या सोसायटीचे काम करतात. तोच एक दिवस आवाजाचा.
विकेंडची एखादी रात्र पार्टी असेल तर गोंगाटाची. मोठी घरे आहेत त्यामुळे टीव्ही, वा इतर उपकरणांचे आवाज तसे नियंत्रित आहेत असे जाणवते. ते वगळताही हळूहळू माणसे भोवती असून एकटे होत चाललेल्या व्यक्तीला आवाजाची सोबत असते, हे सत्य नाकारता येत नाही. भारतातही घराघरातून असलेली वृद्ध माणसे आवाजाच्या सोबतीने राहतात. बदलणारे, हलते चित्र बघत दिवस घालवतात. म्हणून हा आवाज फक्त नियंत्रित करता येईल, पण काढून टाकता येणार नाही. प्रत्यक्ष माणसाची सोबत मिळणे, मिळवणे हा मुद्दा गुंतागुंतीचा होतो आहे.
अशा सर्व परिस्थितीत मला आपुलकीने बोलावणारी, मला वेळ देणारी नातेवाइकांव्यतिरिक्त काही घरे मुंबईत आहेत, हे माझे सुदैव आहे. ही आपुलकी परस्पर हितसंबंधांवर नाही म्हणूनच सच्ची आहे. आज व्यवहार म्हणून मिळणारी आपुलकीसुद्धा नाकारू नये अशी परिस्थिती आहे. इथे आले की, मुंबईमधल्या जीवनाचा वेग न्यूयॉर्क आणि डीसीची आठवण करतो. तिथे असले की, आवर्जून मुंबई आठवते. पण या दोन कप्प्यांची सरमिसळ न होऊ देता पुढे जाते. आजची पिढी असे अनेक कप्पे करते आणि राहते. त्रासदायक गोष्टींचा सामना करायचा की त्यांना कप्प्यात टाकायचे? असे लोकांचे, संस्कृतीचे, कप्पे सांभाळत सगळी रेस्टॉरेंट्स भरून आखीवरेखीव दिसत आहेत. परप्रांतीय खाद्यपदार्थ आपल्या आवडीनुसार बदलून एकाच टेबलावर तीन पिढय़ा बसले आहेत. कला, संगीत, साहित्य या प्रांतातही कमी-जास्त प्रमाणात हेच आढळते.
तीन पिढयांना वेगळे करणारी एक अदृश्य रेघ तुम्हाला माहीत आहेच. काही विशिष्ट वर्गात खाजगी स्पेस मान्य करणारी आणखी एक रेघ आहे. ही स्पेस देताना, मान्य करताना होणारी ओढाताण सहन होते का तुम्हाला? माझ्या मुलाचा सहा-सात वर्षाचा मित्र जेव्हा घरी येतो, तेव्हा तो माझ्या मुलाशी खेळायला आलेला असतो. त्याने माझ्याशी बोलावे, ही अपेक्षा मी ठेवायची नसते ही आहे त्याची स्पेस! याला अपवाद आहेत पण ते अपवादच.
अनेकदा मैत्री आणि परिचय झाला की आपण वापरतो ती संबोधने किती गमतीची होतात. ग्लोबलायजेशनमध्ये, वयाची अट मनात न ठेवता मैत्री होते, तेव्हा आता भारतातही अशा संबोधनाच्या गमती होतील असे मला वाटते. दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या आईच्या वयाच्या माझ्या मैत्रिणी माझ्या आईला काकू म्हणायच्या. अमेरिकेत वाढलेला माझ्याच वयाचा एक मुलगा केवळ मी त्याच्या आईवडिलांकडे आले आहे, म्हणून मला आंटी म्हणाला होता हे मी विसरले नाही. कालांतराने त्याची-माझी ओळख वाढली. त्याचे पालक आणि तो अशी समांतर मैत्री मला हाताळणे अवघड वाटले होते. हे असे अनुभव अधिकाधिक प्रमाणात तिथे येत गेले.
आता सोशलायजेशन वाढले आहे, फेसबुक इत्यादी नेटवर्कने समांतर मैत्री हा भाग अविभाज्य झाला आहे. पूर्वी असे संबंध फक्त व्यावसायिक स्वरूपाचे असत. त्यात मोठय़ांना मान देणे हे गृहित असे. कधी त्याचा धाकही असे. पण आता अशा मैत्रीला भावनिक आणि इतर संबंधाची जोड आपल्याकडेही मिळू लागली आहे. त्यात आखलेली खासगी स्पेसची रेघ ओरखडे उमटवणारी वाटू शकते. त्याकरता आपली मानसिक तयारी व्हायला वेळ लागेल. एकेरी संबोधनाची अपेक्षा करणारा वर्गच त्याला मानही द्यावा, अशी अपेक्षासुद्धा ठेवतो. असा मान द्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? न पटणा-या गोष्टी मान्य करायच्या? स्वीकारायच्या? म्हणणे मांडायचे? वाद तरी घालायचा की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
परस्परांविषयी आदरभाव आणि व्यक्तिगत स्पेस या दोन्ही एकच गोष्टी आहेत, हे मान्य करणे किती जणांना जमते आहे, हे सर्व मान्य केले तर आयुष्य सुकर होईल. पण कशाचाही अतिरेक झाला तर ती असते कायम सुरू असलेली एकटेपणाकडे वाटचाल. हे मनात कायम असणे खूप आवश्यक आहे. मैत्रीकडे सोय वा गरज म्हणूनच बघायचे का? त्याशिवाय त्याच्याकडे एक मूल्य म्हणून बघायला मला आवडते. श्रीकृष्ण आणि सुदाम्याचे उदाहरण देऊन सतत संस्कृतीचे दाखले वा उदात्तीकरण नको. केवळ वस्तुस्थितीचे भान खूप झाले.
हे भान म्हणजे नेहमी ‘अरे ला कारे’ म्हणायचे नाही. चूक समोरच्याची असली तरी एखाद्या वेळी स्वत: आधी सॉरी म्हणायचे. करून पाहा कधीतरी. करावेसे वाटत नाही कारण नवा मित्र सहज मिळतो. खरे आहे. या माणसांच्या महासागरात, नवा माणूस मिळेल. मिळतो. म्हणून मैत्रीचा दिखावा आणि ऐट करता येते. जिथे आणि जेव्हा हे शक्य नाही हे कळते तिथे मग विचार सुरू होतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकानंतर अमेरिकेत आता उलटे चक्र सुरू होते आहे.
पण त्या अंतिम मुक्कामाचे अंधानुकरण करणारे आपले चक्र आपणच रोखू शकतो. किमान त्याचा वेग कमी करू शकतो. यंत्र तर खरे फक्त एक साधन आहे. ते साध्य नाही. यंत्राचा आवाज हा मानवी आवाजाला पर्याय होऊ शकतो, पण ती तडजोड आहे. त्या तडजोडीपेक्षा माणसाबरोबर करा तडजोड. म्हणजे या कोलाहलात येणारे आवाज कर्कश्श नाही, एकटेही वाटणार नाहीत. मला आपुलकीचा आवाज ऐकू येतो याचे श्रेय माझ्या मित्रमंडळींचे. इथे आणि अमेरिकेतही. हा अमेरिकन कट्टा मैत्रीला अर्पण करायला ‘फ्रेंड्स डे’ असावा असा नियम नाही.
anand zala. anand ha nibban bhaw ahe.
anand zala . anand hone, to aubhawane,tyachi anubhuti gheta ani deta yene ha nrwan bhaw ahe. ase adhunik vidnyan sangate.