गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ‘गोध्रा’ जळीतकांडानंतर झालेल्या भीषण दंगलींमुळे वादग्रस्त ठरले होतेच. त्यांच्याविरुद्ध उठलेले हे वादळ काही दिवसांनी शमेल असे मोदी यांचे समर्थक व हितचिंतक यांना वाटत होते. पण…
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ‘गोध्रा’ जळीतकांडानंतर झालेल्या भीषण दंगलींमुळे वादग्रस्त ठरले होतेच. त्यांच्याविरुद्ध उठलेले हे वादळ काही दिवसांनी शमेल असे मोदी यांचे समर्थक व हितचिंतक यांना वाटत होते. पण इशरत जहाँ चकमकप्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने केलेल्या तपासात इशरत हत्याप्रकरणी गुजरातच्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामुळे हे वादळ अजूनही शमलेले नाही. उलट ते बनावट चकमक प्रकरणाशी संबंधित काही जणांना भुईसपाट करणार आहे, हेच सिद्ध होत आहे. गुजरातमध्ये झालेली जातीय दंगल ही मोदी सरकारच्या चिथावणीमुळे पेटली होती आणि पसरली होती. ही दंगल पसरण्यात मोदी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांचा हात होता, असे सर्रास आरोप होत होते. या दंगलीने गुजरात आणि नरेंद्र मोदी यांची जगभर बदनामी झाली. या दंगलीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असणा-या मोदी मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि पोलीस अधिकारी यांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. या दंगलींमुळे मोदींविरुद्ध काहूर उठले असून गुजरातमधील या दंगलींचे पडसाद केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. मुख्यमंत्री मोदी यांच्या मानवताविरोधी कृत्यांमुळे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही वादग्रस्त ठरले. हे दंगल प्रकरण मोदी व त्यांना सहकार्य करणा-या अधिका-यांची पाठ सोडायला तयार नाही. या दंगल प्रकरणानंतरचा पुढील टप्पा म्हणजे इशरत जहाँ हे आणखी एक रक्तरंजित प्रकरण. बनावट चकमकीचे हे प्रकरण नऊ वर्षापूर्वी म्हणजे २००४मध्ये घडले. इशरत ही दहशतवादी नव्हती, तिचा दहशतवाद्यांशी कुठलाही संबंध नव्हता, असे वारंवार इशरतची आई व नातेवाईक सांगत होते. या चकमकीची चौकशी करण्यात यावी व दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी इशरतच्या आईने व अनेक संघटनांनी केली. पोलिसांचे म्हणणे मात्र असेच होते की, इशरत ही दहशतवादी होती, तिचे दहशतवाद्यांशी संबंध होते व ती पोलिसांशी झालेल्या चकमकीतच मारली गेली. गुजरात सरकारनेही असाच दावा होता. या दाव्याप्रतिदाव्यामुळे वादळ उठले व आरोप-प्रत्यारोपांचीराळ उठली. अखेर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. सीबीआयने चौकशी करून विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, इशरत जहाँला ज्या चकमकीत ठार करण्यात आले ती चकमक बनावटच होती. तसेच इशरत ही दहशतवादी नव्हती किंवा तिचे कुठल्याही दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे आढळून आले नाहीत. या बनावट चकमकीसंबंधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात गुजरातचे तत्कालीन पोलीस महासंचालक डी. जी. वंजारा यांच्यासह सात आयपीएस अधिका-यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तत्कालीन कमांडो अनाजू चौधरी यांचेही नाव आरोपी म्हणून आहे. या सर्वाविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे सीबीआयने म्हटले असून त्यांच्यावर खून, अपहरण व पुरावे नष्ट करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे सीबीआयच्या या आरोपपत्रात, ही बनावट चकमक गुजरात पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांनी संगनमताने घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इशरत व तिच्या तीन साथीदारांचे अहमदाबाद गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक यांनी अपहरण करून हत्या केली, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रात आयबीचे संचालक राजेंद्र कुमार यांच्यासह अन्य काही जणांची चौकशी करण्यात येत आहे, असेही म्हटले आहे. याचा अर्थ हे प्रकरण व्यापक असून आणखीही काही जणांवर आरोप ठेवले जाण्याची शक्यता आहे. या आरोपपत्रात कोणत्याही राजकीय व्यक्तीवर आरोप ठेवण्यात आलेले नाहीत, ही हे खरे. परंतु मोदी सरकारच्या काळात घडलेले हे प्रकरण असून दंगलींच्या सर्वच प्रकरणांना मोदी सरकारला जबाबदार धरण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेतेही गुजरातच्या भीषण दंगलींनी धास्तावले होते. मात्र, तरीही त्यांचा रा. स्व. संघप्रणित हिंदुत्ववादी राजकारण भाजपमध्ये रेटण्याचा प्रयत्न सुरूच आहे. मोदींमार्फत संघ भाजपवरील आपले वर्चस्व व प्रभाव अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भाजपमधील मध्यममार्गीय, समन्वयवादी आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण असणा-या गटाची पंचाईत झाली आहे. भाजपमधील अनेक नेत्यांना राजकारणात समन्वयवादी आणि व्यवहारवादी भूमिका हवी आहे. अशी भूमिका घेतल्याशिवाय आपण आता सत्तेपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे वास्तव या नेत्यांना उमगले आहे. सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन व सर्वाना हितकारक असे राजकारण करूनच सत्तेचा मार्ग सुकर आणि सुखकारकही होईल हे या नेत्यांना कळून चुकले आहे. पण नरेंद्र मोदी पूर्णपणे संघाच्या कोषातून तयार झालेले आहेत. त्यांना संघाच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रभावच पक्षावर अधिकाधिक टाकायचा आहे. गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदी यांची नियुक्ती भाजपने निवडणूक प्रचारप्रमुख केल्यामुळे २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील ते भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले. त्यामुळेच नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. आज परिस्थिती अशी आहे की, भाजपपुढे अधिकाधिक अडचणी उभ्या राहत आहेत. अडवाणींसह भाजपमधील काही ज्येष्ठ नेते मोदी यांच्या वर्चस्वामुळे नाराज आहेत. म्हणजे मोदी यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत नाराजी आहे. मोदी यांची फुटपाडे, विभाजनवादी अशी संभावना सर्वत्र होत आहेच. याचाही भाजप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होत आहे. आता यात भर म्हणून की काय, इशरत जहाँ चकमकप्रकरणी मोदी सरकारमधील वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर खटला भरण्यात आला आहे. मात्र, चकमकीमागील सूत्रधार असलेल्या गुजरातच्या सत्ताधा-यांकडे अप्रत्यक्षपणे अंगुलीनिर्देश होत आहे. इशरत जहाँ प्रकरण बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या कार्यपद्धतीबद्दल, कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात संशयाची भावना निर्माण झाली आहे. अशा प्रकारे कावेबाज आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणारी व्यक्ती सामान्यांचे आणि देशाचे नेतृत्व करण्यास योग्य नाही. गुजरातच्या दंगलींनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी दंगलग्रस्त भागांना भेट दिली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करा, असा सल्ला दिला होता. मात्र, मोदी राजकारणात अधिक सक्रीय, अधिक आक्रमक होत चालले आहेत आणि त्यांचा प्रवास राजधर्माच्या अगदी विरुद्ध, लोकशाहीच्या अगदी विरुद्ध सुरू आहे. इशरत जहाँच्या प्रकरणानिमित्ताने मोदी यांची लोकशाहीविरोधी भूमिकाच समोर आली आहे.
[EPSB]
अन्न सुरक्षेच्या दिशेने
जगातील सर्वाधिक कुपोषित बालके भारतात आढळून येतात. जगातील सर्वाधिक भूकबळीही भारतातच नोंदवले जातात. प्रगतीशील म्हणवणा-या कल्याणकारी देशासाठी हे नक्कीच भूषणास्पद नव्हते. हे चित्र बदलण्याची इच्छाशक्ती काँग्रेस आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दाखवली आणि त्यातूनच अन्न सुरक्षा विधेयक प्रत्यक्षात उतरले.
[/EPSB]
CBI म्हणजे कोण हे संपूर्ण भारताला माहित आहे. कॉंग्रेसच्या लोकांना ते त्रास देत नाही. कॉंग्रेसला ज्याने त्रास दिला त्याले CBI त्रास देते. आपण सुद्धा मोदींची धास्ती घेतलेली दिसते.