मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत:हा विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. शनिवारी सायनच्या सोमय्या मैदानावर झालेल्या जाहीरसभेमध्ये राज ठाकरे यांनी ही घोषणा केली.
मुंबई – लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभवानंतर प्रथमच जाहीर सभा घेत आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
‘उद्या जर महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला तर त्यांचे नेतृत्वही राज ठाकरे करेल,’ असे सांगत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावरही त्यांनी दावा सांगितला. चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी स्वत: निवडणूक लढवण्याच्या घोषणेबरोबरच मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिका-यांना विधानसभा निवडणुकीत गाफिल राहू नका, विजयाचा तयारीला लागा, लोकांची मने जिंका, तरच मते पडतील, अशा सूचना त्यांनी दिल्या.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रथमच चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर सभा पार पडली. या सभेसाठी ‘या, मला आपल्याशी काही बोलायचे आहे’ अशा प्रकारची जाहिरातबाजी करण्यात आली होती. मात्र, या काही शब्दांवरच जोर देत राज ठाकरे यांनी आपण स्वत: निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
जमलेल्या गर्दीकडे निर्देश करत, ‘कोण म्हणेल ही पराभवानंतरची सभा आहे’ अशा वाक्यानेच भाषणाची सुरुवात राज ठाकरे यांनी केली. पराभवानंतर आत्मचिंतन जर करायचे तर पदाधिका-यांसोबत कशाला, तुम्हा सर्वासोबतच आत्मचिंतन करावे, असा निर्णय घेतला आणि ही सभा बोलावली, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून स्वत:चे सरकार बहुमताच्या आधारे आणल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन असे राज यांनी सांगितले. ज्या मतदारांनी मनसेला मतदान केले, त्यांचे अभिनंदन करतानाच जे पदाधिकारी या निवडणुकीत निष्क्रिय होते, त्यांचाही आपण समाचार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीचे विश्लेषण होऊ शकत नाही. जे कोणी भाजपचे तसेच त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले ते सर्व नरेंद्र मोदींमुळेच निवडून आले. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी पक्षच हरत असतो. पण सर्व ग्रह जुळून आले आणि हा चमत्कार घडला. मोदींचा चेहरा नसता तर ही मते पडली नसती, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या पराभवानंतर मनसे संपली, असे अनेकांनी जाहीर केले. पण मनसे संपलेली नाही. ही गर्दी बघा. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतर कसे सावरायचे याचे बाळकडू लहानपणापासून घेत आलोय, असे सांगत पराभवानंतर पुन्हा एकदा विधानसभेत मुसंडी मारणार असल्याचा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
नाशिकमधील महापालिका ताब्यात येऊन दोन वर्षे झाली नाही. पण तुम्ही काय केलेत असे पत्रकारांकडून नेहमी विचारले जाते, परंतु ज्यांच्याकडे २०-२५ वर्षे महापालिका आहे, त्यांना कधीही प्रश्न विचारला जात नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खळळ्-खटयाकची भाषा आपल्या कार्यकर्त्यांनाही कळलेली नाही. कुठेही काही झाले की मनसे स्टाईलचा इशारा द्यायचा नाही. यापुढे राज ठाकरे सांगेल तेव्हाच खळळ्-खट्टयाक करायचे. यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांना माझ्याशी बोलायचे असेल तर त्यांनी पत्र पाठवावे, असेही त्यांनी सांगितले.
आता ‘राज’ कारण