म्हाडाच्या कासवगतीने चालणा-या कारभारामुळे अडीच वर्षे उलटल्यावरही १३५२ गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेले नाही.
मुंबई – म्हाडाच्या कासवगतीने चालणा-या कारभारामुळे अडीच वर्षे उलटल्यावरही १३५२ गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेले नाही. १३५२ पैकी ६८८ अर्जदारांनी घरांच्या पात्रता निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे भरूनही त्यांना ताबा मिळालेला नाही. तर कागदपत्रे जमा न करणा-या कामगारांना अडीच वर्षानंतर अपात्र ठरवले असून प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना घरे देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अपात्र गिरणी कामगारांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागणार आहे.
[poll id=”1050″]
मुंबईतील बंद पडलेल्या १९ गिरण्यांच्या जमिनींवर गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या इमारतीतील ६ हजार ९२५ घरांसाठीची सोडत म्हाडाने २८ जून २०१२ रोजी काढली होती. ती प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हाडाने घराच्या पात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र ही प्रक्रिया म्हाडाने संथगतीने राबवली. याच्या विरोधात गिरणी कामगार संघटनांनी तीव्र आंदोलनही केले होते. त्यानंतर म्हाडाच्या अधिका-य़ांनी वितरणाला गती देण्याचा प्रयत्न केला.
आतापर्यंत एकूण ५ हजार ५७३ गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्यात आला आहे. उर्वरित १ हजार ३५२ अर्जदारांपैकी ६६४ अर्जदारांनी कागदपत्रेच जमा न केल्याने नियमानुसार प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना संधी देणे क्रमप्राप्त आहे. कागदपत्रे सादर न केलेल्या अर्जदारांबाबत म्हाडाद्वारे निश्चित निर्णय घेतला गेला नसल्याने प्रतीक्षा यादीवरील अर्जदार ताटकळत होते. म्हाडाद्वारे कागदपत्रे सादर न करणा-या अर्जदारांना आवाहन केल्यानंतर केवळ २० अर्जदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संधी देऊनही कागदपत्रे सादर न केलेल्या अर्जदारांना अपात्र करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
हा निर्णय स्वागतार्ह असला तरी याला अडीच वर्षाचा कालावधी का घेतला गेला, असा प्रश्नही कामगारांद्वारे उपस्थित केला जात आहे. मात्र ज्या अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली आहेत ते कामगारही म्हाडा कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. वृद्ध कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना म्हाडा कार्यालयात दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. विजेत्या अर्जदारांपैकी घरांचा ताबा न मिळालेल्या विजेत्यांना येत्या एका महिन्यात ताबा देणार असून त्याची प्रक्रियाही सुरूआहे, असे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या एका अधिका-याने सांगितले.
अडीच वर्षे उलटूनही अनेक कामगार अद्याप हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. याचे कारण म्हाडाचा संथ कारभार आहे. ज्या अर्जदारांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती, अशा अर्जदारांना अडीच वर्षाचा कालावधी देणे कितपत योग्य आहे? त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांनाही ताटकळत बसावे लागले. भविष्यात गिरणी कामगारांसाठी जी सोडत काढण्यात येईल, त्यावेळी असा संथ कारभार होता कामा नये. आता ज्या गिरण्यांच्या जागेवर घरे बांधण्यात येत आहेत त्यासाठीच्या सोडतीच्या नियोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करायला हवी, जेणेकरून भविष्यात घरांचा ताबा देताना विलंब होणार नाही, अशी मागणीही आम्ही राज्य शासनाकडे केली आहे. – दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते
अद्यापपर्यंत देकारपत्र घेवून कागदपत्रे सादर करत नसलेले तब्बल ६६४ गिरणी
कामगार आहेत जे अपात्र ठरणार आहेत. ते सोडतीत डबल सदनिका लागलेले, वारसांना डबल सदनिका लागलेले, १/१/१९८२ पूर्वीचे गिरणी कामगार, बोगस ज्यांच्याकडे एकही पुरावा नसलेले, कामगारांनी एकापेक्षा अधिक गिरण्यांमध्ये काम केल्याने त्यांनी दोन अर्ज केल्यामुळे दोन सदनिका लागलेले. कामगारांनी काम केलेल्या जागेच्या ठिकाणी अर्ज भरावयाचे असताना चुकीच्या संकेत क्रमांकावर अर्ज भरुन सदनिका लागलेले, गिरणीच्या जमिनीवरील चाळीत मोफत घर मिळालेले/ नुकसान भरपाई मिळालेले. म्हाडा दलालांना कृष्णकृत्ये करण्यास वेळ/अवधि देत असल्याचे स्पष्ट होते. अशा अपात्र गिरणी कामगारांना त्वरित रद्द करुन म्हाडाने पारदर्शकपणा दाखवून प्रतीक्षा यादीवरील कामगारांची यादी लवकरात लवकर म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी जेणेकरुन प्रतीक्षा यादीवरीलही गिरणी कामगार घरे मिळणार म्हणून आश्वस्त राहतील व कागदपत्रांच्या करण्यापूर्ततेसाठी तयारीला लागतील त्याद्वारे अधिकाधिक गिरणी कामगारांचे गृहस्वप्न पूर्ण होईल.