मुंबईत नागरिकांच्या अंगावर येणा-या भटक्या कुत्र्यांची समस्या गेल्या काही वर्षात सार्वत्रिक बनली आहे. हे कुत्रे दिवसरात्र भटकत असतात, भुंकत असतात, लोकांच्या अंगावरही येत असतात येथपर्यंत ठीक होते; पण या कुत्र्यांची भीड आणि भय चेपले आणि आता ते झुंडीने एकट्या दुकट्या माणसांच्या, मुलांच्या अंगावर धावून येऊन लागले आहेत, त्यांच्यावर हल्ले करू लागले आहेत. चावून त्यांचे लचके तोडू लागले आहेत.
संघटीत गुंडांची टोळी बनली की, ती जशी लोकांसाठी धोकादायक बनते तसेच या कुत्र्यांच्या झुंडी तयार झाल्या की, ते धोकादायक बनतात. चावणा-या भटक्या कुत्र्यांची संख्या मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रातही वाढली आहे आणि या कुत्र्यांच्या झुंडी अधिक आक्रमक झाल्या आहेत. मुंबईत व उपनगरात हे कुत्रे धुमाकूळ घालत आहेतच; पण आता ठाण्यात आणि रायगड जिल्हय़ातही त्यांचा उपद्रव वाढला आहे. ठाणे शहरात भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत असून तेथील अनेक नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी आणि नगरसेवकांनी महापालिकेकडे तक्रारीही केल्या आहेत. रायगड जिल्हय़ात महाडमध्येही या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या भटक्या कुत्र्यांनी गेल्या आठवडय़ात आठ जणांचा चावा घेतला. त्यापैकी चौघा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या कुत्र्यांविषयी पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वाहनांच्या मागे धावणे हा तर त्यांचा नेहमीचा उद्योग. मात्र नगरपालिकेने कुत्र्यांच्या दहशतीकडे लक्ष दिलेले नाही व आपण इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंक्तीत आहोत असेच दाखवून दिले आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबतीत जे महाड नगरपालिका करत आहे तेच मुंबई महापालिकेसारखी महापालिका करत आहे. महापालिकेने गेल्या ७-८ वर्षात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष न दिल्याने कुत्र्यांची संख्या वाढत गेली. पूर्वी महापालिका शहरातील कुत्र्यांना पकडून त्यांना वीजभट्टीत टाकून मारत असे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत नव्हती. परंतु ‘पेटा’ ही प्राणिमित्र संस्था न्यायालयात गेली. या संस्थेने भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात येऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयाकडून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा पर्याय पुढे आला. त्यानंतर महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली. पण महापालिकेने या योजनेबाबत कधीच फारसा रस दाखवला नाही. परिणामी कुत्र्यांची संख्या वाढतच गेली. २००७मध्ये महापालिकेने सर्वेक्षण केले तेव्हा कुत्र्यांची संख्या ७४ हजार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण मुंबईत आज सुमारे सव्वा लाख भटके कुत्रे असून या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व्यवस्थित होत नसल्याची तक्रार एका नगरसेवकाने महापालिकेच्या बैठकीत केली. काही महिन्यांपूर्वी एका शालेय विद्यार्थ्यांला कुत्रा चावल्याने तो गंभीर जखमी झाला व त्याला तब्बल दीडशे टाके घालावे लागले. कुत्र्यांची आणि त्यांच्या चाव्यांची संख्या वाढत आहे. याबाबत महापालिकेचीच आकडेवारी पाहिली तर हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे, याची कल्पना यावी. २००८मध्ये सुमारे ६२ हजार ७०० श्वानदंश झाले. ही संख्या दर वर्षी वाढत जाऊन २०१४च्या जुलैपर्यंत म्हणजे या वर्षाच्या सात महिन्यात श्वानदंश झालेल्यांची संख्या सुमारे ४५ हजारांवर गेली आहे. म्हणजे ही संख्या पुढील पाच महिन्यात किती होईल, याची कल्पना यावी. कुत्र्याच्या दंशानंतर आवश्यक असलेल्या अँटी रेबीज लसीचाही काही वेळा तुटवडा भासतो, अशीही नागरिकांची तक्रार असते. अर्थात ही लस नेहमी उपलब्ध असते, असा महापालिकेचा दावा आहे. पण आमचे म्हणणे असे आहे की, लस तर उपलब्ध हवीच; पण ही लस घेण्याची पाळीच नागरिकांवर येता कामा नये. भटक्या कुत्र्यांची ही समस्या आज केवळ मुंबई महाराष्ट्रातच नव्हे, तर सा-या देशात आहे. श्वानदंशामुळे देशभरात दरवर्षी सुमारे २५ हजार नागरिकांचा मृत्यू होतो. एकदा रेबीज झाला की, रुग्णाचा मृत्यू ठरलेलाच आहे. त्यामुळे या समस्येचे निराकरण झालेच पाहिजे. महापालिकेने कुत्र्यांना मारण्याची जी पद्धत अवलंबली होती. पण या पद्धतीविरुद्ध मनेका गांधी यांनी प्राण्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोहीम उघडून न्यायालयात याचिका केली. २०११मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना कुत्र्यांना ठार मारण्याचा कायदा मान्य केला होता; परंतु प्राणिमित्र संघटनांनी या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या संबंधीचा निर्णय आजही प्रलंबित आहे. याबाबत नगरसेवकांचे म्हणणे असे आहे की, महापालिकेने उत्तम वकील देऊन आपले म्हणणे मांडावे. या प्रश्नाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता हा प्रश्न तडीला नेणे आवश्यक आहे. या संबंधात जरूर तर राज्य सरकारांनीही लक्ष घालण्याची गरज आहे. हा प्रश्न चिघळण्याचे कारण प्राणिमित्र संघटनेने जी हटवादी आणि अयोग्य भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे. ज्या प्राणिमित्र संघटना कुत्रे आणि अन्य प्राण्यांविषयीच्या दयाबुद्धीने आपले तत्त्वज्ञान दुस-यांवर लादून त्यांना धोका निर्माण करतात त्या संघटनांचे चालक आणि पदाधिकारी हे सर्व उच्चभ्रू स्तरातील आहेत. ही मंडळी गाडीतून फिरणारी असतात. जमिनीला त्यांचे पाय क्वचितच लागत असतात. रात्री-अपरात्री ही मंडळी आलिशान गाडय़ांमधून घरी येतात व वातानुकूलितघरांमध्ये झोपून जातात. सामान्य माणसांशी त्यांचा संबंध फारसा येत नाही व सामान्य माणसाची ते कधी विचारपूसही करत नाहीत. ज्या लोकांना कुत्रे चावतात, त्यांची चौकशी हे उच्चभ्रू महाभाग करत नाहीत. त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था काय झाली, त्यांनी श्वानदंशावरील लस घेतली की नाही, नाही घेतली तर का घेतली नाही, याची विचारपूस य मंडळींकडून होत नाही. या लोकांचे म्हणणे असे की, महापालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले की, प्रश्न सुटला. पण या संबंधात काय अडचणी आहेत की, महापालिकांच्या व नगरपालिकांच्या काय अडचणी आहेत, याचीही त्यांनी कधी दखल घेतली नाही. त्याची त्यांना गरज वाटत नाही. भटक्या कुत्र्यांना कुणी मारले किंवा त्यांची कुणी कुरापत काढली की, ही मंडळी लगेच धावून येतात व कायद्याची भाषा करतात. न्यायालयात कारवाई करण्याचीही त्यांची तयारी असते. अर्थात सर्व महापालिकांनीही आज नागरिकांना जो त्रास होत आहे त्या संबंधात न्यायालयात एकत्रित कारवाई करता येते का, याबाबतही संबंधितांशी चर्चा केली पाहिजे. भटके कुत्रे वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे या कुत्र्यांना रोज बिस्किटे व खाण्याचे अन्य पदार्थ खाऊ घालणारी आणि ‘पुण्य’ पदरी पाडणारी मंडळी सर्व विभागात आहेत. या मंडळींमुळेही कुत्र्यांची वस्ती वाढत आहे. उच्चभ्रू मंडळींप्रमाणे या मंडळींनाही रोखण्याची आवश्यकता आहे. कुत्र्यांची दहशत संपवायची असेल तर सामान्य नागरिकांनीही आवाज उठवला पाहिजे.
[EPSB]
कर्जबुडव्यांचा भार
देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताने संमिश्र आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे देशाला अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करता आली. शेतीप्रधान असलेल्या या देशाने गेल्या सात दशकात उद्योग क्षेत्रातही मोठी भरारी घेतली. औद्योगिक उत्पादने, शेतमाल, साखर, औषधे यांची कोटयवधी रुपयांची निर्यात आज आपण करत आहोत.
[/EPSB]
जागतिक रेबीज दिन
“रेबीज (जलसंत्रास) नियंत्रणासाठी विश्व युती” या जागतिक संघटनेचा रेबीज जागृती मोहीम-अंतर्गत उपक्रम हा “जागतिक रेबीज दिन” म्हणून साजरा केला जातो. “रेबीज (जलसंत्रास) नियंत्रणासाठी विश्व युती” संघटनेचे मुख्य कार्यालय युनायटेड स्टेट येथे आहे. दर वर्षी २८ सप्टेंबर रोजी हा “जागतिक रेबीज दिन” साजरा केला जातो. २८ सप्टेंबर हा थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी. लुई पाश्चर हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. लुई पाश्चर हे प्रामुख्याने “अनेक सूक्ष्म-जीवजंतू निर्मित मानवी रोगांची करणे आणि त्यांचे नियंत्रण” या विषयांतर्गत ओळखले जातात. थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या पुण्यास्मारानार्थ, “जागतिक रेबीज दिन” म्हणून साजरा केला जातो.
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
रेबीज रोगाची लक्षणे:
साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
रेबीज रोगासाठी उपचार :
प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्स्पो जर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणे योग्य आहे.
पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.
पाळीव कुत्र्याचे रेबीजपासून संरक्षण
१. वयाचे तीन महिने झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.
२. पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
३. कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा.
४. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्रक्रिया करा .
५. वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.
रेबिजग्रस्त कुत्र्यांमधील लक्षणे:
सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश पाण्याची भीती वाटणे, आणि नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.
रेबिजग्रस्त प्राण्यातील आक्रमकता वाढणे
रेबीज मध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो, तो तहानभूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.
सुस्त प्रकार
या प्रकारात प्राण्याला प्रथम मज्जारज्जूला आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो. नंतर हृदय, फुफ्फुसे यांनापण संसर्ग होतो, अर्धांगवायु होतो, प्राण्याची शुद्ध हरपते व नंतर मृत्यू होतो.
रोग निदान
प्राण्याच्या मेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते . त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे.
रोगाचा प्रसार
रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, उदा० माणूस. असे ही सिद्ध झाले आहे की हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो.
हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये दिसून आलेला आहे. वटवाघळे , माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो. खारी, ह्यामस्टर, वराह (गिनी पिग्ज), उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.
रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो.
माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो.
तयार माहिती श्रोत: https://mr.wikipedia.org/wiki/रेबीज.. ——
विज्ञान मंडळ (शैक्षणिक वर्ष: २०१७ – २०१८) शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर.
फाईल : २८.सप्टेंबर@ जागतिक.रेबीज.दिन