देशातील १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात सार्वजनिक वाहतूक करणा-या रिक्षा, बस, टॅक्सीत ‘जीपीएस’ यंत्रणा बसवणे सक्तीचे केले आहे.
नवी दिल्ली- देशातील १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात सार्वजनिक वाहतूक करणा-या रिक्षा, बस, टॅक्सीत जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) यंत्रणा बसवणे सक्तीचे केले आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत ही यंत्रणा न बसवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय रस्ते व महामार्ग खात्याने दिला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक सार्वजनिक वाहतूक करणा-या वाहनात जीपीएस यंत्रणा बसवणे सक्तीचे झाले आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर २०१३ ही जीपीएस यंत्रणा बसवण्यासाठी अंतिम मुदत होती. ती वाढवून २० फेब्रुवारी २०१४ केली.
देशातील सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने १४०५ कोटी रुपये मंजूर केले. या अंतर्गत प्रत्येक सार्वजनिक बसेसमध्ये अलार्मचे बटण असणार आहे. त्यामुळे आणिबाणीच्या काळात प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही लावणे सक्तीचे आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय वाहन सुरक्षा व देखरेख यंत्रणा तयार केली आहे. या अंतर्गत सार्वजनिक वाहतूक सेवांच्या बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प ‘निर्भया’ निधीतून केला जाणार आहे.
Thanks for smart keys..