दिल्लीत तख्तापलट करणा-या आम आदमी पक्षाला आता २०१४च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असून, मुंबई ही ‘आप’च्या अजेंडयावर आहे. दिल्लीत सत्तेच्या जवळचे नाही तरी काँग्रेसचा सुपडा साफ करत मुख्य विरोधी पक्ष बनण्याइतक्या २८ जागा मिळवून ‘आप’ने भल्याभल्यांना आसमान दाखवले, ही वस्तुस्थिती आहे. एका रात्रीत अरविंद केजरीवाल हे ‘आप’ले हिरो झाले, असे सोशल मीडियावरील बहुतेकांचे मत आहे. मात्र, सध्या मुंबईत थोडय़ाफार प्रमाणात अस्तित्व दिसणा-या आम आदमी पक्षाला दिल्लीकरांप्रमाणेच मुंबईकरही आपलेसे करणार का, हा आता कळीचा मुद्दा आहे.
लोकसभेची सेमीफायनल म्हणून प्रसारमाध्यमांनी गाजावाजा केलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आले आणि दिल्लीत शीला दीक्षितांसह अनेक दिग्गजांना हरवून जायंट किलर बनलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षा’चा (आप) गवगवा सुरू झाला. निकालापूर्वी कोणाच्याच खिजगणतीत नसणा-या ‘आप’ने थेट प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान मिळवल्याने भारतीय राजकारणाच्या पटलावर मतदारांसाठी नव्या राजकीय पर्यायाचा उदय झाल्याची चर्चा सुरू झाली. झाडूचे चिन्ह घेऊन सर्वसामान्यांचा पक्ष अशी प्रतिमा रेखाटण्यात केजरीवाल यशस्वी ठरल्याने २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘आप’कडून ब-याच अपेक्षा निर्माण होणे स्वाभाविकच आहे. त्यानुसार, ‘आप’नेही लगेचच मुंबई आणि महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आणि तसे जाहीरही केले. मात्र, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बराच फरक आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्ली सरकारविरोधी भावना तीव्र होती आणि त्याचा परिणाम काँग्रेसला मिळालेल्या जेमतेम आठ जागांमधून दिसला. कॉमनवेल्थ खेळांच्या वेळी झालेला भ्रष्टाचार, विविध विकासकामे करताना गरिबांवर झालेला अन्याय, तसेच सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या शीला दीक्षितांच्या सरकारविषयी निर्माण झालेली चीड अशा अनेक बाबी सुमारे ७० टक्क्यांच्या घरात पोहोचलेल्या या मतदानाने व्यक्त केली. महाराष्ट्रात त्या प्रमाणात सरकारविरोधी लाट आहे का, हे सांगणे कठीण आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असल्याने मुंबईतील ब-याच मुद्यांवरून असलेली नाराजी ही युतीच्याही विरोधात आहे. उलट, ‘आप’मुळे सेना-भाजप युती, मनसे आणि राष्ट्रवादीच्या व्होट बँकेत फरक पडेल अशी चिन्हे आहेत.
दिल्लीचा निकाल जाहीर होईपर्यंत ‘आप’कडे फक्त ‘नेटसॅव्ही’ लोकांचा कल असल्याचे तर्क लढवले जात होते. मात्र, निकालानंतर ‘आप’ अगदी झोपडपट्टयांपासून उंच टॉवर्समधील ड्युप्लेक्स फ्लॅट्सपर्यंत पोहोचल्याचे आणि मुख्य म्हणजे ‘ऑनलाइन’ असणारा वर्ग मतदानासाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला. भाजपसारख्या पक्षाने तर लगेचच ‘आप’ची कुंडली मांडून सोशल मीडियावरून ‘आप’च्या कर्तृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतील, असे स्क्रॅप्स, मेसेजेस पसरवणे सुरू केले. अगदी भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वानीच ‘आप’विरोधात थेट मोर्चा उघडला. याचाच अर्थ ‘आप’ची सर्वाधिक भीती भाजपला वाटते आहे. भाजपप्रमाणेच ‘आप’चा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे ती राज ठाकरेंच्या एकछत्री अंमल असलेल्या मनसेला! बाळासाहेबांनंतर शिवसेनेचा करिष्मा संपल्याचे जाणवत असले तरी सेनेतून निर्माण झालेल्या आणि गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नव्या चेह-यांद्वारे भल्याभल्यांना झटका देणा-या मनसेसाठी ‘आप’ म्हणजे धोक्याची घंटा ठरणार आहे. पांढरपेशा मध्यमवर्ग, शिवसेनेप्रमाणेच शाखांवर उठबस करणारा तरुण वर्ग हीच मनसेची खरी ताकद आहे. ‘आप’ने दिल्लीत याच वर्गाला आपलेसे केले आणि मुंबईतही तोच प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत, महाराष्ट्रात दिल्लीपेक्षा प्रादेशिक पक्षांचे सामर्थ्य निश्चितच अधिक आहे. मनसेकडे शिवसेनेतून आलेला सैनिक ब-यापैकी असल्याने आक्रमकता हा मनसेचा स्थायीभाव आहे. त्यानुसारच, मनसेची उमेदवार निवड होईल. मात्र, ‘आप’कडे पांढरपेशा वर्गाचा भरणा राहणार आहे. शिक्षक, पत्रकार, आयटी तज्ज्ञ, इंजिनयर, डॉक्टर्ससह नोकरदार मंडळींपासून छोट्यामोठ्या व्यावसायिकांचा उमेदवारांमध्ये भरणा असण्याची शक्यता आहे. हे सर्व चेहरे बिनचेह-याचे असले तरी त्यांची खरी ओळख ‘झाडू’ असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘आप’ची भीती वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात, लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत ‘आप’चा प्रभाव राहील का, असा प्रश्न दिल्लीतील अनुभवानंतर विचारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळेच, ‘आप’ला आता मुंबईतही तितकेच गांभीर्याने घेण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादांनी ‘आप’च्या कार्यक्षमतेबाबत केलेली टीकाही त्याचेच लक्षण आहे. काहीही असले तरी, या सर्वच पक्षांमधील नाराजांना तसेच इच्छुकांना आता ‘आप’चा पर्याय मिळाला आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मुंबई व महाराष्ट्रातही बिनचेह-यांचेच उमेदवार देतात की आयाराम-गयारामांच्या मोहजालात अडकतात, यावरही ब-याच गोष्टी अवलंबून आहेत. आता ‘आप’कडे येणा-यांची संख्या वाढणार हे निश्चित आणि त्यातून खरोखरच ‘कॉमन मॅन’ निवडण्याची कसोटीही अधिक कठीण होणार, हेही तितकेच खरे!
कालपर्यंत जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलनापुरती मर्यादित असलेली सर्वसामान्यांची शक्ती ‘आप’मुळे राजकीय क्षितिजावर स्थानापन्न झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाबरोबरच चर्चेत आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी राजकारणाचा मार्ग पकडून अण्णांची नाराजी ओढवून घेतली आहे. मात्र, आजच्या घडीला केजरीवाल अण्णांपेक्षा दोन पावले पुढे गेल्याचे मान्य करावेच लागेल. आज राळेगणसिद्धीतील अण्णांच्या आंदोलनापेक्षा केजरीवालांच्या दिल्लीतील विजयी सभेला मीडियाच्या कॅमे-यांनी गर्दी केली होती, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. ‘जो बिकता है वही बेचना है’, अशी चॅनेलवाल्यांची भूमिका असून टीआरपीच्या गणितात बसणा-या बातम्या अग्रक्रमाने दाखवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यानुसार, आता ‘आप’ची व केजरीवालांची ‘फेसव्हॅल्यू’ वाढली आहे. त्याचाच फायदा ‘आप’ला मुंबईत हातपाय पसरवायला होणार आहे. मात्र, त्याच वेळी ‘आप’मध्येही ‘पहले आप, पहले आप’ऐवजी ‘पहले मैं’ लागण होऊ लागल्याचे दिसते आहे. मुंबईतील प्रस्थापित आप नेत्यांपैकी मयांक गांधींबाबत पक्षातून आत्ताच नाराजी जाहीर होऊ लागली आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या वेबसाइटवर आलेल्या निधीपैकी बराचसा निधी एका विशिष्ट स्वयंसेवी संस्थेकडे वळता केल्याचा आरोप काही ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यातच, अण्णांबरोबरच्या पूर्वीच्या सुमधुर संबंधांचे पर्यावसान वादांमध्ये होऊ लागल्याने ‘आप’चे खच्चीकरण आपोआप होण्यासही सुरुवात झाली आहे.
आजच्या घडीला मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा काँग्रेस आघाडीकडे आहेत. मोदी, राज ठाकरेंच्या मोठमोठ्या सभांमुळे मतपरिवर्तन होऊनही जितका उलटफेर होणार नाही तितका ‘आप’च्या चौकसभा व घरोघरी जाण्यामुळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आप’ला मराठी जनतेने आपलेसे करू नये यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी विशेषत: प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे, एवढे मात्र निश्चित!
Aamhi vaat Pahat Aahot Mumbai ” AAP ” Chi Kadhi Hotye yaachi.