रहस्यकथा खूप जण लिहितात. आंग्लवाङ्मयात आर्थर कॉननडॉइल, अॅगाथा ख्रिस्ती, अर्लस्टॅनले गार्डनर हे बहुतेकांच्या परिचयातले. पण ज्यांना आंग्लभाषा परिचित त्यांनाच त्यांचा परिचय. मात्र, आंग्लवाङ्मयातलं हे सोनं मराठीत आणण्याचं १०० टक्के कठीण काम यशस्वी करणारे एकमेव लेखक म्हणजे बाबूराव अर्नाळकर.
दोडामार्ग- कोणतेही व्यसन माणसाला अगदी झटक्यासरशी दु:खापासून तात्पुरतं दूर नेतं. सुखासाठी हपापलेल्या माणसाला त्याच्या अधीन होण्यावाचून पर्यायच नसतो. मात्र, दुस-याच क्षणी ते व्यसन माणसाला सुताशिवाय स्वर्ग गाठायलाही मदत करतं. पण त्याचा विचार करायला त्याच्याकडे ओव्हरटाईम नसतो!
व्यसन, मग ते धूम्रपान, मद्यपान, नशापानच नव्हे, तर निरनिराळे छंद, कला, लेखन, वाचन यापैकी काही असू शकतं. जास्तीत जास्त सुख मिळविण्याकरिता जेव्हा त्याचा अतिरेक होतो, त्या वेळी ‘ते’ व्यसन बनतं. वाचनाचं वेडही तसंच आहे. एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षाही जर एखादी रहस्यकथा ऐकायला, वाचायला मिळाली तर त्याला ती सर्वप्रथम हवीहवीशी वाटते.
वाचनवेडे काही थोडेथोडके नसतात. तासन् तास वाचीत बसण्याचा त्यांना कंटाळा म्हणून येत नाही. त्यामागे ज्ञान मिळवणं हा उद्देश असतोच. पण मेंदूच्या झिणझिण्या कमी करणेच जास्त असते. रहस्यकथांचं वेड हे मला तर वाटतं, कोणत्याही व्यसनापेक्षा जबरदस्त असावं.
रहस्यकथा खूप जण लिहितात. आंग्लवाङ्मयात आर्थर कॉननडॉइल, अॅगाथा ख्रिस्ती, अर्लस्टॅनले गार्डनर हे बहुतेकांच्या परिचयातले. पण ज्यांना आंग्लभाषा परिचित त्यांनाच त्यांचा परिचय. मात्र, आंग्लवाङ्मयातलं हे सोनं मराठीत आणण्याचं १०० टक्के कठीण काम यशस्वी करणारे एकमेव लेखक म्हणजे बाबूराव अर्नाळकर. या कादंबरीकाराचं लेखन कित्येक हजार पुस्तकांच्या स्वरूपात आम्हा महाराष्ट्रीयनांना प्राप्त झालंय आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची केव्हाच नोंद झालीय.
अर्नाळ्याच्या या जबरदस्त लेखकाचं मूळ नाव आहे ‘चंद्रकांत सखाराम चव्हाण’! आईबापाचं छत्र अगदी लहानपणीच हरवल्यामुळं स्वारीला मुंबईच्या मावशीकडे आश्रय घ्यावा लागला होता. शिक्षण आणि नोकरीही मुंबईतच. एका ब्रिटिश कंपनीमध्ये. मात्र, नोकरीत रस नव्हता. मुंबईत एका चष्म्याच्या दुकानातला अनुभव होता. म्हणून शेवटी मुंबईतच चष्म्याचं दुकान थाटलं. फावल्या वेळात रहस्यकथा लिहिण्याचं जबरदस्त वेड होतंच. त्यामुळे इथंच ते स्थिर झाले.
त्यांची अगदी पहिलीवहिली रहस्यकथा ‘सतीची समाधी’. विशेष म्हणजे ही कथा ‘नाथमाधवां’ना एवढी आवडली की, त्यांनी त्यांचे वारेमाप कौतुक केले. अन् हीच प्रेरणा घेऊन ते पुढे कथा लिहू लागले. नंतर चुकूनही त्यांनी मागे पाहिलं नाही. मात्र, त्यांची पहिली रहस्य कादंबरी त्यांनी वयाच्या ३७व्या वर्षी १९४६मध्ये लिहिली. तिचं नाव होतं ‘चौकटची राणी’ या कादंबरीनं वाचकांना अक्षरश: वेड लावलं.
आम्ही त्या वेळी लहान. पण मोठेपणी जेव्हा त्यांच्या ‘गोल घुमटी’, ‘अजब घुमटी’, ‘लाल घुमटी’ या कादंब-या वाचल्या तेव्हाच आम्हाला रहस्यकथा वाचनाचं वेडच नव्हे तर चक्क ‘व्यसन’ लागलं. मात्र, असं कादंब-या शोधत असताना चांगले चांगले मोठमोठे संपादक, लेखकसुद्धा त्यांच्या कादंब-या वाचतात.
तुम्ही म्हणाल ‘त्यात काय मोठंसं?’ त्याचं असं आहे की, त्या काळी ‘सोवळ्या’ लोकांना रहस्यकथा ‘ओवळी’ वाटायची! का तर म्हणजे त्यात खून, मारामा-या, कट, कारस्थानं असतात. त्यामुळं त्या कादंब-यांना ‘स्टँडर्ड’ नाही. आम्ही म्हणतो मग हे लेखक चोरून मारून तरी रहस्यकथा का वाचतात? म्हणजे शेवटी हे ‘थोतांड’!
खांडेकर, फडक्यांचा तो जमाना. फडक्यांच्या कादंब-यांत तर ‘प्रेम’, ‘प्रियकर’, ‘प्रेयसी’ हे शब्द. ‘प्रेम’चा अर्थ ‘लफडं’ असा दिसायचा? सोवळ्या लोकांना या कादंब-या कशा चालल्या कुणास ठाऊक!
बालगंधर्व संगीत मंडळी, किर्लोस्कर मंडळी, बलवंत नाटक मंडळींची नाटकं व त्यातील नाटय़संगीतावर उडय़ा पडत. पण त्याचबरोबर त्या वेळी माधवराव पाटणकरही इतर नाटकं कमी तिकिटात दाखवत. तीही धडाकेबाज चालत. कारण सामान्य माणसांच्या खिशाला परवडेल व डोक्याला शिणवणार नाही, असं काही तरी त्यांच्यात होतं.
रहस्यकथांच्या बाबतीतही ‘चार आणे’माला सुरू करून अर्नाळकरांनी सामान्य रसिक मंडळींचीही भूक भागवली!
दर महिन्याला पाच-सहा कथा वेगवेगळ्या मालिकेतून लिहिल्या जात होत्या. एवढय़ा ‘फंटास्टिक’ कल्पना यांना सुचतात तरी कशा? असं आम्हालाही वाटायचं! पण दुस-या काही मित्रांकडून या रहस्यकथांमागील प्रेरणा आर्थर कॉननडॉइल, अॅगाथा ख्रिस्ती, अर्लस्टॅनले गार्डनर या इंग्रजी लेखकांच्या आहेत. त्या वेळीही आम्हाला मुळीच वाईट वाटलं नाही. उलट आनंदच झाला. पण अशा कथा-कादंब-या वाचण्याकरता इंग्रजी शिकलंच पाहिजे. हे वेड डोक्यात भरलं! महत् प्रयासाने ते साध्य झालं. सुरुवाती सुरुवातीला शेक्सपिअर, मार्क ट्वेन कळले नाहीत. कारण त्यांची जुनी भाषा! त्यासाठी पुन्हा अभ्यास!
इंग्रजीतल्या कल्पना आणल्या हेही एक नवे कोण रहस्य, कथाकार बाबूराव अर्नाळकरना साहित्यिक म्हणून मान्यता न द्यायला कारणीभूत ठरले. खरं तर आजही वाङ्मयाच्या समीक्षेने सर्वच्या सर्व सिद्धांत (आधुनिक) तर पाश्चात्त्य आहेत. गुन्हेगारीची आणि गुन्हेगाराच्या तपासणीची आधुनिक तंत्रंही तिकडेच विकसित झाली आहेत. इतर लेखकही त्याचा उपयोग आपल्या लेखनात करतात. मग एकटय़ा अर्नाळकरना दोष देऊन काय उपयोग?
आंग्लभाषेतील हा समृद्ध वाङ्मयप्रकार मराठी वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अर्नाळकरांना एखाद्या साहित्य संमेलनात बोलावून त्यांची मुलाखत घेण्याचं मान्यवरांना सुचलं नाहीच. पण त्यांनी त्यांचे साधे आभारही मानले नाहीत. ज्या लेखकांची शृंगारिक वर्णने एवढी भडक असतात की मर्यादेचं उल्लंघन करून प्रसंगी अनेकदा ते अश्लीलतेकडे झुकलेलं आढळतं अशांना मग का दोष देत नाहीत? अर्नाळकरांनी आपल्या कोणत्याही कादंबरीत असा प्रमाद घडवलेला तुम्हाला आढळणार नाही. आधुनिक लेखकांपैकी राजाराम राजेंसारख्या काशीकरांच्या नामकाला त्याच्या नायिकेशी रोमान्स करण्याची लहर कधीही येऊ शकते. सदानंद भिडे वाहय़ात लेखनाबद्दल मशहूर आहेत. बाबूरावांचे झुंजार, काळापहाड हे नायक कधीही मर्यादा ओलांडताना दिसत नाहीत.
बाबूराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांचे स्वरूप अखेपर्यंत निभ्रेळ ठेवले. त्यांत कधी जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतपिशाच्च, परग्रहावरील जीव अशा गोष्टी येऊ दिल्या नाहीत.
बाबूरावांचे कथा नायक-नायिका अर्नाळकरांनी त्या वेळी धनंजयमाला, झुंजारमाला, जयहिंदमाला, प्रफुल्लमाला, यौवनमाला अशा माला सुरू करून त्यातून दरमहा पाच-सहा कथा लिहिल्या. धनंजयमालेत डिटेक्टिव्ह धनंजय व त्यांचा मदतनीस छोटू असायचा. झुंजारमालेत झुंजार हा रंगेल उठावगीर व विजया असायची. नेताजी हा नोकर पण सहायक होता. काळापहाड व पत्नी सुहासिनी असायची. दिवसा उजेडी तोच चंद्रवदन व्हायचा. सामान्य जनतेचे शत्रू असलेल्या बदमाशाला अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं. याशिवाय गोलंदाज, कोदंडराव अशी पात्रंही होती. धर्मसिंग हा त्यातील बदमाश, तसेच शेरखान व सुंदरा ही झुंजार विजयाप्रमाणेच एक जोडी, दर्यासागर एक चाचा. आबा दरेकर हे एक बेरकी पात्र. अशा अनेक अफलातून पात्रं त्यांनी निर्माण केली. ‘एडगर वॅलेस’ या इंग्रज कथाकाराची कादंबरी ‘फोर जस्ट मेन’ वाचून अर्नाळकरांना रहस्यकथा लेखनाची प्रेरणा मिळाली. जास्तीत जास्त वाचकांच्या मनात त्यांच्या कथा वाचून आवड निर्माण झाली. त्यांना कोणी साहित्यिक म्हणोत, ना म्हणोत, साहित्यिकांच्या हातून त्यांचा गौरव होवो न होवो. मात्र, त्यांच्या वाचकांची दुनिया अमर्यादपणे महाराष्ट्रभर पसरलेली आहे. ‘मनोरमा प्रकाशन’तर्फे त्यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना त्यांच्या शेकडो कथा पुनर्मुद्रित होत आहेत ही समाधानाची बाब.
अर्नाळकरांसारखा लेखक पुन्हा होणे नाही.
अजरामर रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर !!! आम्ही त्यांच्या रोमांचकारी कथा वाचून मोठे झालो !!