खड्डयांच्या प्रश्नावर मुंबई, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर क्षेत्रातील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या कारभाराचे वाभाडे काढल्यानंतरही पालिका हद्दीतील रस्त्यांवर आजही खड्डयांची जाळी कायम आहे. गणरायाचे आगमन आणि निरोप असा संपूर्ण प्रवास याच खड्डयांतून झाल्यानंतरही त्याचे कोणतेचे सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात जनतेचे सेवक वागले. आता विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण गरम झाल्यानंतर अनेक ठिकाणी सत्ताधा-यांना जाग आली असून खड्डेमय रस्त्यांवर डांबर, खडी पेरून मुलामा देण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणण्यासाठी हा विशेष रिपोर्ट.
कल्याण-डोंबिवलीत कोटींचे खड्डे
कल्याण – ‘जनतेचा पैसा कसाचा लुटायचा. हे बोलून नाहीतर करून दाखवले! याची साक्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजप युती देत आहे. टोलेजंग इमारती, मेट्रो मॉल, बाजारपेठेतील अलिशान दुकाने असा कायापालट मागील काही वर्षात झाला असला तरी महापालिका क्षेत्रातील रस्ते मात्र खड्डयांची जाचातून सुटण्यास तयार नाहीत.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी केडीएमसीकडून कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जाते. यंदाही १२ कोटी रुपयांची तरतूद खास खड्डयांसाठी करण्यात आली. मात्र गणेशोत्सव काळात प्रशासनाने केलेली तात्पुरती मलमपट्टी वगळता खड्डयांच्या जाळीतून मुक्तता कधी, असा सवाल शहरवासीयांना पडला आहे. पावसाच्या धडाक्याने शहरातील डांबरी रस्त्यांवर जागोजाग खड्डे बाहेर पडले. हे खड्डे बुजवणे हे पालिकेपुढे मोठे आव्हान ठरले होते. गणेशोत्सव जवळ आला असतानाही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने पालिकेला नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले होते. अधूनमधून पडणा-या पावसाने तात्पुरती मलमपट्टी काहीएक कामाची उरलेली नाही.
डोंबिवलीतील मानपाडा रस्ता असो वा कल्याण रस्ता या शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. एकीकडे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू असताना दुसरीकडे डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांचा सामना करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवलीकरांचा हा खड्डे प्रवास पावसाळा संपत आला तरी संपण्याचे नाव घेत नाही. दुसरीकडे राज्य सरकारच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातंर्गत ३७४ कोटी रुपये खर्चाची काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात कल्याण पश्चिमेतील तीन व पूर्वेतील एक अशा चार रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. दुस-या टप्प्यात डोंबिवलीतील १० आणि कल्याणमधील नऊ अशा एकूण १९ सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू असल्याने त्याचा फटका वाहनचालक व नागरिकांना बसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या सेवा वाहिन्यांची कामे खोळंबल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
दोन वर्षापूर्वी खड्डयांच्या प्रश्नावरून के डीएमसीत वातावरण तापले होते. दरम्यानच्या काळात रस्ते विकासातून केडीएमसीला पुरस्कारही मिळाला होता. रस्त्यांची अवस्था बिकट असताना पालिकेने पुरस्कार स्वीकारल्याने सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी प्रसिद्धीमाध्यमांच्या टिकेचे लक्ष्य बनले. त्यामुळे पालिकेने पुरस्कार स्वीकारल्यानंतरही रस्ते दुरुस्त होईपर्यंत दालनात लावणार नाही, अशी नामुष्की ओढवली हेाती. त्यावेळी रस्ते दुरुस्ती हाच एककलमी कार्यक्रम राबवून, रस्ते सुस्थितीत केले. मात्र सत्ताधा-यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे खड्डयांची समस्या अद्याप कायम आहे.यातून पालिका प्रशासन कधी धडा घेईल का, हा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
कर्जतमध्ये रस्त्याला डांबरी मुलामा!
कर्जत-चौक राज्य मार्गावर खड्डे भरणीला अखेर मुर्हूत सापडला आहे. वावल्रे, बोरगाव, ग्रामपंचायतीमधील रहिवाशांनी वावल्रेचे उपसरपंच पप्पू विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर उशिराने जाग आलेल्या एमएमआरडीए प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महामार्गाचे चौपदरी करण्याच्या कामाचे कंत्राट एमएमआरडीएने मुंबईतील सुप्रिम इंजिनियर कंपनीला दिला होता. या कंपनीने रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा पुढे करत अनेक महिने रस्त्याचे काम सुरू केले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला कंत्राटदार कंपनीने रस्त्याचे काम काही भागात सुरू केले. ते करत असताना जुना अस्तित्वात असलेला रस्ता अनेक ठिकाणी खोदून त्यावर डांबरीकरणचा मुलामा दिला. त्यानंतर पावसाळय़ात ठेकेदाराच्या कामाचा दर्जा सर्वाना दिसून आला. सध्या या रस्त्यावर अगणित खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. नऊ किमीच्या रस्त्यावरून पुढे जाण्यासाठी तासन्तास लागत असल्याने जनतेकडून प्रशासनाचे नावाने खडेफोड होत आहे.
अंबरनाथच्या दुरवस्थेला शिवसैनिकच विटले!
अंबरनाथ – रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यांची दुर्दशा, पाण्याच्या वितरण प्रणालीतील नियोजनाच्या अभावामुळे सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या कामाला नागरिक विटलेले असतानाच, याबाबत आता शिवसैनिकांनीसी संताप व्यक्त केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांना धडा शिकवण्याची तयारीच या शिवसैनिकांनी केल्याची चर्चा आहे.
अंबरनाथमधील रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. कंत्राटदाराचा मनमानीपणा, प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव आणि सत्ताधा-यांची नसलेली पकड यामुळे शहर रोजच्या रोज समस्यांच्या गर्तेत अडकत आहे. त्यातच ७७ कोटी रुपयांच्या जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदले आहेत. पावसाळय़ात झालेल्या रस्त्यांच्या वाताहतीमुळे रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले आहेत. अशा रस्त्यांवरून वाहने चालवताना कस पणाला लागतो. या सर्व समस्यांमुळे नागरिक सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला कोसत असतानाच आता शिवसैनिकही या कारभाराला विटले आहेत.
अंबरनाथच्या महालक्ष्मी नगरच्या टेकडीवर संजय शेट्टे हे ५५ वर्षीय ज्येष्ठ शिवसैनिक राहतात. त्यांच्या घरासमोरील रस्त्याखालून महिनाभरापूर्वी पाण्याची नवी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यापूर्वीच हा रस्ता उंबरठय़ाच्या बरोबरीला आहे. कंत्राटदाराने नवीन जलवाहिनी रस्त्याच्या बरोबर टाकली आहे. कंत्राटदाराला शेट्टे यांनी जलवाहिनी फूटभर खाली टाकण्याची विनंती केली असता, जलवाहिनीवर काँक्रिटचा रस्ता फूटभर वर येणार असल्याचे सांगत निघून गेला, जो त्यानंतर फिरकला नाही. रस्ता फूटभर वर आल्याने घर खड्डय़ात जाणार असल्याची चिंता त्यांना आहे. नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीच्या घरोघरी जाणा-या लहान वाहिनीवर टाकल्याने पाइप फुटून पाणी रस्त्यावर वाहते. तसेच पाणी येण्याच्या वेळी घरात पाणी येत असल्याने महिनाभर शेट्टे यांनी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि आमदार बालाजी किणीकर तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती केली, मात्र त्याकडे त्यांनी पुरते दुर्लक्ष केल्याचे शेट्टे सांगतात.
वरील छायाचित्रणात दर्शविल्याप्रमाणे रस्त्यावरील खड्डे दिसत आहे, जरा बारकाईने पाहिले तर त्या खड्ड्यात साचलेले पाणीही कोणास दिसते का ते बघा? याच्यावर जरा गांभीर्याने विचार करा खड्डा जरी भरला तरी परत खड्डा कश्यामुळे तयार होईल. त्यात जे खड्ड्यात साचलेले किंवा रस्त्यावरून वाहणारे, पावसाचे जे पाणी आहे ना ते बाहेर पडण्यास कुठेच वाव नाही. तुम्ही राहता त्या घरात पाणी जाण्यास कुठेही वाव ठेवू नका आणि सारखे तिथे पाणी साचवून ठेवा. मग बघा तुमचे राहते घर हि रस्त्यावर पडलेल्या खड्डयाप्रमाणे दिसेल. जेवतानाही फक्त जेवत राहा बघा आपले पोटही बेडकासारखे फुगेल. अरे ढगातून पडलेले पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याकरिता आणि आपले फक्त हेंडसाळ पाणी जाण्यासाठी ती गटारे आणि नाले बनवली आहेत, तेच गटारे आणि नाले ओला-सुका कचरा टाकून तुम्बवले तर पाणी रस्त्यावर तरंगणार नाही का? त्या मार्गातून जेव्हा पाणी जाईल तेव्हा ते पाणी जमिनीच्या तळात पोहचेल म्हणजेच मुरेल आणि नंतर त्याचे बाष्पीभवन होईल आणि मगच पुढच्या वर्षी पाऊस पडेल आणि कृत्रिम पावसाकरिता पैसे किंवा कोणतीही टेक्नोलौजी वापरावी लागणार नाही. फक्त मोठ मोठाले टोवर उभारले म्हणजे आपले शहर सुंदर दिसत नाही. तर त्या टोवरच्या अवती भवति झाडे झुडपे तरी लावा जेणेकरून आपल्या मायभूमीस तापत्या आगीसारख्या उनाचे चटके तरी बसणार नाही. २६ जुलै २००५ तुंबलेल्या गटारामुळे, नाल्यामुळे मुंबईचे रस्ते, लोहमार्ग जाम झाले आणि आपण त्यांना हाईटायडचे नाव दिले. असा किती मोठ्या सेल्सिअस मध्ये त्या दिवशी पाऊस पडला जेणेकरून कोणती चाळ, कोणती इमारत कोसळली, ज्याला वृत्त वाहिनीने हाईटायडचे नाव दिले. आज तब्बल ९ वर्षे झाली तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्याच्यावर जराही आक्षेप घेतला नाही, उलट सफाईची कामे कंत्राटदारांच्या हाती देऊन पूर्ण मुंबईचा सत्यानाश केला आणि ह्यांचे कामगार निश्चिंत झोपले. पुन्हा रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे म्हणजे पुन्हा खडी डांबर आणून त्या खड्ड्यात टाकायचे आणि पाणी त्या रस्त्यावरून बाहेर जाण्यास वाव मिळाला नाही तर पुन्हा ती खडी डांबर वर येउन थोडासा मार्ग जो पाणी जाण्यास शिल्लक आहे त्यात साचू दे. आज गटारे नाले उपसले तर किती तरी टन कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळेल, क्वचित त्यातूनच सोन्याची खाण म्हणजे खता सारखे काही तरी मिळेल. हाच ओलसर कचरा कोणत्यातरी नापीक जमिनीवर साठवून ठेवा म्हणजे ती नापीक जमीन तरी सुपीक बनेल. जसे कोरे करकरीत रस्त्यावरहि खड्डे तयार करता येतात अगदी त्याच प्रमाणे होऊ शकते. नाहीतर कोणत्या तरी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने विचार विनिमय करून बघा. निदान हमारी धरती बंजर है वहा कुछ पकाया नहि जा सकता हि कारणे घेऊन तरी कोणताही परप्रांतीय आपल्या राज्यात येणार नाही.