स्थानिक भूमिपुत्र, मराठी माणूस यांच्या न्याय हक्कांच्या नावाखाली अनेक आंदोलने झाली. पण, ही आंदोलने केवळ चतुर्थ श्रेणीतील नोकरीसाठी, टॅक्सीच्या परवान्यासाठी, रेल्वे भरती, वडापावच्या गाडय़ांसाठी झाली.
मुंबई – स्थानिक भूमिपुत्र, मराठी माणूस यांच्या न्याय हक्कांच्या नावाखाली अनेक आंदोलने झाली. पण, ही आंदोलने केवळ चतुर्थ श्रेणीतील नोकरीसाठी, टॅक्सीच्या परवान्यासाठी, रेल्वे भरती, वडापावच्या गाडय़ांसाठी झाली. पण त्यासाठी आर्थिक सक्षम असलेल्या वर्गाला सोडून आणि आर्थिक दुर्बल असलेल्यांना झोडून बेरोजगारी संपणार नाही.
मुंबई वाढवायची असेल तर मराठी तरुण-तरुणींना आर्थिक सक्षम बनवून नोकरी आणि व्यवसायात आणले पाहिजे, असे मत स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांनी व्यक्त केले. चतुर्थ श्रेणीतील कामे करणा-या मजुरांपेक्षा आपली स्पर्धा आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या गुजराती लोकांशी व्हायला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रांगणात ‘नोकरी एक्सप्रेस’ या रोजगारविषयक उपक्रमाच्या निमित्ताने नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठी माणसांना टॅक्सीचे परमिट नाही, तर वडापावच्या गाडय़ा देण्याची मागणी केली जातेय. परंतु ही मागणी करणा-या कोणत्या नेत्याचा मुलगा टॅक्सी चालवतो का? आदित्य ठाकरे, अभिषेक घोसाळकर हे वडापावची गाडी चालवतात का, असा सवाल करत त्यांनी आधी ही कामे करावीत, मग मराठी माणसांना ती कामे करायला लावावी, असा टोलाही नितेश राणे यांनी हाणला.
मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे. गिरणगाव, दक्षिण मुंबईतून मराठी माणूस अल्पसंख्याक बनत चालला आहे, अशा प्रकारचे विधान काही दिवसांपूर्वी एका मोठय़ा नेत्याने केले होते. याचा धागा पकडत आज लालबाग, परळमधील मराठी माणूस हद्दपार होत आहे. मराठी माणसाला या भागांमध्ये घर विकत घेता येत नाही. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. त्यामुळे भविष्यात ‘एक मराठी माणूस दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा’, अशी बक्षीस लावण्याची वेळ येईल.
शिवसेनेने मंगलप्रभात लोढाला तिकीट विकण्याचा घाट घातला आहे. मराठी माणसाला गहाण ठेवून ही तिकीटविक्री होत आहे. ‘मातोश्री’वर या तिकिटांचा लिलाव करून त्याची बोली लावली जात असल्याचा आरोपच त्यांनी केला आहे.
टोलचे आंदोलन हे आघाडीच्या चांगल्या कामांचे प्रशस्तिपत्र
मनसेने पुकारलेले टोलविरोधी आंदोलन फुसके ठरले. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, टोलपेक्षा महाराष्ट्रात मोठे प्रश्न आहेत. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. शेतक-यांच्या आत्महत्या, विजेचा प्रश्न आहे. परंतु मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेनेने टोलचे आंदोलन पुकारून महाराष्ट्रातील सर्व प्रश्न संपले असून, केवळ टोलचाच प्रश्न उरला असल्याचे प्रशस्तिपत्रच दिले आहे. टोलचा प्रश्न असेल तर गोवा-महाराष्ट्र सीमेवर प्रवेशकर म्हणून २५० रुपये टोल घेतला जातो. त्यावर कोणी आवाज उठवत नाही. आमची सत्ता आली तर टोलमुक्त करू, असे गोपीनाथ मुंडे सांगतात. मग त्यांनी गोवा-महाराष्ट्र टोलबाबतही भूमिका जाहीर करावी, असे आवाहनही राणे यांनी केले.
मतांसाठी रोजगार मेळावे घेत नाही
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘नोकरी एक्स्प्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना निवडणुकांचा आम्ही विचार करत नाही. मुंबईसह राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी, हाच यामागचा उद्देश आहे. बेरोजगार उमेदवाराला ऑन दी स्पॉट नोकरी देण्याचा आमचा मानस आहे. मात्र या तरुणांनी आम्हाला मते द्यावीत, अशी आमची अपेक्षा नाही. त्यांनी आर्थिक सक्षम बनावे, हे आमचे स्वप्न असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
नामांकित कंपन्यांत नोकरी
अँड्रोमिडा, वर्ल्डवाइड हॉलिडेज, मारुती इन्फोटेक, कॅफे कॉफी डे, युरेका फोब्र्ज आदी कंपन्यांमध्ये उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
Gooood initiative must be appreciated