या काव्यसंग्रहातील काळजास भिडणारी प्रत्येक कविता काही सांगून जाणारी आहे. जीवनातील अनुभव काव्यातून प्रकटल्याने चांदणे उन्हातले ही जरी कल्पना असली तरी ती वास्तवाला गवसणी घालणारी आहे.
चांदणे उन्हातले आज,
मला भेटायला आले
राहिले तेवढे सारे,
पांग फिटायला आले..
मनामनातून ओसंडणारे शब्द जेव्हा काव्यात प्रतित होतात तेव्हा त्याची खरी ताकद त्या कवितेतून दिसून येते. मनात साठणारं सुख, दु:ख, आनंद हा जेव्हा कवितेतून उमटतो, तेव्हाही मन हलकं होऊन जातं आणि काव्यनिर्मितीचा ही आनंद नकळत मिळून जातो. उन्हात प्रतित होणारं चांदणं हे आपल्याला केवळ आणि केवळ कवितेतच प्रतिबिंबीत झालेलं पाहायला मिळतं. शब्दांची जादू यावेळी निरखता येते. कवीच्या मनातील सल असू दे, प्रेम असू दे, किंवा राग असू दे. ते जेव्हा कवितेतून जगासमोर येतं तेव्हा त्या कविची ओळख वाचकांना होते.
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा ‘चांदणं उन्हातलं’ हा कवितासंग्रह मनातील संवेदनेबरोबरच अंतरातील तरलता रेखणारं आहे. या कवितासंग्रहामध्ये एकूण चौ-याऐंशी कवितांचा समावेश करण्यात आला आहे. दिंडी चालली, व्यथा आणि कथा, नवा सूर्य, चांदणं उन्हातलं, आदी बरोबरच वादळी वादळे, पाणी पेटत आहे या कविता जीवनाचा वेध घेणा-या आहेत. चांदणं उन्हातलं हा श्री. भापकर यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून या पुस्तकाला कविवर्य ना. धों महानोर यांची प्रस्तावना लाभली आहे.
या काव्यसंग्रहातील कविता जेव्हा लिहिल्या जात होत्या तेव्हा नकळतपणे कार्यक्रम, भाषणांमधूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या असल्याने श्री. भापकर यांच्या या कवितांना श्रोत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या काव्यसंग्रहातील काळजास भिडणारी प्रत्येक कविता काही सांगून जाणारी आहे. जीवनातील अनुभव काव्यातून प्रकटल्याने चांदणे उन्हातले ही जरी कल्पना असली तरी ती वास्तवाला गवसणी घालणारी आहे. मनातील आशय, नवनिर्मितीची आस, संघर्ष, कल्पना आणि थेट अंतर्मनातलं आर्त अशा मांडणीतून साकारलेला ‘चांदणं उन्हातलं’ हा काव्यसंग्रह परिपूर्ण मानावा लागेल.
चांदणं उन्हातलं
कवी : डॉ. पुरुषोत्तम भापकर
प्रकाशक : संवेदना प्रकाशन
पृष्ठ : ९४
मूल्य : १५०/-