भावनेचा सण साजरा करताना आमदार बच्चू कडू यांना दिवंगत बहिण शीतलची आठवण आली आणि ते भावनिक झाले.
मंगेश सुर्यवंशी
मुंबई- ‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण. या जगात बहिण-भावाच्या नात्याइतके परम पवित्र, सुंदर आणि हृद्य नातं दुसरं कोणतंही नसेल. जीवाला जीव देणारं! घासातला घास देणारं! बहिण लग्न करून सासरी गेली तरी ती शरीराने सासरी असते; पण तिचं मन मात्र आपल्या आईवडील व भावाचा विचार करीत असतं. लांब असली तरी तिथूनच ती आपल्या प्राणप्रिय भावावर प्रेमाचा-मायेचा वर्षाव करत असते. आईवडिलांच्या माघारी ती आपल्या भावाला जपत असते. त्याच्यामुळेच तर तिचं माहेर नांदत राहातं. वडिलांच्या पश्चात भावातच ती त्यांचं अस्तित्व अनुभवते. या बहीण-भावाचं भावनिक नातं निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त सर्व भाऊबहिणींच्या गाठीभेटी होतात. सगळीकडे आनंदीआनंद पसरलेला असतो. बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वजण उत्साहात असतात.
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. ते त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. अनेक भगिनींच्या मदतीसाठी धावून जाणारे आमदार कडू यांच्या पाच बहिणी. रक्षाबंधनानिमित्त बच्चू कडू यांनीही आज आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी त्यांच्या भगिणी सरोजिनी, माधवी, रजनी, व रेखा या चार बहिणींकडे जाऊन त्यांनी राखी बांधून घेतली व त्यांच्याकडून सात्विक आशीर्वाद घेतले. मात्र हा सर्व भावनेचा सण साजरा करताना त्यांना दिवंगत बहिण शीतलची आठवण आली.
शेतक-यांसाठी अहोरात्र झगडणारा नेता अशी ओळख असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी आतापर्यंत सरकारी अधिका-यांना चौदावे रत्न दाखवण्याचा पराक्रम अनेकदा केला आहे. मात्र दिवंगत बहिणीच्या आठवणीने बच्चू कडूंना गलबलून आले. तिच्या नावाने बच्चू कडू यांनी चारही बहिणींना सोबत घेऊन राखी बांधली.
समाजातील मुलींची, मग ती बहीण असो वा मैत्रीण असो, बायको किंवा अनोळखी महिला असो, त्यांची रक्षा करणे, त्यांना अन्यायापासून वाचविणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. रक्षा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेला हा सण फक्त भारतासारख्या सुसंस्कृत देशात साजरा केला जातो, याचे मला अभिमान वाटते, आमदार बच्चू कडू यांनी ‘प्रहार’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.