केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीने यंदा जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये चार मराठी कलावंतांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीने यंदा जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये चार मराठी कलावंतांचा समावेश आहे. अकादमीतर्फे निरनिराळ्या क्षेत्रांतील ३६ कलाकारांना हे पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्रातील नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, नाट्य निर्माते अरुण काकडे, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण आणि शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. त्यातल्या त्यात मराठी लावणीचा झालेला सन्मान अधिक कौतुकास्पद आहे. लावणी या नृत्य-गायनासारखा प्रकार मराठी वगळता अन्य कोणत्याही भाषेत उपलब्ध नाही. त्यामुळे मराठी लावणी जतन करण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या सुलोचना चव्हाण यांचा गौरव विशेष उल्लेखनीय वाटतो. सुलोचना चव्हाण यांचा आवाज खास लावणीसाठीच निर्माण झालेला आहे असे वाटावे, असा त्यांचा आवाज लावणी गाताना फिरकी घेत असतो. खरे म्हणजे त्यांना संगीत नाटक अकादमीचा हा पुरस्कार फार पूर्वी मिळायला हवा होता. कारण त्यांच्यापेक्षाही कमी वयाच्या लावणी कलाकारांना तो फार पूर्वी मिळालेला आहे. गेली ५० वष्रे लावणी गाणा-या सुलोचना चव्हाण यांच्या कलेचे चीज झाले आहे. अजय पोहनकर यांना जाहीर झालेला पुरस्कारही मनाला दिलासा देणारा आहे. पोहनकर हे शात्रीय संगीत जिवंत ठेवणा-या आजच्या पिढीचे आघाडीचे गायक आहेत. त्यांना संगीताच्या सगळ्याच घराण्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे पण ते स्वत:ला कोणत्याही एका घराण्याचे पाइक म्हणवून घेत नाहीत. घराणी निर्थक आहेत, असे ते समजतात. संगीताची सूर आणि ताल ही दोनच घराणी महत्त्वाची आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. घराण्यांचा आणि त्या त्या घराण्याच्या शैलीचा फार बडेजाव न माजवता त्यांनी संगीताची सेवा केलेली आहे. त्यांना संगीताचा वारसा आईकडून मिळाला. त्यांची पत्नी अंजली ही गायिका आहे आणि मुलगा अभिजीत यानेही तिस-या पिढीत गाण्याची परंपरा कायम टिकवली आहे. अजय पोहनकर यांना २०१० मध्ये मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार मिळाला आहे. प्रा. वामन केंद्रे हे मुंबई विद्यापीठात नाट्यशात्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीत आपले एक आगळे वेगळे योगदान दिलेले आहे. तशी महाराष्ट्रात प्रायोगिक रंगभूमीची परंपरा मोठी आहे पण तिच्यात ब-याचदा अन्य नाटकांचे अनुकरण केले जाते. प्रा. केंद्रे यांनी ‘झुलवा’ हे देवदासींच्या आयुष्यावरचे नाटक सादर केले तेव्हा त्यांनी आपण कसले प्रयोग करत आहोत, हे दाखवून दिले. ‘जानेमन’ हे त्यांचे नाटक तर तृतीयपंथीयांच्या जीवनावर आधारलेले होते. ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांनी ओळखले जातात. स्थानिक कथानकांवर आणि स्थानिक सामाजिक समस्यांवर आपण प्रायोगिक नाटक करू शकतो, असे त्यांचे मत असते. इंग्रजीची नक्कल न करता आपण संस्कृत नाटकातूनही अनेक नव्या, आपल्याला अज्ञात असलेल्या गोष्टी शोधू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक रंगभूमी रंगली आहे. त्यासाठी अरुण काकडे यांच्यासारखे अनेक लोक मदतरूप ठरले आहेत. अनेक कलाकारांना त्यांनी रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. या चारही ज्येष्ठ कलावंतांचे अभिनंदन!