सलीम हे ढसाळ यांचे ड्रायव्हर. अनेक वर्ष ढसाळांकडे काम करणारे सलीम त्यांच्या कुटुंबातलेच एक झाले होते. ढसाळ यांच्या सगळ्या प्रसंगाचे ते साक्षीदार ठरले होते. ढसाळ यांचे त्यांनी रेखाटलेले शब्दचित्र
नामदेव ढसाळसाहेब आणि माझी पहिली भेट झाली ती कामाठीपु-यात झाली. आम्ही एका चाळीतच राहत होतो. पण मला त्यावेळी त्यांच्याबद्दल तशी काहीही माहिती नव्हती. माणूस कोणती मोठा आहे, गाडीवाला आहे इतकाच माझा समज होता. दरम्यान, मी विधानसभेत कामाला होतो, पण काही दिवसाचा ब्रेक मिळाल्याने घरी बसून असताना एके दिवशी आमच्या चाळीतून जात होतो, त्याच वेळी ढसाळसाहेबांनी मला आपल्या घरातून हाक मारली. ‘ये इकडे ये.’ मी आतमध्ये गेलो. ‘तू गाडी चालवतोस ना?’ मी मानेनेच होकार दिला. त्यावर ते म्हणाले, ‘मला मदनपु-याला मटण आणायला जायचे आहे, तू येतो का?’ मी घरीच होतो आणि इतका मोठा माणूस आपल्याला विचारतो म्हटल्यावर मी लगेच होकार दिला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्यासोबतच निघालो. मदनपु-यात त्यांच्या ठरलेल्या मटणविक्रेत्याकडून मटण घेतले. मदनपु-यातून पुढे गँट्र रोडला गोल चक्कर मारून सातरस्त्याला आलो. वाटेत माझ्याबद्दल त्यांना बरेच काही माहीत असल्यासारखे आणि जवळच्या माणसासारखे त्यांनी काही प्रश्नही विचारले. मी कधीही या माणसाला न भेटताही हा इतका मोठा माणूस आपल्याशी आपुलकीने बोलत असल्याने मलाही आश्चर्य वाटले. त्याच दरम्यान मला त्यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला. ‘तू माझ्याकडे कामावर राहशील का?’ असाही मी घरीच होतो. परंतु या माणसाबरोबर केलेला काही मिनिटांचा प्रवास मनापर्यंत जाऊन भिडला होता, त्यामुळे क्षणार्धात होकार देऊन टाकला. ही माझी त्यांच्यासोबतच पहिली भेट. हळूहळू मी या माणसाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेत गेलो. काही दिवसांतच त्यांच्यातला माझ्याबद्दलचा विश्वास अधिकच गडद होत होता. मीही तेव्हापासून मी त्यांच्याशी मनाने, विचाराने आणि सर्वागाने जोडलो जात होतो. मी त्यांच्याशी कधी एकरूप झालो आणि माझ्यातला मीही कधी विसरून गेलो, हे मलाच कळले नाही.
ढसाळसाहेबांकडे मी ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले होते. पण काही दिवसांतच मी त्यांच्या कुटुंबातला एक झालो होतो. त्यावेळी त्यांचा ‘सत्यता’ नावाचा पेपर निघत होता. मी ड्रायव्हर असल्याने त्यांच्यासोबत सगळीकडे जाण्याची संधी मला मिळत होती. ‘सत्यता’साठी तेव्हा कटिंग-पेस्टिंगची कामे घरीच चालत. त्या वेळी मी, प्रदीप म्हापसेकर असे काही जण काम करत असू. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. यामुळे पेपरची अनेक कामे ते मला सांगायचे. पुढे ‘सत्यता’ प्रिंटिंग प्रेसमधून निघायला लागल्यानंतर ते काम कमी झाले. त्यांच्या कामाची आणि प्रत्येक गोष्टीची स्वत: नोंद घेण्याची पद्धत मला अनेक गोष्टी शिकवत होती. त्यांच्यासोबत मला राज्याच्या आणि देशाच्या कानाकोप-यात फिरायला मिळाले. ते कुठेही विमानाने जात असले की, मला सोबतच घेऊन जात. दिल्ली, नागपूर, औरंगाद कुठेही जायचे असले की मी सोबत असायचो. वडापाव, उसळ-मिसळ, पानीकमच नाही, तर मोठमोठय़ा हॉटेलात जेवायला जायचे असले तरीही मला सोबतच जेवायला बसवणार, मुंबईच्या बाहेर गेल्यास कार्यकर्त्यांना वेगळय़ा खोल्या असल्या तरी मला त्यांच्यासोबतच ठेवत. त्यांच्या आजारासाठी कोणती औषधे कधी आणि कशी द्यायची याचे गणित मला ठाऊक होते. त्यामुळे मी कधी कंपाउंडर तर कधी डॉक्टरांच्या भूमिकेत असायचो. यामुळे ऑल्टॉक्स, मॅस्टिनोन, बायओलोन, नुरील आदी सर्व प्रकारच्या औषध गोळ्यांची मला माहिती झाली होती.
एकदा ते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीला उभे होते. त्यावेळी त्यांच्याकडे पैशाची झालेली चणचण मलाही अस्वस्थ करत होती. निवडणूक प्रचारात पैसे कमी पडले की, आम्ही थेट मुंबई गाठायचो आणि पुन्हा बारामतीला जायचो. अशा अनेक चकरा काढताना त्यांची झालेली धावपळ मी जवळून पाहिली. परंतु त्यांनी एकदा निश्चय केला की मागे फिरायचे नाहीत. त्यासाठी काहीही सहन करण्याची त्यांची तयारी होती. बारामतीच्या निवडणुकीत सात हजारेक मते त्यांना पडली होती. परंतु त्यांची ती धडपड मलाही बरेच काही शिकविणारी आणि नवे अनुभव देणारी होती. कधी कधी आमचे वादही व्हायचे. मला ते म्हणायचे की, तू आजपासून कामावर येऊ नकोस, मग मी दोन दिवस घरीच थांबायचो. मलाही चैन पडायची नाही, परंतु तिस-याच दिवशी त्यांचा फोन यायचा, ‘ये, बस्स झाले आता.. ये की.’ दोघांचाही राग मित्र- मैत्रिणीच्या भांडणाप्रमाणे असायचा. यामुळे कधी कधी आमचे वाद सुरू झाले की, मॅडम म्हणायच्या, ‘तुमचे दोघांचे भांडण नवरा-बायकोसारखे असते, तुम्ही भांडता आणि कधी एक होता ते कळत नाही, यामुळे मी तुमच्यात पडत नाही.’
‘पँथर’मध्ये झालेल्या फुटीनंतर पुढे अनेक बदल, घडामोडी आणि परिवर्तनांची घालमेल सुरू झाली होती. मात्र ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अथवा मोठय़ा व्यक्तीला भेटायला जात, तेव्हा मलाच सोबत ठेवत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेही पहिल्यांदा गेलो तेव्हा मी सोबत होतो. नंतर त्यांच्या आजारापणामुळे त्यांना व्हिलचेअरवरूनच घेऊन जावे लागत असे, तेव्हाही मीच सोबत होतो. प्रत्येक प्रसंगात आम्ही एकमेकांच्या इतके जवळ होतो की, आम्ही वेगळे आहोत, असे कधीच वाटले नाही. दोन शर्ट विकत घेतले तर मलाही एक शर्ट ते घ्यायला लावायचे. पुढे त्यांचे आजारपण वाढतच गेले. मात्र डॉक्टरांकडून तपासणी करतानाही मला ते सोबत घेऊन जात. आपला हात माझ्या हातात धरूनच ते डॉक्टरांकडून तपासणी करून घेत. मी खूप भारावून जायचो. बाँबे हॉस्पिटलमध्ये इलाज करायला जातानाही अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचा हात माझ्या हातातच होता.