गावापासून गडावर जाणारी वाट तशी ठसठशीत आहे. गडाच्या अध्र्या वाटतेच खोदलेल्या या लेण्या म्हणजे आपल्या गडसफारीचा पहिला टप्पा! प्राचीन काळात खोदलेल्या या लेण्या गडबांधणीचा इतिहास हजारो वर्षे मागे नेतात. कारण कोरीव लेण्यांची निर्मिती ही या काळाचीच भेट! यातील उजव्या बाजूच्या लेण्यात माणिकपुंज आणि पंचक्रोशींतल्या नागरिकांचे आराध्य दैवत भवानी मातेच्या रूपाने येथे स्थापित झालेले आहे.
नाशिक म्हणजे दुर्गभटक्यांचं खास आवडीचं ठिकाण! याच जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबरच सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. तिथल्या प्रत्येक उपरांगेला खास वैशिष्टय़ आणि सौंदर्यही लागलंय. याच उपरांगापैकी अजंठा-सातमाळची भटकंती हीदेखील कायमच स्मरणात राहणारी आहे. त्यामुळे या रांगेवरील किल्ल्यांची भटकंती करण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी इथे कायमच येतात.
त्यातल्या त्यात अजंठा रांगेची बात काही वेगळीच आहे. नाशिक-जळगाव-औरंगाबाद अशा तीन जिल्हय़ांना स्पर्शून गेलेली ही रांग जरी अजस्र् आणि रौद्र नसली तरी या रांगेवर विराजमान असलेले मध्यम आणि छोटेखानी किल्ले आपल्यासारख्या दर्दी भटक्यांना अजिबात निराश करीत नाही. याच डोंगररांगेच्या कुशीत पहुडलेलं गौताळा अभयारण्य तर वेळ काढून पाहायलाच हवं, असं आहे.
परंतु या रांगेवरती भटकंती करण्यास पुरेसा वेळ हवा. भौगोलिक अंतराचा विचार करता इथले किल्ले पाहण्यासाठी दोन-तीन दिवस तरी हाताशी ठेवावे लागतात. त्यामुळे अंतर जरी जास्त असले तरी दोन दिवसांत आणि तेही एका फेरीत बरेच किल्ले आरामात पाहून होतात. असो या रांगेवर आलो की, अनेक अपरिचित, आडवाटेवर आणि दुर्लक्षित किल्ले भटक्यांची वाट पाहताना दिसतात. असाच एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात उभा आहे. माणिकपुंज असं त्याचं नाव! हा भाग बराचसा औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असल्यामुळे या भागात आलो की, अजंठा रांग तुटक अथवा विलग दिसायला लागते. कमी पर्जन्य छायेच्या या प्रदेशावर मात्र सह्याद्रीच्या दुर्गरत्नांनी विशेष माया केलेली जाणवत राहते. पाऊस जरी कमी असला तरी याचा दुर्गाच्या देखणेपणावर काहीही फरक पडला नसल्याचे जाणवते.
माणिकपुंजला जाण्याअगोदर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे तालुक्याचं गाव गावण लागते. याच गावाच्या पुढे पोखरी फाटय़ावरून माणिकपुंज पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे, परंतु हा गड डोंगररांगेपासून विलग झाल्यामुळे दूरवरूनच त्याच्या आकारामुळे नजरेत भरतो. कातळीमाथा लाभलेल्या या गडाचं रूप मात्र वैशिष्टय़पूर्ण आणि आकर्षक वाटतं. पोखरी फाटय़ापासून पंधरा-वीस मिनिटांतच आपण पायथ्याला म्हणजेच माणिकपुंज या नावाच्या गावातच दाखल होतो. गावसुद्धा छोटेच असल्यामुळे या भागात वर्दळ आणि रहदारी तशी कमीच असते.
परंतु गावाला मात्र हजारो वर्षाचा वारसा आहे, असे तिथले ग्रामस्थ आपल्याला सांगतात. पूर्वी किल्ल्यांबरोबरच पायथ्याच्या गावांनाही अनन्यसाधारण महत्त्व असे. ही गावे म्हणजे जणू काही महत्त्वाच्या पेठाच असायच्या. त्यामुळे अशा गावांत प्राचीन मंदिरे, वाडे, तळी अशा वास्तू हमखास नजरेत पडतात. हा गडदेखील त्याला अपवाद नाही. गावातच शंभू महादेवाचं अतिशय प्राचीन मंदिर उभं असलेलं आपल्याला दिसते. छोटय़ा तळ्याच्या काठाला उभे असलेल्या या मंदिराभोवती अनेक सुंदर मूर्त्यां, नक्षीदार खांब, प्राचीन इमारतींचे दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. हे अवशेषदेखील अत्यंत सुबक आणि सुंदर असून यावरून हे मंदिर तत्कालीन काळात किती सुंदर असू शकते याचा अंदाज आपण बांधू शकतो. सध्या या मंदिरासमोर गावक-यांनी झाडं लावून सुंदर बाग फुलवली आहे. व तिची नियमित निगादेखील राखली जात असल्याचे दिसते. त्यामुळे हे ठिकाण पायथ्याचे सुंदर विश्रामाचं ठिकाण झालं आहे. गडाच्या सुरुवातीलाच भेटलेला हा प्राचीन ठेवा पाहूनच थेट गडालाच भिडायचे.
गावापासून गडावर जाणारी वाट तशी ठसठशीत आहे. तसेच खालून गडाच्या निम्म्यापर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पाय-यादेखील स्पष्टपणे दिसतात. या पाय-यांनी आपण वीस मिनिटांत कातळात खोदलेल्या लेण्यांपाशी हजर होतो. गडाच्या अध्र्या वाटतेच खोदलेल्या या लेण्या म्हणजे आपल्या गडसफारीचा पहिला टप्पा! प्राचीन काळात खोदलेल्या या लेण्या गडबांधणीचा इतिहास हजारो वर्षे मागे नेतात. कारण कोरीव लेण्यांची निर्मिती ही या काळाचीच भेट! यातील उजव्या बाजूच्या लेण्यात माणिकपुंज आणि पंचक्रोशींतल्या नागरिकांचे आराध्य दैवत भवानी मातेच्या रूपाने येथे स्थापित झालेले आहे. देवीच्या मूर्तीला शेंदूर फासलेला दिसतो. तसेच मूर्तीसमोर त्रिशुलदेखील दिसतात.
एवढय़ा देवीच्या दर्शनासाठी बरेचसे भक्तगण निम्मागड चढून दर्शनासाठी नेहमीच येत असतात. त्यामुळे भक्तगणासाठी येथे विजेचीही सुविधा निर्माण केलेली दिसते. सर्वसामान्यांची गर्दी फक्त याच लेण्यांपर्यंत मर्यादित असते. इथून पुढच्या वाटेवर फक्त डोंगरप्रेमीच जाताना दिसतात. इथे येणा-या ब-याच भक्तांना याच्यावर किल्ला आहे हे माहितीच नाही. त्यामुळे किल्ल्यावर पुढे जाण्यासाठी आपण मात्र या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन गडाच्या माथ्याकडे निघायचे.
गडाचं प्रवेशदार संपूर्णपणे ढासळलेले दिसून येते. मोडक्या तटबंदीतून आपण गडावर प्रवेश करतो. अशा रीतीने गडाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होते. गडाचा माथा आटोपशीर असल्यामुळे पाहण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या माथ्यावर आणखी एक कमी उंचीची टेकडी दिसते. परंतु या टप्प्यावर जाण्याआधी खालूनच एक फेरी मारायला सुरुवात करायची. अत्यंत सुबकरीत्या खोदलेलं पाण्याचं टाकं आपल्याला दिसते. या टाक्याच पुढेच काही अंतरावर एका मोठय़ा झाडाखाली पाण्याचं खांबटाकं दिसतं. हे खांबटाके प्राचीन असून सध्या अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे.
बाराही महिने यात पाणीपुरवठा असतो असे इथले ग्रामस्थ सांगतात. या टाक्याच्या पुढेच शेंदुर फासलेल्या विविध देवता मांडल्या आहेत. हे सारं पाहत आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर म्हणजेच तिस-या आणि अखेरच्या टप्प्यावर पोहोचायचे. तिथे पिराचे थडगे असून त्याच्याच शेजारी दगडात कोरलेल्या सदरेचे अवशेष दिसतात. सदरेवर जाणा-या कोरलेल्या चार सुरेख पाय-या आणि त्याचा चौथरा तेवढा शाबूत आहे. अशा रीतीने हे सारे अवशेष पाहूनच गडाची भटकंती पूर्ण होते.
गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून मात्र मनमोहक दृश्य दिसते. यातलेच मनाला आनंद देणारे दृश्य म्हणजे नव्यानेच बांधण्यात आलेल्या माणिकपुंज नावाच्या धरणाचे आणि अर्धचंद्राकृती पात्र असलेल्या नदीचे! हे दृश्य कितीतरी वेळ पाहत राहावेसे वाटते. या दृश्यांबरोबरच दूरवर दिसणारी शेते, मोकळी जमीन, पठारी प्रदेश आणि तुटक डोंगररांगादेखील भान हरपायला लावतात. हे सारे मनात साठवतच आल्यामार्गे गड उतरायला सुरुवात करायची.
गडांची उंची ही कमी असल्याने चढाईही कमी दमछाक करणारी आहे. याबरोबरच पाय-यांचीही सोय असल्यामुळे आबालवृद्धांसहीत हा गड आरामात पाहता येऊ शकतो, केवळ उत्तुंग, थरकाप उडवणारे, रौद्र वाटणारे किल्लेच आपल्याला गडभ्रमंतीचा आनंद देतात असे नाही, तर माणिकपुंजसारखे छोटेखानी किल्लेदेखील तेवढय़ाच निखळ आनंदाची शिदोरी आपल्याला बांधून देतात आणि दिवसही सार्थकी लावतात..