शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर टीका करताना ‘आता ते काय घंटा उपटणार’ असे शब्द अजित पवारांनी वापरले.
बारामती – भाषणाच्या ओघात वादग्रस्त विधान करुन जाणारे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील मेडद येथील विकास कामाच्या उदघाटन कार्यक्रमात केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर टीका करताना ‘आता ते काय घंटा उपटणार’ असे शब्द अजित पवारांनी वापरले. बारामतीतील २२ गावांना जिरायती बागांसाठी पाणी मिळत नसल्याने, काही गावकरी उपोषणाला बसले होते. या उपोषणकर्त्या गावक-यांना भेटून, शिवसेना आमदार विजय शिवतारे आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी पाठिंबा दिला होता.
रविवारी मेडद येथे आलेले अजित पवार याविषयी बोलताना म्हणाले कि, शेजारचे पुरंदरचे आमदार धरणाचे पाणी अडवून ठेवतात, बारामतीला पाणी देत नाहीत आणि इथे येऊन लोकांची दिशाभूल करतात. त्यांच्याकडून काही घंटा होणार आहे का ? अजित पवारांनी आपल्या भाषणात जवळपास पाच ते सहा वेळा घंटा शब्द वापरला. समोर पत्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी मंदिरातील घंटेचा संदर्भ देत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी धरणात पाणी नाही मग आता लघुशंका करायची का ? असे वादग्रस्त विधान करुन दुष्काळग्रस्तांच्या भावना दुखावल्या होत्या.
अजित पवारांनी मेडदच्या कार्यक्रमात ऊस आंदोलनाला पाठिंबा देणा-या माधव भंडारींवरही टीका केली. ज्यांना ऊस पेरतात की त्याचं बेणं दाबतात हे कळत नाही , त्या माधव भंडारी सारख्या लोकांनी ऊस दराच्या बाबतीत टिव्ही समोर बसून गप्पा मारू नयेत, अस अजित पवार म्हणाले.