काल (रविवारी) विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार शतकांसह झालेल्या भागीदारीने भारताने ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले खरे. मात्र अजूनही भारत ६८ धावांनी पिछाडीवर आहे हे लक्षात घ्यायला हवे.
काल (रविवारी) विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार शतकांसह झालेल्या भागीदारीने भारताने ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले खरे. मात्र अजूनही भारत ६८ धावांनी पिछाडीवर आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यातच आता दोन विकेटच हातात आहेत. कसोटीचे अजून दोन दिवस बाकी असले तरी आता ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णित राखण्याच्यादिशेनेच सर्वाधिक प्रयत्न करेल. कारण जर ही कसोटी अनिर्णित राहिली तर बॉर्डर-गावस्कर चषक त्यांना मालिकेत २-० विजयी आघाडीसह पटकवता येईल.
भारताला मालिकेत आव्हान राखायचे असेल तर त्यांना ही कसोटी जिंकावीच लागेल. मात्र त्यासाठी गरज आहे ती आज इशांत आणि सहका-यांनी १० विकेट झटपट घेण्याची. जर ते शक्य झाले तरच भारत विजयाचा प्रयत्न करू शकेल. अन्यथा अनिर्णितचे चित्र स्पष्ट आहे. मात्र स्टीवन स्मिथच्या ऑस्ट्रेलियाला एकाच दिवशी गारद करणे हे तितके सोपे नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीपेक्षा शेवटचे फलंदाज हेच भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरलेले आहेत.
आता काहीही घडले तरी सद्यस्थितीत भारत ही कसोटी गमावणार तरी नाही हे जवळपास निश्चित आहे. म्हणजेच गेल्या म्हणजे २०१२ ऑस्ट्रेलिया दौ-याप्रमाणे ०-४ मालिका गमावण्याची आलेली नामुष्की पुन्हा भारताला टाळता येईल. पहिल्या दोन कसोटी ऑस्ट्रेलियाने ज्याप्रकारे जिंकल्या ते पाहता यजमान ३-० विजयी आघाडीसाठी मेलबर्नवर उत्सुक होते. त्यातच भारताने मेलबर्नवरील गेल्या पाच कसोटींत फक्त पराभव स्वीकारले आहेत. ते पाहता आकडेवारीही भारताच्या बाजूने नव्हती.
मात्र कोहली-रहाणेच्या भागीदारीने कसोटीचे चित्र पूर्ण बदलले. वास्तविक काल दिवसातील दुस-याच चेंडूवर पुजारा बाद झाला तेव्हा भारताची दाणादाण उडणार की काय असे वाटत होते. मात्र कोहली-रहाणे या फलंदाजांनी जीवदानांचा फायदा उठवत का होईना ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहून भारताच्या कसोटी क्रिकेटचे हे दोन फलंदाज उज्ज्वल भविष्य आहेत हे कळून चुकले.