समाज म्हटला की त्यात विविध श्रद्धांचे व अंधश्रद्धांचे प्रवाह वाहत असतातच. अशाच प्रकारची एक प्रथा कोकणात आढळून येत ती म्हणजे छबिना. असं म्हणतात की पौर्णिमा व अमावस्येच्या रात्री निर्जन भागात हा भुतांचा छबिना निघत असतो.
समाज म्हटला की त्यात विविध श्रद्धांचे व अंधश्रद्धांचे प्रवाह वाहत असतातच. अशाच प्रकारची एक प्रथा कोकणात आढळून येत ती म्हणजे छबिना. असं म्हणतात की पौर्णिमा व अमावस्येच्या रात्री निर्जन भागात हा भुतांचा छबिना निघत असतो. जर एखाद्या माणसाने हा छबिना पाहिला तर तो अगदी ठार वेडा होतो. अर्थात ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे. काही ठिकाणी तर एखाद्याला घराण्याला शाप आहे अशीही वंदता असते. अशाच प्रकारच्या एका घराची, एका कुटुंबाची कथा असलेला चिरंजीव हा चित्रपट येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे या चित्रपटातली प्रमुख भूमिका भरत जाधव करत आहे.
प्रकाश मोरे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मल्याळम चित्रपट निर्माते आर अय्यर यांनी केली आहे. याविषयी बोलताना रमेश मोरे म्हणाले की, ‘एका मल्याळम चित्रपटाची कथा घेऊन निर्माते रामदास मेनन माझ्याकडे आले. त्यांनी मला एक डीव्हीडी दिला होता. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना सांगितलं की, या चित्रपटात मला कोकण दिसत आहे. त्यामुळे मूळ चित्रपटाचा रिमेक न करता हा चित्रपट अगदी वेगळय़ा कथानकावर व पटकथेवर करावा. त्याप्रमाणे त्यांनी मला परवानगी दिली व आम्ही कामाला सुरुवात केली.
मी स्वत: कोकणातला असल्याने कोकणात कोणकोणत्या अंधश्रद्धा असतात याचा माझा अभ्यास होता. त्यामुळे माझ्या गावाच्या आसपासच्या वातावरणातल्या अशा प्रकारच्या कथानकांचा मी वेध घेतला. त्यातून ही कथा निर्माण झाली. कोणत्याही घरात एक अशी व्यक्ती असते जी सगळय़ांकडून दुर्लक्षित असते. त्याला त्या घरात व परिसरातही पुरेसा मान मिळत नसतो. अशाच एका माणसाची ही कथा आहे. या कथेतल्या मुख्य पात्राला वेड लागलंय अशी आवई उठवण्यात येते. त्यातच त्याच्या कुटुंबाचीही होरपळ होते. त्याचा एक काकाही असाच असतो त्यामुळे या अंधश्रद्धेला अधिकच खतपाणी लागतं.
मात्र मी स्वत: कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मानत नाही. त्यामुळे लोकांच्या मनातले काही गैरसमज दूर करण्यासाठी या चित्रपटाचा वापर होऊ शकेल, असा विचार माझ्या मनात आला. या चित्रपटातून आम्ही ही अंधश्रद्धा दाखवली असली तरी त्याचा कुठेही पुरस्कार केला नाही. उलट ती चुकीची कशी आहे हेच आम्ही चित्रपटाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं आहे. हा चित्रपट करणं माझ्यासाठी खरोखरच आव्हान होतं. आमच्या निर्मात्यांनी मात्र माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला व त्यानुसार आम्ही कोकणातल्या पालशेत, गुहागर व इतर ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण केलं.
या चित्रपटातल्या कलाकारांच्या निवडीचंही स्वातंत्र्य आम्हाला होतं. भरत जाधव हा विनोदी अभिनेता म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी त्याच्यामध्ये फार मोठा अभिनेता आहे. त्यालाही ही भूमिका आवडली. त्याने ज्या पद्धतीने ही भूमिका केली आहे ती पाहता प्रेक्षकांना खरोखरच एक जबरदस्त असा चित्रपट पाहिल्याचा आनंद सहज मिळू शकतो. या चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही मला अशीच मोलाची साथ दिली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण अनिल आठल्ये यांनी केलं आहे. त्यांनी अगदी नव्या तंत्राचा वापर करून या कथेसाठी आवश्यक असलेलं गूढ वातावरण फारच सुरेख रितीने पडद्यावर दाखवलं आहे. हा चित्रपट म्हणजे एका अंधश्रद्धेच्या विरोधातली एक लढाईच आहे.
या चित्रपटात भरत जाधव, अलका कुबल, मिलींद काळे, प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
प्रेमाची भावस्पर्शी कहाणी – ‘चाहतो मी तुला’
रुपेरी पडद्यावर आजच्या तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होऊ लागली आहे. या कलाकृतीला प्रेक्षक वर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’हा कविशा प्रोडक्शनचा आगामी चित्रपटही याच धाटणीचा असून नात्यातील हळुवार क्षणांना रेखाटणारा हा फ्रेश चित्रपट १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलिवुडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शाह यांनी ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाद्वारे प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या विवेक व विद्याची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटुंबीय समजून घेतात का ? त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. भरत शाह प्रस्तुतकत्रे असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा-पटकथा-लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे.
विशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी. जगन यांचं असून संवाद महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. रवींद्र लोले व मेवालाल मौर्या यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना मििलद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात मेघन जाधव, मितीला मिरजकर यांच्यासह प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. १५ जानेवारीला ‘चाहतो मी तुला’ सर्वत्र प्रदíशत होणार आहे.
रजनीश यांच्या जीवनावरचा चित्रपट
भारतात अनेक पंथ, विचारधारा यांची एक मोठी परंपरा आहे. अशाच प्रकारचा आध्यात्माचा एक वेगळा विचार आचार्य रजनीश यांनी दिला होता. त्यांचे कार्य आजही जगभरात पाहायला मिळते. रजनीश यांच्या जीवनाचा प्रवास दाखवणारा ‘रिबेलियस फ्लॉवर’ हा चित्रपटही येत्या १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन जगदीश भारती यांनी केलं आहे. आपल्या चित्रपटातून रजनीश यांच्या जीवनावर व त्यांच्या तत्त्वज्ञानावर एक वेगळा प्रकाश पडू शकेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
किशन हुडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाला ओशो फाऊंडेशननेही सहाय्य केलं आहे. या चित्रपटाने नुकताच इटलीत भरलेल्या सॅलेंटो चित्रपट महोत्सवात परीक्षकांचे विशेष पारितोषिकही पटकावले आहे हे विशेष. रजनीश यांनी आपले बालपण आपल्या आजोळी मध्य प्रदेशमध्ये व्यतीत केले. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण खास त्याच लोकेशनवर जाऊन करण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या पिढीलाही ओशो यांचे जीवन समजून येईल, असा विश्वासही या चित्रपटाच्या टीमने व्यक् त केला आहे.
कलकत्ता येथील तरुण उदयोन्मुख चित्रकार तापस मैती यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये दि. ५ जानेवारीपासून सुरू झाले असून ते रसिकांना दि. ११ जानेवारी, २०१६ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळणार आहे. चित्रकार तापस मैती यांनी आपल्या चित्रात कॅनव्हासवर अॅक्रलिक रंग वापरून अनोख्या व वास्तववादी शैलीचा उपयोग करून सप्तरंगी कलाविष्कार साकारला आहे. त्यांनी आपल्या चित्रात वैशिष्टय़पूर्ण शैलीतून कलकत्ता शहरातील नागरी जीवनाची वैशिष्टय़े, त्यांचे राहणीमान व त्यांचे सामाजिक जीवन तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिसणारी त्या शहराची विलोभनीय व मोहक रूपे रेखाटली आहेत.
चित्रकार तापस मैती यांचे कलाशिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट कलकत्ता येथे झाले. त्यांनी काही एकल व सामूहिक कला प्रदर्शनातून आपली चित्रे मांडली असून त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यांना कलाप्रवर्तक संस्थांकडून अनेक पारितोषिके मिळाली असून भारतातील व विदेशातील कित्येक मान्यवर कलासंग्रहाकडे त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे.
चित्रकार तापस मैती यांनी सदर प्रदर्शनात मांडलेल्या चित्रात ब्रशचा उपयोग न करता स्पॅटूला हे तंत्र वापरून कलकत्ता शहराचे सौंदर्य व तिची सांस्कृतिक परंपरा आणि वैभव ह्यांचे कलात्मक दर्शन घडवले आहे. विविध ऋतूंमधील निसर्गातील रम्यता, शहरातील वातावरण व सांस्कृतिक वैभव दाखवत असताना त्यांनी सामान्य जनजीवन व त्यांचे अनेक पैलू दर्शविले आहेत. उत्तम रंगसंगती व तिचा आकर्षक पोत तसेच आवश्यक तो दृश्यपरिणाम दाखविताना साधलेली अचूक संकल्पना व त्यातील रम्यता चित्रकाराने अगदी स्पष्टपणे व कलात्मकतेने सादर केली आहे. तसेच आनंदी भाव व आशावाद आणि उज्वलता ह्याकडे खास लक्ष देऊन चित्रकाराने प्रत्येक चित्रांमधून बोलकेपणा, पारदर्शकता व आशयघनता अगदी सहज मांडली आहे याद्वारे त्यांनी रसिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवत राहतं. या प्रदर्शनाला आतापर्यंत अनेकांनी भेट दिलेली आहे.