उच्च शिक्षण संस्थांनी अनुभवावर आधारित शिक्षणाच्या वाढत्या महत्त्वाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अनुभवावर आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणा-या शैक्षणिक संस्थांना वर्गातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा दिसून येतात. हे शिक्षण संवादात्मक असल्याने ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते, सहभागी करून घेते, त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते. विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होणे, वाढणे यात डिजिटायझेशनने मोठी मदत केली आहे. या शिक्षणाचं महत्त्व ओळखून आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करायला हवेत. कारण हीच काळाची गरज आहे.
भारतातील कॉलेजेसमधून दरवर्षी लाखो मुलं पदवीधर होत असली तरी त्यापैकी केवळ २५ टक्के मुलांनाच रोजगार मिळतो. उर्वरित मुलांमध्ये रोजगारासाठी आवश्यक असलेलं कौशल्य कमी असतं आणि त्यामुळेच मनुष्यबळाची बाजारात गरज असली तरी ही मुलं बेरोजगारच राहतात. आज भारतातील उद्योगांसमोर रोजगारक्षम कौशल्य असलेली लोकं शोधणं हे आव्हान आहे, तर लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यावर रोजगार मिळवण्यासाठी झगडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दशकात, भारताने आíथक वाढ अनुभवली. ही वाढ मोठय़ा प्रमाणात देशांतर्गत कन्झमशन आणि स्वस्त व कुशल मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता यावर बहुतांश अवलंबून होती. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, वाढीमध्ये सातत्य राखण्यासाठी आणि भविष्यात आíथक महासत्ता होण्यासाठी भारताला आपल्याकडील तरुणांच्या मोठय़ा संख्येचा लाभ घेता येईल. परंतु, मोठय़ा संख्येने असलेल्या तरुणांच्या संख्येला चांगला रोजगार नाही मिळाला तर आज वरदान असलेली ही बाब लोकसंख्येबाबत शाप ठरू शकते.
भारतात कुशल मनुष्यबळाची मागणी आणि उपलब्धता यातील विसंगतीचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, आपली जुनाट शिक्षणपद्धती. नोकरी करायला लागल्यावर येणा-या आव्हानांना तोंड देण्यासाठी, घोकंपट्टीवर आधारित असलेली भारतातील सध्याची शिक्षणपद्धती अपयशी ठरत आहे. त्यांना सर्जनशील वृत्तीचा वापर करायला शिकवण्यासाठी सध्याचं पुस्तकी शिक्षण अपुरं पडत आहे आणि त्यामुळे त्यांच्या आकलन व नावीन्याच्या क्षमतेवर निर्बंध येत आहेत. याची परिणती रोजगारक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढण्यात होते.
तरुण वयात विद्यार्थ्यांना अनुभवावर आधारित शिक्षण पुरेल, अशी शिक्षणपद्धती अवलंबणा-या शैक्षणिक संस्थांची आवश्यकता आहे. संपूर्ण व्यवस्थेमध्येच पुस्तकी शिक्षणापासून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणापर्यंत महत्त्वाचे बदल होणं गरजेचं आहे. यामुळे उच्च शिक्षणादरम्यान आणि नंतर चांगले परिणाम दिसतील. त्यातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणा-यांची रोजगारक्षमता वाढेल.
प्रत्येक विद्यार्थी खास असतो. त्यामुळे ऑडिओ, व्हिज्युअल व किनेस्थेटिक शिक्षणाचं मिश्रण प्रत्येकासाठी उपयुक्त ठरतं. यापैकी प्रत्येक घटकाचा योग्य मेळ घालून मनाचं कुलूप उघडायला हवं – याला अनुभवावर आधारित शिक्षण म्हणतात. अनुभवावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना विचार करण्यास, शोध घेण्यास आणि शिकण्यास व उत्तरं मिळवण्यास प्रोत्साहित करतं. या महत्त्वाच्या मूल्यमापनाचा भारतातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेने विचार करायला हवा. अलीकडच्या काळात, शैक्षणिक संस्थांना अनुभवावर आधारित शिक्षणाचे महत्त्व उमगले आहे आणि पालक अशा शिक्षणपद्धतीची मागणी करू लागले आहेत.
अनेक शैक्षणिक संस्था अनुभवावर आधारित शिक्षणपद्धती अवलंबत असल्याचा दावा करत असल्या तरी त्यात कित्येक उणिवा आहेत. या संस्थांमध्ये अनुभवावर आधारित शिक्षणातील ‘५ आय’ मॉडेल या मुख्य घटकाची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना ‘इनोव्हेटिव्ह’ होण्यास मदत करणारी अतिशय प्रभावी शिक्षणपद्धती, संकल्पना ‘इंटरेिस्टग’ करणे, ‘इंडिव्हिज्युअल’मध्ये ‘इन्व्हेन्टिव्हनेस’ विकसित करणे, कण्टेण्ट ‘इंटरॅक्टिव’ करणे.. अशा प्रत्यक्ष अनुभवांमार्फत विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान मिळते आणि पुस्तकी शिक्षण प्रत्यक्षात आणण्याची क्षमता विकसित होते.
अनुभवावर आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणा-या शैक्षणिक संस्थांना वर्गातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा दिसून येतात. यातला सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, हे शिक्षण विद्यार्थ्यांना संवादात्मकतेतून प्रोत्साहित करते, सहभागी करून घेते व अभ्यासाची गोडी लावते. विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करणे, वाढवणे यात डिजिटायझेशनने मोठी मदत केली आहे. उदा. प्रशिक्षित शिक्षकांच्या थोडक्यात सूचनांसोबत संकल्पना व्हिज्युअल पद्धतीने सादर केल्याने वेळेचा प्रभावी वापर करता येतो. अन्यथा फळय़ावर लिहिणे, तक्ते व आकृत्या काढण्यासाठी वेळ जायचा. वाचवलेला वेळ उत्तम शिकवण्यासाठी, तसंच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व आत्मसात करण्याची क्षमता रुजवण्यासाठी करता येतो. सिनेमे, अॅनिमेशन आणि अन्य रंजक फॉरमॅटमुळे शिक्षकांना शिक्षण अधिक रंजक व गमतीशीर करून कल्पक शिक्षणाला चालना देणं शक्य केलं आहे.
आता अनेक शैक्षणिक संस्था अनुभवावर आधारित उपक्रमांमार्फत अॅक्टिविटी लॅब सेशन्स आयोजित करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल व प्रत्यक्ष अनुभवातून आकलन होण्यास मदत होते. या उपक्रमांमध्ये त्याच विषयांवर धडे असतात. मुख्य म्हणजे अशा स्वरूपाचे उपक्रम वर्गाचं वेळापत्रक न कोलमडता घेतले जातात. हे उपक्रम शिकवलेल्या संकल्पनांवर आधारित असतात आणि त्यानंतर कदाचित शिकलेल्या धडय़ांवर चर्चा केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ शकणा-या शंका दूर करण्यासाठी, विषयांचे महत्त्व रोजच्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी आणि त्या संकल्पना पक्क्या रुजवण्यासाठी महत्त्वाची असते. हे धडे अतिशय रंजक पद्धतीनेही शिकवता येऊ शकतात.
आज अनुभवावर आधारित शिक्षणाने वर्गाच्या चार भिंती ओलांडल्या आहेत आणि ते टेक-होम अॅक्टिव्हिटी किटच्या मार्फत घराघरांत पोहोचले आहे. अॅक्टिव्हिटी किट ग्रेड चार ते ग्रेड नऊपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असतं आणि त्यामध्ये संकल्पना समजण्यासाठी ‘डू-इट-युवरसेल्फ’ किट असते व पुन:पुन्हा जोर देऊन अनेक विषयांचे आकलन करून देण्याची सुविधा असते. यापैकी अनेक उपक्रम शिक्षकांसाठी असून ते सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रमाशी जोडलेले असतात.
बी-स्कूलमध्ये अनुभवावर आधारित शिक्षण हे अतिशय सक्षम साधन समजलं जातं. प्रीस्कूल व शाळांनीही त्याचे फायदे विचारात घ्यायला हवेत, कारण ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरं शोधणं व योग्य विचार करण्यासाठी ही शिक्षणपद्धती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे विद्यार्थी उच्च शिक्षणाचे आव्हान लीलया पेलू शकतात.